Lok Sabha Election 2024 Result Updates: लोकसभा निवडणूक निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं तर भाजपाची मोठी पीछेहाट झाली. महाराष्ट्रात भाजपाप्रणीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. तर मुंबईतल्या सहापैकी फक्त दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकून आले. त्यातले एक केंद्रीय मंत्री पियूष गोयल तर दुसरे शिंदे गटाचे रवींद्र वायकर! रवींद्र वायकरांना या निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजय मिळाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात सर्वात कमी मतांनी झालेला हा विजय ठरला आहे. पोस्टल मतं रवींद्र वायकरांच्या विजयात महत्त्वाची ठरल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

यंदाच्या निवडणुकीत मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी सर्वाधित उत्सुकता लागलेला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकर यांना महायुतीकडून वायव्य मुंबईत उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघासाठी शिंदे गटात दाखल झालेले संजय निरुपम आणि याच काळात शिंदे गटात आलेला अभिनेता गोविंदा हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण शेवटी एकनाथ शिंदेंनी रवींद्र वायकर यांनाच उमेदवारी जाहीर केली.

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत नाट्यमय घडामोडी!

वायव्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या २६व्या फेरीमध्ये अमोल किर्तीकर यांना निसटच्या मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. पण मताधिक्याचं प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे रवींद्र वायकरांनी मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने ९ लाख ५१ हजार ५८२ मतांची मोजणी केली.

निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला, पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

अमोल किर्तीकरांना फक्त एक मत जास्त!

ईव्हीएम मशीनवरच्या मतांच्या पुनर्मोजणीनंतर अमोल किर्तीकरांना रवींद्र वायकरांपेक्षा फक्त एक मत जास्त असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या मतदारसंघात एकूण ४९ मतं पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. या मतांपैकी वायकरांना ४८ मतं मिळाली. त्यामुळे एकूण मतांमध्ये रवींद्र वायकरांना ४८ मतांची विजयी आघाडी मिळाली. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: “…म्हणून अमोल किर्तीकर ४८ मतांनी पराभूत झाले”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा; मूळ प्रक्रियेवरच उपस्थित केला सवाल!

यानंतर अवैध ठरलेल्या पोस्टल मतांचीही तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मताधिक्याचं प्रमाण अगदी कमी असल्यास अवैध ठरलेल्या अशा मतांचीही पुन्हा तपासणी केली जाते. या प्रक्रियेत अवैध ठरलेली सर्व मतं अवैधच असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यात आलं. वायकरांना ४ लाख ५२ हजार ६४४ मतं मिळाली तर किर्तीकरांना ४ लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.

जितेंद्र आव्हाडांचा आरोप!

दरम्यान, अमोल किर्तीकरांचा पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. “अशा प्रकारे प्रशासनानं एका पराभव होणाऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मदत केली. जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पोस्टाने आलेल्या मतांची आधी मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएमवर मतमोजणी करण्यात आली. पण निकालाच्या शेवटी पुन्हा करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये मात्र आधी ईव्हीएमची मतं मोजण्यात आली आणि शेवटी पोस्टाने आलेली मतं मोजली गेली. म्हणून अमोल किर्तीकरांचा आधी २ हजार मतांनी विजयी घोषित केल्यानंतरही ४८ मतांनी पराभव झाला. निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे गैरव्यवहार केला जातो”, अशी पोस्ट आव्हाडांनी एक्स अकाऊंटवर केली आहे.