दिल्लीतल्या निकालांवर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आपदाला नाकारलं हे तर म्हटलंच आहे, या शिवाय काँग्रेसला दिल्लीकरांनी जागा दाखवली आहे असं म्हणत काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसविषयी काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“जनतेने काँग्रेसला कठोर संदेश दिला आहे. दिल्लीतल्या निवडणुकीत काँग्रेसने शून्याची डबल हॅटट्रीक लावली आहे. देशाच्या राजधानीत देशाच्या सर्वात जुन्या पक्षाचा सलग सहावेळा पराभव झाला आहे. त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. काँग्रेसचे लोक स्वतःला पराभवाचं सुवर्ण पदक देत आहेत. काँग्रेसवर कुणाचाही विश्वास उरलेला नाही. मी मागच्या वेळी म्हटलं होतं काँग्रेस हा परजिवी पक्ष झाला आहे. हा पक्ष स्वतःही डुबतो आणि सहकारी पक्षांना डुबवतो. काँग्रेस पक्ष आपल्या सहकाऱ्यांना संपवणारा पक्ष आहे.”

सहकारी पक्षांची भाषा, अजेंडा चोरण्याचं काम काँग्रेसकडून होतं आहे-मोदी

आत्ताची काँग्रेस सहकारी पक्षांची भाषा, त्यांचा अजेंडा चोरण्यात मश्गुल झाली आहे. त्यांचे मुद्दे चोरायचे आणि मग त्यांची व्होटबँक चोरायची. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसपा यांचे मुद्दे चोरुन त्यांची व्होट बँक ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडूमध्ये डीएमकेची भाषा काँग्रेस पक्ष आणखी जोरात बोलते आहे. कारण काँग्रेसला तिथे स्वतःची जागा बनवायची आहे. बिहारमध्येही जातीयवादाचं विष पसरवण्याचं काम काँग्रेसने केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सहकाऱ्यांची अशीच अवस्था काँग्रेस केली आहे. दिल्लीतही हे स्पष्ट झालं आहे की जो काँग्रेसचा हात धरतो तो बुडतोच हे निश्चित असतं. असं मोदी म्हणाले आहेत.

काही लोकांनी हिंदू व्हायचा प्रयत्न केला पण त्यांना कळलं हे आपलं क्षेत्र नाही-मोदी

राजकारणाचा जे अभ्यास करतात त्यांना मी सांगू इच्छितो की २०१४ नंतर काही लोकांनी हिंदू व्हायचा प्रयत्न केला. मंदिरात जायचं, माळा घालायच्या हे सगळं करुन त्यांना वाटलं आपण भाजपाची मतं चोरु, पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मागच्या वर्षांत त्यांनी हे मार्ग बंद केले. मग जायचं कुठे? तर विविध राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यावर काँग्रेसची नजर आहे. काँग्रेस आता छोट्या पक्षांना, स्थानिक पक्षांना खाण्याचं काम करते आहे. इंडि आघाडीचे पक्ष काँग्रेसचं धोरण समजलं आहे. दिल्लीत आपण पाहिलं की इंडि च्या नेत्यांनी काँग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न केला हे दिसून आलं आहे. इंडिया आघाडी काँग्रेसच्या विरोधात दिल्लीत उतरली. तरीही काय घडलं तुम्हीच बघा. असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाचा-मोदींचा आरोप

काँग्रेस म्हणजे बरबादी कारण काँग्रेस म्हणजे तो पक्ष उरलेला नाही जो स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आणि त्यानंतरची काही दशकं होता. आज काँग्रेस पक्ष शहरी दहशतवादाचं राजकारण करतो आहे. काँग्रेस नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा ही नक्षल्यांच्या तोंडी असलेली भाषा आहे. आपदा पक्षही काँग्रेसचा अर्बन नक्षलचा अजेंडा पुढे चालवत होती असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसमध्ये आता अर्बन नक्षल्यांचा डीएनए आहे. त्यामुळे काँग्रेस पावला पावलावर बरबाद होते आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.