Aaditya Thackeray Nomination Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्ष व आघाड्यांकडून जागावाटप व उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले जात असून काही ठिकाणी इतर पक्षातून आलेल्या इच्छुकांची उमेदवारीही लागलीच जाहीर केली जात आहे. काही प्रमुख उमेदवारांनी २४ ऑक्टोबरचा गुरुपुष्यामृत योग साधून उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यातून त्यांच्या मालमत्तेबाबतचा तपशील समोर आला आहे.

२४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे, राजन विचारे, भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड तर अपक्ष उमेदवार विजय नाहटा अशा काही नेत्यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेबाबतची माहिती समोर आली आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या मालमत्तेमध्ये गेल्या पाच वर्षांत जवळपास ६ कोटींची भर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

आदित्य ठाकरेंची मालमत्ता किती?

२०१९ साली पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांपूर्वी वैयक्तिक एकूण मालमत्ता १७ कोटी ६९ लाख रुपये होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण वैयक्तिक मालमत्ता २३ कोटी ४३ लाख इतकी आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता ६ कोटी ४ लाखांची आहे, तर जंगम मालमत्ता १७ कोटी ३९ लाख इतकी आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी गेल्या ५ वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीमध्ये ६ कोटींची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी विधि शाखेची पदवी घेतल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

एकूण मालमत्ता – २३ कोटी ४३ लाख (२०१९मध्ये १७ कोटी ६९ लाख)

स्थावर – ६ कोटी ४ लाख

जंगम – १७ कोटी ३९ लाख

गुन्हे नोंद – जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल

शिक्षण – विधि शाखेची पदवी

Aaditya Thackeray: मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार

आदित्य ठाकरेंवर एक गुन्हा, कोणता माहितेय?

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असणारे दिवाणी वा फौजदारी गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक असतं. त्यानुसार आदित्य ठाकरेंनीदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपशील प्रतिज्ञापत्रात दिला आहे. त्यानुसार, आदित्य ठाकरेंवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यासंदर्भात त्यांचा पोलीस स्थानकाच्या नोंदींमध्ये उल्लेख आहे.