देशातल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडल्यानंतर त्यातील तेलंगणा वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चारही राज्यांच्या काही मतदारसंघांचे निकाल येणं अद्याप बाकी आहे. परंतु, त्याचा निकालावर फारसा परिणाम होणार नाही. भाजपाने तिन्ही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मध्य प्रदेशात तर भाजपाला काँग्रेसपेक्षा तिप्पट जागा मिळाल्या आहेत. अनेक ओपिनियन आणि एग्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरवत भाजपाने तिन्ही राज्यांमध्ये मोठी मुसंडी मारली आहे, तर काँग्रेसला तिन्ही राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसच्या या पराभवावर काँग्रेसचे मित्रपक्ष, इंडिया आघाडीतले सदस्य असलेल्या पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला सल्ला दिला आहे की, त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांना डावलू नये. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांना बरोबर घेतलं असतं तर निकालाचं चित्र वेगळं असतं असंही राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काम करावं लागेल. त्यांचा पक्ष आणि इंडिया आघाडीतल्या समन्वयाच्या बाबतीत देशभरात नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. काहीही झालं तरी इंडिया आघाडी मजबूत राहिली पाहिजे. मध्य प्रदेशात काँग्रेसने इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढली असती, आपल्या काही सहकाऱ्यांना काँग्रेसने मदत केली असती तर काँग्रेसची कामगिरी यापेक्षा चांगली झाली असती, असं माझं स्पष्ट मत आहे.

हे ही वाचा >> मध्य प्रदेशमधील विजयानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांची मराठीतून प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना माझा प्रणाम”

संजय राऊत म्हणाले, मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाला काही भागात चांगलं स्थान आहे. अखिलेश यादव यांची इच्छा होती की काँग्रेसबरोबर युती करून १० ते १२ जागा एकत्र लढाव्या. परंतु, कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही. यातून धडा घेत आगामी निवडणुका या इंडिया आघाडी म्हणून लढायला हव्यात. राज्या-राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांना डावलून राजकारण करता येणार नाही, ही गोष्ट काँग्रेसने आता गांभीर्याने घ्यायला हवी.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says if congress had taken allies with them election results would have been different asc
Show comments