Lok Sabha Election Results 2024 : देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली आणि आज या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंडिया आघाडी पुढे बहुमताने जिंकून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले दुपारी चारपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. सध्याचा कल दिसतोय, त्यावरून नंदूरबार, नाशिक, बीड येथील महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी पुढे राहील. चार वाजता चित्र स्पष्ट होईल. तेव्हा आम्ही यावर सविस्तर बोली. या देशामध्ये पंतप्रधान कोण होईल, यावरून भारतीय जनता पार्टीने जो प्रचार केला होता, एग्झिट पोल,ओपनिंग पोल, मीडिया, अनेक गोष्टी केल्या. तो पोल किती चुकीचा, भंपक आणि खोटा होता, हे तुम्हाला स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते हा मी देशाचा ट्रेंड मानतो. पूर्ण देशभरातून जे आकडे समोर येत आहे. त्यावरून दिसते की देशात परिवर्तन दिसून येईल. मला वाटते. कॉग्रेस पक्ष राहूल गांधीच्या नेतृत्वात १५० सीट्स मिळू शकतात. मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार जाण्याचं चित्र स्पष्ट दिसतेय.”

हेही वाचा : VIDEO : निकालाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस नेते देवासमोर नतमस्तक, कुणाच्या पदरात यश पडणार

लोकसभा निवडणूक २०१९

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी त्यांनी १८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. मात्र २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी युती तोडली. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक फोडून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला. यावेळी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, ठाण्याचे राजन विचारे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील विनायक राऊत, धाराशिवमधील ओमराजे निंबाळकर आणि परभणीमधील संजय जाधव हे पाच खासदार उरले असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून २१ जागा मिळविल्या. तर एकनाथ शिंदे गटाला केवळ १५ जागा मिळू शकल्या. त्यातही त्यांच्यावर काही मतदारसंघाचे उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. यवतमाळ, हिंगोली मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाला उमेदवार बदलावे लागले. तसेच नाशिक, ठाणे हे मतदारसंघ मिळविण्यासाठी शिंदे गटाला भाजपावर दबावतंत्राचा वापर करावा लागला. 

असली शिवसेना आणि नकली शिवसेना

यंदाच्या निवडणुकीत असली शिवसेना आणि नकली शिवसेना हा वाद पेटवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचे म्हटले तर ते बाळासाहेब ठाकरे यांचे नकली संतान आहेत, अशीही टीका केली. यामुळे प्रचारात असली नकलीचा वाद रंगला. उद्धव ठाकरे यांच्याकडे पाचच खासदार उरल्यामुळे त्यांच्याकडे फार गमविण्यासारखे नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना त्यांच्याबरोबर आलेल्या १३ खासदारांना जिंकून आणण्याचे आव्हान कायम आहे.