राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्याचवेळी दक्षिणेकडे भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसताना काँग्रेसनं तेलंगणामध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपासाठी लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व राज्यांमधील कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि नागरिकांचे आभार मानले. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका करण्याची संधी साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रलोभनं दाखवणं मतदारांना आवडत नाही”

या निवडणुकांच्या काळात ‘रेवडी’चा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळालं. त्यासंदर्भात बोलताना मोदींनी विरोधकांना टोला लगावला. “जिंकण्यासाठी हवेत गप्पा करणं आणि प्रलोभनं दाखवणं हे मतदारांना आवडत नाही. मतदारांना त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी स्पष्ट रोडमॅप हवा आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“२०२४ च्या हॅटट्रिकचीही गॅरंटी”

या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे या निवडणुकांमधल्या विजयामुळे भाजपासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मदत मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबत बोलताना मोदींनीही तोच विश्वास व्यक्त केला. “काही लोक तर म्हणत आहेत की आजच्या या हॅटट्रिकनं २०२४ सालच्या हॅटट्रिकची गॅरंटी देऊन टाकली आहे”, असं मोदी म्हणाले. “आजच्या विजयानं हेही सिद्ध केलंय की भ्रष्टाचार, भेदभावाचं राजकारण आणि घराणेशाहीबाबत आता देशात असहिष्णुता ठाम होऊ लागली आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

“ज्यांना भ्रष्टाचाऱ्यांच्या बाजूला उभं राहण्यात अजिबात संकोच वाटत नाही, त्यांना आज देशानं स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. जे भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात, तपास यंत्रणांची दिवसरात्र बदनामी करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला मिळालेली जनतेची सहमतीच आहेत”, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

“हे निकाल काँग्रेससाठी धडा”

दरम्यान, काँग्रेसला लक्ष्य करताना मोदींनी हे निकाल त्यांच्यासाठी धडा असल्याचं म्हटलं आहे. “हे निकाल काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीलाही मोठा धडा आहे. तो धडा हा आहे की फक्त काही कुटुंबांनी एकत्र येण्यामुळे फोटो कितीही चांगला आला, तरी देशाचा विश्वास जिंकणं अशक्य आहे. देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची इच्छा असायला हवी. घमंडिया आघाडीत ती तसूभरही दिसत नाही. शिवीगाळ, निराशा, नकारात्मकता यामुळे घमंडिया आघाडीला माध्यमांमध्ये मथळे मिळू शकतात, पण जनतेच्या मनात जागा मिळू शकत नाही”, असं ते म्हणाले.

“देशात फक्त चारच जाती महत्त्वाच्या”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विजयानंतर भाजपा मुख्यालयातील भाषणादरम्यान विधान!

“विरोधकांना हा धडा आहे, सुधरा नाहीतर…”

“आजचे निकाल त्या लोकांसाठीही इशारा आहे, जे प्रगती आणि लोककल्याणाच्या राजकारणाच्या विरोधात उभे राहतात. जेव्हा विकास होतो, तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी विरोध करतात. वंदे भारत रेल्वे सुरू करतो तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी चेष्टा करतात. अशा सर्व पक्षांना आज गरीबांनी इशारा दिला आहे. सुधरा. नाहीतर जनता तुम्हाला एकेकाला निवडून साफ करून टाकेल. आज अशा पक्षांसाठी हा धडा आहे की केंद्र सरकारच्या गरीब कल्याणच्या योजना आणि त्यासाठी पाठवलेल्या निधीच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर जो मध्ये येईल त्याला जनता बाजूला सारेल. लोकशाहीच्या हितासाठी माझा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सल्ला आहे की कृपा करून असं राजकारण करू नका जे देशविरोधी शक्तींना ताकद देईल. देशात फूट पाडणाऱ्या लोकांना मजबुती देईल. देशाला कमकुवत करणाऱ्या विचारांना पाठबळ देईल”, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi mocks congress after rajasthan chhattisgarh madhya pradesh win bjp pmw
Show comments