लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे. शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून एनडीएचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे विधान केले. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सरकार स्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसले नाहीत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. सहा महिने ते एक वर्षाच्या काळात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असे बघेल म्हणाले आहेत.

भूपेश बघेल यांनी एक्सवर भूमिका मांडताना म्हटले, “काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे. सहा महिने किंवा वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. योगींची खुर्ची हलू लागली आहे. भजनलाल शर्माही डगमगायला लागले आहे.”

“४०० पारच्या नाऱ्याने भाजपाचं प्रचंड नुकसान, ज्या कुणी…”, निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य

एनडीएमधील महत्त्वाचा घटक पक्ष जेडीयूबद्दल बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, एनडीएचं सरकार अजून स्थापन झाली नाही, तेवढ्यात जनता दल (यू)चे प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसेच जातीनिहाय जनगणना करण्यासाठी दबाव टाकत आहेत. समान नागरी संहितेची (UCC) गरज नाही, असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. हे सर्व मुद्दे राहुल गांधी यांनीही उपस्थित केले होते.

“लवकरच एनडीएचं सरकार स्थापन होईल आणि नंतर त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात होईल. जेव्हा खटके उडायला लागतील, तेव्हा सरकारचा पाया ठिसूळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. सरकार तर बनेल पण त्यात नेहमी भांडणं होत राहतील”, असेही भूपेश बघेल म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भूपेश बघेल यांचा राजनंदगाव मतदारसंघात भाजपाच्या संतोष पांडे यांच्याकडून ४४,४११ मतांनी पराभव झाला.

छत्तीसगडमध्ये भाजपाने ११ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसला पिछाडीवर टाकले. काँग्रेसला कोरबा या एकमेव लोकसभा मतदारसंघात विजय मिळविता आला. याठिकाणी काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत जिंकल्या.