माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला पदरात घेतलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते पद्मसिंह वगैरे काहीही सांगू नको, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही त्याप्रमाणे कायमच माझ्याबद्दल आपुलकी आणि आपलेपणा दाखवलात. मी हे उपकार कधीच विसरणार नाही. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंबरोबर आहे. ४० आमदार सोडून गेले असले तरीही आमच्या शिवसैनिकांमध्ये ८० आमदार निवडून आणण्याची ताकद आहे असं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. उमरगा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली त्यावेळी ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला.
ओमराजेंनी केला सेल्फीचा उल्लेख
“मी आत्तापर्यंत जितक्या लोकांसह सेल्फी काढले आहेत तेवढी मतं मला पडली तरीही ती संख्या सहा लाखांच्या घरात जाते. मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो. मध्यंतरी एका महिलेने मला एसटीत सीट मिळत नाही म्हणून फोन केला होता. तिने कंडक्टरला फोन दिला तेव्हा ओमराजे बोलत आहेत यावर त्याचा विश्वास नव्हता. मी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर महिलेला बसायची जागा मिळाली.” हेदेखील ओमराजेंनी सांगितलं.
आम्ही कुठेही गेलो की, लोक आमच्याकडे स्वाभिमानाने बघतात. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. ४० आमदार शिवसेना सोडूने गेले तरी त्याचे ८० आमदार करण्याची ताकद येथील शिवसैनिकांमध्ये आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले, तसंच आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पवनराजेंचा केलेला उल्लेख चर्चेत आहे.
सोयाबीनला ११ हजार रुपये भाव हवा का? मग’जय श्रीराम’ची घोषणा द्या. नोकऱ्या पाहिजेत तर मग ‘बजरंगबली की जय’ची घोषणा द्या. अशा घोषणा देऊन सोयाबीनचा भाव वाढणार आहे का किंवा तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत? असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या लोकांना एका मतासाठी ५० हजार रुपये देण्यात आले. पण आपले लोक हलले नाहीत, असंही ओमराजेंनी सांगितलं.
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omraje nimbalkar aggresive speech at umerga during uddhav thackeray rally at dharashiv scj