लोकसभा निवडणुकीत देशभर इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत रंगली होती.परंतु, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील स्थानिक पक्षांनी एकला चलो रे चा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच पक्षांची जुळवा जुळव आणि आघाड्यांना पाठिंबा देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओ ब्रिएन यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, “आज तृणमूल काँग्रेसचे नेते सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओ ब्रिएन यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. आपच्या सर्व नेत्यांनीही आज उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही चर्चा केली. नरेंद्र मोदींचा पक्ष अल्पमतात आहे. त्यांना बहुमत मिळालं नाहीय तरीही ते सरकार बनवत आहेत. खिचडी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्हाला माहितेय की ही खिचडी शिजणार नाही.”

हेही वाचा >> “बारामतीत मीच कमी पडलो”, ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा वक्तव्य; पराभव जिव्हारी लागला?

देशहितासाठी राजकीय पक्षांशी चर्चा सुरू

तसंच, देशहितासाठी काय करता येईल याकरता ममता बॅनर्जी यांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं”, असं संजय राऊत म्हणाले. “ही सदिच्छा भेट होती. विचारांचं आदान-प्रदान होतंय. भविष्यात कोणती पावलं टाकायची याबाबत चर्चा सुरू आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यास ते टीकेल की नाही हे याबाबत शंका आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी काही राजकीय पक्ष चर्चा करत आहेत”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> नव्या सरकारच्या मंत्रिमंडाळाचा फॉर्म्युला ठरला? महाराष्ट्रातील किती खासदारांची कॅबिनेटमध्ये वर्णी?

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जागा कोणाला?

पश्चिम बंगालमध्ये ४२ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी २९ जागांवर तृणमूलने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी ठरला आहे. तर, भाजपाने १२ उमेदवार उतरवले होते, त्यांपैकी ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, काँग्रेसचा एकमेव खासदार संसदेत गेला आहे. म्हणजेच. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच वरचढ ठरला आहे. त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दर्शवल्यास इंडिया आघाडी बहुमताच्या जवळपास पोहोचू शकते. दरम्यान,काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी घोषित केलं होतं, इंडिया आघाडीने सत्ता स्थापन केल्यास त्यांना बाहेरून पाठिंबा दिला जाईल. त्यामुळे येत्या काळात देशात इंडिया आघाडीची सत्ता येतेय की एनडीए सरकार स्थापन करतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.