लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागांवर यश मिळालं आहे. अशात ठाकरे गटात पुन्हा एकदा भूकंप होणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. फोडाफोडी होऊनही ठाकरेंच्या शिवसेनेने ९ खासदार निवडून आणले. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. अशात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी काम करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

खासदार नरेश म्हस्केंचा दावा काय?

खासदार नरेश म्हस्केंनी हा दावा केला आहे की उद्धव ठाकरेंच्या गटातले दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. मतदारसंघात कामं झाली पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही. असं या खासदारांनी सांगितलं आहे. या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईचा धोका आहे. त्यासाठी या दोन खासदारांनी योजनाही तयार केली आहे. असंही नरेश म्हस्केंनी स्पष्ट केलं. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आमि लवकरात लवकर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना आम्ही पाठिंबा देऊ असं या दोघांनी सांगितल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंसाठी कोकण, ठाण्याचे मैदान आव्हानात्मक का ठरतेय?

संजय राऊत शरद पवारांच्या पे रोलवर काम करत आहेत

अनेकजण बाळासाहेबांच्या विचारासाठी मंत्रीपद सोडून आलेच होते ना? तसे हे खासदारही येतील. ठाण्यासारख्या ठिकाणी मला साडे सात लाख मते मिळाली. मतदार आमच्यासोबत आहे. संजय राऊत गेली दोन वर्ष सरकार पडणार म्हणत होते. ते सकाळी उठतात तेव्हा त्यांना शरद पवार यांचा फोन येतो. त्यानंतर ते शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करतात. राऊत पे रोलवर आहेत. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

नरेश म्हस्केंवर सुषमा अंधारेंची टीका

नरेश म्हस्केंच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील, अशी चर्चा होती. मात्र, आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी असला थिल्लरपणा करु नये, असं म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.