लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघ, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होत असून अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात असलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदान केलं. मात्र, मतदानावेळी त्यांनी मतदान कक्षावर हार घातला. त्यांनी हार घातल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शांतिगिरी महाराजांनी आपण आचारसंहितेचं उल्लघन केलं नसल्याचा दावा करत आपल्याला हे माहिती नव्हतं, असं म्हटलं आहे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंचे महिलांना खास आवाहन, म्हणाल्या, “घरातली कामं बाजूला ठेवून…”

शांतिगिरी महाराजांनी काय म्हटलं?

“आम्ही ईव्हीएमला हार घातला नाही. तर त्यावरील मतदान कक्षावर हार घातला होता. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देताना आम्ही ईव्हीएमची पूजा केली नसल्याचं शांतिगिरी महाराजांनी म्हटलं आहे. तसेच जो गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला, त्या संदर्भात आमची लीगल टीम काम पाहत आहे. आम्हाला हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची कुठलीही कल्पना नव्हती. आम्ही ईव्हीएमला हार घातलेला नाही. ज्यांना ते चुकीचं वाटत होतं, त्यांनी तो हार त्याचवेळी काढायला हवा होता. आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही सुरक्षा कवचाला हार घातलेला असून आचारसंहितेचं उल्लघन होतं, याबाबत आम्हाला कल्पना नव्हती. जर आम्हाला यासंदर्भात आम्हाला माहिती असंत तर हार घतला नसता. तसेच ज्या ठिकाणी पैसे वाटले जातात तिकडे कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही”, असा आरोपही शांतिगिरी महाराजांनी विरोधकांवर केला.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहेत. महायुतीकडून हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. नाशिकमध्ये तिरंगी लढत होत आहे. नाशिक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार लवकर ठरत नव्हता. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी माघार घेतली होती. त्यानंतर अखेर महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shantigiri maharaj against registered for violating the code conduct nashik lok sabha election politics gkt