Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019 Analysis : गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. २०१९ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीने एकत्र लढविली होती. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून युतीत तणाव निर्माण झाला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निर्माण झाली. हीच आघाडी आता २०२४ च्या विधानसभेला एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता बराच राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा जनतेचा कौल कुणाला असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तत्पूर्वी २०१९ च्या निवडणुकीत काय चित्र होते? राज्यातील कोणत्या विभागात कोणत्या पक्षाला यश मिळालं? हे जाणून घेऊया.

२०१९ मध्ये कोणी किती जागा लढवल्या?

भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६४ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १०५ जागांवर त्यांचा विजय झाला. संयुक्त शिवसेनेने १२८ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना केवळ ५६ जागा जिंकता आल्या. तर आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी त्यांना ५४ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसने १४७ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी त्यांना ४४ ठिकाणी विजय मिळाला.

हेही वाचा – Amit Thackeray: अमित ठाकरेंमुळे ‘एकच आमदार’ हा शिक्का पुसला जाणार? उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची खेळी काय?

विदर्भात काय स्थिती होती?

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला विदर्भात मोठा झटका बसला होता. विदर्भातील एकूण ६२ जागांपैकी भाजपाला २९, अविभाजित शिवसेनेला ४, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला १, तर काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या १५ जागा कमी झाल्या होत्या, तर अविभाजित राष्ट्रवादीच्या ४ तर, काँग्रेसच्या ५ जागांमध्ये वाढ झाली होती.

मराठवाड्यात कुणाला मिळालं होतं यश?

मराठवाड्यात २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेचा फटका बसला होता. २०१४ मध्ये मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण ४६ जागांपैकी भाजपाला १७, शिवसेना १०, अविभाजित राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला ९ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १६, शिवसेना १२, अविभाजित राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला ८ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या.

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती होती?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, तरीही या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडं जड राहिलं होतं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाला ६, शिवसेनेला ९ जागांचा फटका बसला होता, तर काँग्रेसट्या २ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ जागा वाढल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ७२ जागांपैकी भाजपाला २०, शिवसेनेला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला २७, काँग्रेसला १२ तर अपक्षांना ६ जागांवर विजय मिळाला होता.

मुंबई-कोकण विभागात कुणाला यश?

मुंबई-कोकण विभागात भाजपा-शिवसेना त्यांचा गड राखण्यात यशस्वी ठरली होती. मुंबई आणि कोकण विभागातील ७२ जागांपैकी भाजपाला २७, शिवसेनेला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला ६, काँग्रेसला ६ आणि अपक्षांना ८ जागांवर विजय मिळाला होता. महत्त्वाचे म्हणजे २०१४ च्या तुलनेत भाजपाला २ जागांचा फायदा झाला होता. तर शिवसेनेला १ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवर फटका बसला होता.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2019 Analysis: २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय झाले होते?

उत्तर महाराष्ट्रात काय होती स्थिती?

उत्तर महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. या भागातील एकूण ४३ जागांपैकी भाजपाला १६, शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला १३, काँग्रेसला ७ आणि अपक्षांना २ जागांवर विजय मिळाला होता. २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी ३ आणि २ जागांचे नुकसान झालं होतं. तर काँग्रेसला ३ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांचा फायदा होता.