“इंडिया आघाडीचे लोक आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत, हे लोकांनाही समजत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मतदारांनी इंडिया आघाडीला नाकारले. देशातील २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? जे लोक स्वतःच्या आघाडीतच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड लोकसभेतील भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात मराठीतून करत “नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार. २६ एप्रिलची तयार झाली ना?” असा प्रश्न विचारला.

कुणालाही मतदान करा, पण करा

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, काल देशात पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. मी सर्व मतदार आणि विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. मतदानानंतर अनेकांनी बुथ स्तरापर्यंतचे विश्लेषण केले आहे. ते पाहता पहिल्या टप्प्यात एनडीएच्या पारड्यात एकतर्फी मतदान झाले असल्याचे दिसते. मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की, एनडीएचा विजय तुम्ही पक्का करत आहातच. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पण जे लोक मतदान करत नाहीत, त्यांनाही सांगू इच्छितो की, तुम्ही कुणालाही मतदान करा. पण मतदान करण्यापासून मागे हटू नका.

भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”

विरोधकांनाही आज ना उद्या यश मिळेल

“हे खरं आहे की, प्रचंड उकाडा आहे. लग्नाचा काळ आहे. शेतातील कामे आहेत. पण आपण पाहतो देशाचा सैनिक प्रतिकूल वातावरणातही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य निभावत असतो. त्याप्रमाणेच मतदारांनीही मतदान हे कर्तव्य समजून मतदान करावे. तसेच मी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, भलेही तुम्ही निवडणुकीत पराभूत होणार असाल तरीही मतदानासाठी लोकांना जागृत करा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुम्हालाही यश मिळेलच. त्यामुळे पराभूत होणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मी प्रेरीत करू इच्छितो”, असा उपरोधिक टोलाही पंतप्रधान मोदी यांनी लगावला.

“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

राहुल गांधींना अमेठीप्रमाणं वायनाडही सोडावं लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी हे वायनाड वगळता आणखी इतर ठिकाणी सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. २६ एप्रिल रोजी वायनाडमध्ये मतदान पार पडल्यानंतर राहुल गांधी दुसरा मतदारसंघ शोधतील. ज्याप्रमाणे त्यांना अमेठी सोडावी लागली. त्याप्रमाणे ते वायनाडही सोडतील. काँग्रेसचे कुटुंबीय या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही. कारण ज्याठिकाणी ते राहतात, त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही. काँग्रेसची अशी अवस्था होईल, असा विचार त्यांनीही केला नसेल. ज्या परिवारावाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, तो परिवारही स्वतःच्या पक्षाला मतदान करू शकत नाही, अशी अवस्था आहे.”

अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांचे कौतुक केले

“मी राजकारणात नव्हतो, तेव्हापासून चव्हाण कुटुंबीय राजकारणात आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचा एकदा योग आला होता. तेव्हा मी राजकारणात नव्हतो. मी सामान्य माणूस असतानाही शंकरराव चव्हाण यांनी माझ्याशी नम्रतापूर्वक संवाद साधला. राज्य आणि केंद्रात इतकी महत्त्वाची पदे भूषविल्यानंतरही त्यांच्यात इतकी नम्रता पाहून मी आजही त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो”, अशी आठवण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण आपल्याबरोबर आल्यामुळे आपली ताकद वाढली असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi says after june 4 india alliance leaders will tear each others clothes kvg
Show comments