मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान तसेच तेलंगणा राज्यातील कल आता स्पष्ट झाला आहेत. यातील राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे. तेलंगणामधील बीआरएसची गेल्या १० वर्षांची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दरम्यान या राज्यात काँग्रेसचा विजय झाला असला तरी येथील एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच चर्चा होत आहे. कारण या पक्षाने एकूण ९ पैकी तीन जागांवर विजय मिळवला असून हा पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एआयएमआयएमचा तीन जागांवर विजय, ४ जागांवर आघाडीवर

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने तेलंगणा निवडणुकीत एकूण ९ जागांवर उमेदवार दिले होते. यातील तीन जागांवर या पक्षाने विजय मिळवला आहे. चारमिनार, चंद्रायांगुट्टा आणि बहादूरपुरा या मतदारसंघांचा यात समावेश आहे. तर मलाकपेट, याकूतपुरा, नामपल्ली, करवान या चार जागांवर एआयएमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत.

अकबरुद्दीन ओवैसी यांचा तब्बल ८१ हजार मतांनी विजय

चंद्रायांगुट्टा या मतदारसंघासाठी एआयएमआयएमने असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी तब्बल ८१ हजार ६६० मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे १९९९ सालापासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करतात. या पक्षाने चारमिनार तसेच हैदराबाद जुने शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील काही जागांवर आपली पकड कायम ठेवली आहे.

हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

तेलंगणा राज्य जिंकण्यासाठी भाजपाने येथे पूर्ण ताकदीने प्रयत्न केला होता. हैदरबाद शहराच्या आसपासच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला होता. या भागातील ओबीसी मते मिळवीत, या दृष्टीने भाजपाने आपली रणनीती आखली होती. त्यासाठी भाजपा या भागात हिंदुत्वाचा अजेंडा राबवत होती. त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ यांनी आपल्या एका प्रचारसभेत आम्ही सत्तेत आल्यास हैदराबाद शहराचे नाव भाग्यनगर करू, अशी घोषणा केली होती.

ओवैसी यांनी केली होती टीका

आदित्यनाथ यांच्या या घोषणेनंतर ओवैसी यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाकडून तुष्टीकरणाचे आणि भेदभावाचे राजकाण केले जात आहे. भाग्यनगर हे नाव कोठून आले हे भाजपाने सांगावे. हैदराबाद हे नाव आमच्याशी जोडले गेलेले आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली होती. अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा करून हैदराबाद परिसरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र त्यात यश आले नाही.

केसीआरने केली होती महत्त्वाची घोषणा

बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा केसीआर यांनीदेखील अल्पसंख्याक तरुणांना आकर्षित करण्यासाठी हैदराबाद शहराच्या आसपास आयटी पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र त्याचाही मतदारांवर काही परिणाम झालेला नाही. एआयएमआयएमने ९ पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तर चार जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे.

२०१८ साली जिंकल्या होत्या ७ जागा

दरम्यान, २०१८ सालच्या निवडणुकीत एआयएमआयएमने एकूण सात जागांवर विजय मिळवला होता. यात चारमिनार, याकूतपुरा, करवान, मलकपेट, बहादूरपुरा, चंद्रयांगुट्टा आणि नामपल्ली या मतदारसंघाचा समावेश होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana assembly election 2023 result aimim won 3 seats lead in 4 seater akbaruddin owaisi won by 81 thousand vote prd