खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी एनडीएबरोबर असून नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी इंडिया आघाडीबरोबर आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच गेल्या ७५ वर्षात काँग्रेसकडून केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशो दरम्यान त्यांनी टीव्ही ९ वृत्त्ववाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“देशात आज चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या चार टप्प्यात जनता भाजपाच्या बाजुने राहिली आहे. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो शकतो की या निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील. या निडवणुकीत पूर्वीचे सगळे विक्रम मोडले जातील. कारण जनतेचे आशीर्वाद भाजपाच्या पाठिशी आहे. जनतेच्या आशीर्वादात मोठी शक्ती आहे ”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

हेही वाचा – “नकली शिवसेनेत हिंमत असेल तर काँग्रेसच्या युवराजांकडून…”, कल्याणमधील सभेतून पंतप्रधान…

“२०४७ पर्यंत विकसित भारत बनवणे हे आमचे लक्ष्य”

“१० वर्षात केलेल्या कामामुळे जनतेच्या मनात समाधान आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणि ‘अब की बार ४०० पार’ हा जनतेचा अजेंडा आहे. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, असे आश्वासन भाजपाने दिले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवणे हे आमचे लक्ष्य आहे”, असेही ते म्हणाले.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. “चौकात उभं राहून विरोधकांनी माझं घर फोडलं असा आरोप तुम्ही करत असाल, तर लोक तुमच्यावर हसतील. तुम्ही घराचे मालक असताना तुमचं घर फुटलंच कसं असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे आता लोक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हसत आहेत. या निडवडणुकीत त्यांना जनतेची सहानुभूती मिळणार नाही. कारण खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी एनडीएबरोबर आहे, तर नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी इंडिया आघाडीबरोबर आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रियंका गांधींच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर

पुढे बोलताना त्यांना प्रियंका गांधी यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी युवराज नसून सामान्य नागरीक आहे. तर मोदी शहंशाह आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना, “त्यांनी मला शहंशाह म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण मी २००१ पासून बऱ्याच गोष्टी सहन करतो आहे. बरेच आरोप आणि टीका मी सहन केली आहे. त्यामुळे जो इतक्या सगळ्या गोष्टी सहन करतो, तो शहंशाहच असतो”, असे ते म्हणाले.

‘त्या’ विधानावर नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यास जास्त मुले असणाऱ्यांना देशातील संपत्ती वाटप करेन, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या विधानावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “सबका साथ सबका विश्वास यावर भाजपाचा विश्वास आहे. मात्र, गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण केलं आहे. भाजपा धर्माच्या आधारावर कधीही राजकारण करत नाही. संविधानावर आमचा विश्वास आहे. जे लोक धर्माच्या आधारावर राजकारण करतात, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi road show in mumbai criticized uddhav thackeray and sharad pawar spb
Show comments