उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या वर्चस्वाला सुरुंग लावत इंडिया आघाडीने तब्बल ४५ जागांवर आघाडी प्राप्त केली आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आले नसले तरीही या जागांवर इंडिया आघाडीचा विजय निश्चित होईल, असे चित्र आहे. उत्तर प्रदेशमधील ८० मतदारसंघांपैकी अमेठी आणि रायबरेलीतील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष होते. हे दोन्ही मतदारसंघ गांधी-नेहरु घराण्याचे पारंपारिक मतदारसंघ मानले जातात. अमेठीमधून यावेळी काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांना भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याविरोधात उभे करण्यात आले होते. या मतदारसंघात त्यांचा विजय झाला असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी किशोरी लाल शर्मा यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, “किशोरी भैया, मला तुमच्या विजयाबद्दल अजिबात साशंकता नव्हती. मला सुरुवातीपासूनच खात्री होती की तुम्ही जिंकाल. तुमचे आणि अमेठीतील जनतेचे मनापासून अभिनंदन!” अमेठी मतदारसंघामध्ये किशोरी लाल शर्मा तब्बल १ लाख ६७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघामध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. त्या मतदारसंघात सहज विजय प्राप्त केल्याने ते संसदेत जाऊ शकले. यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवणे टाळले.
प्रियांका गांधी उभे राहणार असल्याची होती चर्चा
अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत संदिग्धता होती. अमेठी अथवा रायबरेलीतून प्रियांका गांधी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या सगळ्या चर्चा फोल ठरल्या. सरतेशेवटी, राहुल गांधी यांनी रायबरेलीतून तर अमेठीतून काँग्रेसचे गेल्या चाळीस वर्षांपासून एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली. अमेठी आणि रायबरेलीतील विजयासाठी प्रियांका गांधी बरीच मेहनत घेतली होती. या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला होता. त्यामुळे, त्यांना या दोन्ही मतदारसंघातील विजयाचा आनंद होणे स्वाभाविक असल्यानेच हे ट्विट त्यांनी केले आहे.
काय म्हणाले किशोरी लाल शर्मा?
मतमोजणीमध्ये आघाडी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा म्हणाले की, “अमेठीतील विजय हा गांधी कुटुंबाचा व इथल्या जनतेचा विजय आहे. मतमोजणी चालू आहे, पण मी विजयी झाल्यानंतर हा विजय त्यांनाच समर्पित असेल. मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर इथली जनता लढली आहे. मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून फिरत राहिलो, पण खरं काम इथल्या जनतेने केलं आहे. माझ्यासाठी प्रियांका गांधी, राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी खूप केलं आहे. प्रियांका गांधी तर इथे अडीच दिवस राहिल्या. हा विजय त्यांच्यामुळे मिळाला आहे. मला तिकिट दिलं ते गांधी कुटुंबाने, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला,” असं किशोरी लाल शर्मा ‘एएनआय’ शी बोलताना म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच ते विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.