पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खरगेंचा संयम सुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विषारी समजा किंवा समजू नका. मात्र या विषामुळे तुम्ही मरुन जाल. मोदी हे काय चांगले व्यक्ती आहेत का? तर तसं अजिबात नाही. तुम्ही त्यांना चांगलं समजत असाल आणि जवळ जाल तर अशी निद्रा निजाल की पुन्हा तुम्हाला जाग येणार नाही. मल्लिकार्जुन खरगेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भाजपाने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.
भाजपाने काय म्हटलं आहे?
मल्लिकार्जुन खरगेंच्या या वक्तव्यानंतर गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी हे ट्वीट केलं की खरगे यांनी मोदींचा उल्लेख विषारी साप असा करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. खरंतर विष काँग्रेसने पेरलं आहे. समाजात विभाजनाचं विष पेरलं, देशात फाळणीचं विष पेरलं, भ्रष्टाचाराचं विष पेरलं आणि राजकारणात घराणेशाहीचं विष पेरलं असं म्हणत राय यांनी मल्लिकार्जुन खरगेंवर टीका केली आहे.
अमित मालवीय यांनी काय म्हटलं आहे?
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ट्वीट करून मल्लिकार्जुन खरगेंवर टीका केली आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी जे वक्तव्य केलं त्यातून त्यांची निराशा दिसते आहे. आज ते मोदींना विषारी साप म्हणाले आहेत याआधी सोनिया गांधी या मोदींना मौत के सौदागर असं म्हणाल्या होत्या. तेव्हापासूनच हे सगळं सुरु झालं आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागला की अशी वक्तव्यं करण्यात येतात असंही अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगेंनी दिलं स्पष्टीकरण
मल्लिकार्जुन खरगेंवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी जे वक्तव्य केलं ते व्यक्तीगत नव्हतं माझं म्हणणं होतं की मोदींची विचारधारा विषारी सापासारखी आहे. ही विचारधारा तुम्ही चाटायला गेलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे असं मला म्हणायचं होतं असं स्पष्टीकरण आता खरगे यांनी दिलं आहे. असं असलं तरीही त्यांच्यावर होणारी टीका काही थांबतना दिसत नाही.
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi is like poisonous snake said mallikarjun kharge karnataka assembly election scj