Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. पुन्हा एकदा एनडीएला लोकांनी पसंती दिली आहे, हेच निकाल सांगत आहेत. कारण बहुमताची संख्या भाजपाने एनडीएसह गाठली आहे. २९४ जागांवर एनडीएला यश मिळालं आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली ही संख्या आहे. बारामती हा मतदारसंघ महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ होता. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. भाजपासह महायुतीने सुनेत्रा पवार यांना बारामतीतून तिकिट दिलं होतं. तर महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रिया सुळेंना तिकिट दिलं होतं.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय

सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत एकूण १० जागा लढवल्या होत्या. त्यातल्या सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळवला आहे. बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी आणि अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उत्सुकता होती ती सुनेत्रा पवार या निकालाबाबत काही भाष्य करतात का याची? ते भाष्य त्यांनी केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट करत बारामतीतल्या निकालावर भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- PM Narendra Modi Speech: निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भावूक, “सगळ्या देशवासीयांचे आभार, मी पुन्हा…”

सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात ही लढत झाली असली तरीही अजित पवार हे राष्ट्रवादीतून वेगळे झाल्यापासून त्यांची लढत थेट शरद पवारांशीच होती. या लढतीकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असंही पाहिलं जात होतं. तसंच बारामतीची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती.

काय आहे सुनेत्रा पवारांची पोस्ट?

“लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरीही या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दलही धन्यवाद देते. जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस कायमच तत्पर आहे आणि असेन. पुनश्च आभार!” असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी पोस्ट केली आहे आणि बारामतीच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार २०२३ मध्ये महायुतीत

अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये महायुतीत सहभागी होत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह असं दोन्हीही बहाल केलं. तर शरद पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं. शरद पवारांचं वय झालं आहे त्यांनी आता आराम करावा असा सल्ला अजित पवारांनी दिला होता. तसंच त्यांच्या वयाचा मुद्दाही अनेकदा भाषणांमधून उपस्थित केला होता. अशात आता अजित पवार यांनीही बारामतीच्या निकालावर प्रतिक्रिया देत जनमताचा कौल स्वीकारल्यचं म्हटलं आहे.