Telangana Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : काँग्रेस, भाजपा आणि सत्ताधारी बीआरएस यांच्यात अटीतटीच्या ठरलेल्या तेलंगणातील विधानसभा लढतीत सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचं स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार काँग्रेस ६६, बीआरएस ३७ आणि भाजपा ९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मतदारांचा कौल स्पष्ट होत आहे. एवढंच नव्हे तर एआयएमआयएमनेही तीन जागांवर आघाडी घेतली आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या ‘हाता’ने भारत राष्ट्र समितीची ‘गाडी’ तेलंगणामध्ये रोखली असल्याचं दिसतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. यावेळी ७०.२८ टक्के मतदान झाले. राज्यभरात ३५ हजार ६५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तर तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा ६० आकडा पार करावा लागणार आहे. सध्या आकडेवारीनुसार काँग्रेस बहुमताने सत्ता स्थापन करू शकते.

२०१४ साली तेलंगण राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून तेलंगणाची सत्ता बीआरएसच्या ताब्यात आहे. तसंच, राज्याच्या निर्मितीपासून केसीआर या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु, एक्झिट पोलचे अंदाज सध्या खरे ठरत असताना केंद्रीय निवडणूक आयोगातून येणाऱ्या आकडेवारीवरून केसीआर यांची सत्ता आता उलथवण्यात काँग्रेसला यश येण्याची चिन्हे आहेत.

बाय बाय केसीआर, काँग्रेसचा जल्लोष

काँग्रेसचे उमेदवार कोंडा सुरेखा आणि नैनी राजेंद्री रेड्डी हे दोघेही वारंगल पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१८ मध्ये मुख्यमंत्री केसीआर सिरिल्ला येथून लढले होते. यंदा या जागेवरून कालवकुंतला तारका रामराव हे आघाडीवर आहेत. तर, आदिलाबाद येथून भाजपाचे पायल शंकर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून धनपाल सूर्यनारायण निजामाबाद येथून निवडून येण्याची शक्यता आहे. याकूतपुरा जागेवर एआयएमआयएमचे जाफर हुसेन आघाडीवर आहेत. एकूणच काँग्रेसचे पारडे जड आहे. त्यामुळे हैदराबाद येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष केला जात आहे. तसंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाय बाय केसीआर असा नारा दिलाय.

हेही वाचा >> Telangana Election Result 2023: तेलंगणात घडामोडींना वेग; काँग्रेसकडून लग्झरी बसेस तयार, आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी!

…तर काँग्रेसचं दक्षिणेकडील अस्तित्व होईल मजबूत

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं होतं. त्यामुळे काँग्रेसला नवं चैतन्य मिळालं आहे. आता तेलंगणाच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा उभारी येण्याची शक्यता आहे. देशातील सर्वांत जुना आणि मोठा पक्ष २०१४ पासून पिछाडीवर होता. परंतु, भारत जोडो यात्रा आणि यासारख्या अनेक राजकीय कार्यक्रमांमुळे राहुल गांधींनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात मुसंडी मारली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी तेलंगणा निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असणार आहेत. कर्नाटकनंतर तेलंगणात यश मिळाल्यानंतर काँग्रेसचं दक्षिणेकडील अस्तित्व मजबूत होईल.

बीआरएसच्या पिछाडीची कारणं काय

बीआरएस पक्षाच्या आमदारांना त्यांच्याच मतदारंसघात प्रचंड विरोध होतोय. तसच, बीआरएस आणि एआयएमआयएम यांचा भाजपाला छुपा पाठिंबा असल्याचीही खुली चर्चा आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे तेलंगणातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या की, बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. सध्याचं राजकारण असं की आहे कधी ते आमचे आमदार घेऊन जातात तर कधी त्यांचे आमदार येथे येतात.

आमदारांना हॉटेलमध्ये हलवणार

तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे. हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत असले, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.

हेही वाचा >> Telangana : अभाविप, टीडीपी ते काँग्रेस; कधी काळी तुरुंगात गेलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?

काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

काँग्रेस तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसला पुढे आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे पुत्र केटी रामाराव ऊर्फ केटीआर यांच्यावर जोरदार हल्ला केला. केसीआर यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कामरेड्डी या मतदारसंघातून केसीआर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आपला पारंपरिक कोडंगल मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला. दोन्हीकडे ते आघाडीवर आहेत.

काँग्रेसला जर बहुमत मिळाले, तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती असतील, अशी अटकळ अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रेवंत रेड्डी यांच्या नावाला पसंती दिली आहे.

मतमोजणीच्या प्रक्रियेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह १०९ पक्षांच्या २२९० उमेदवारांचे भवितव्य उघड होणार आहे. एकूण उमेदवारांपैकी २२१ महिला आणि एका ट्रान्सजेंडरचाही समावेश आहे. तर, १०३ आमदारांनी पुन्हा एकदा आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी बहुतेक आमदार हे सत्ताधारी बीआरएसचे आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana election result 2023 congress hand brake for brs car in telangana congress in front for strengthening in south sgk
Show comments