हल्ली तर एक पद्धत झाली आहे, ज्याला देतो तो जातो. मग कुणाला काही द्यायचं की थोडी भीती वाटते असा टोला आज उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना लगावला. नवनियुक्त शिवसेना नेत्याचा सन्मान सोहळा मुंबईत पार पडला त्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ता येते आणि जाते. आपली सत्ता परत येणार आणि मी येणार हे आज मी तुम्हाला सांगतो. आज चार राज्यांचा निकाल लागला आहे. जे जिंकले त्यांचं मी मोकळ्या मनाने अभिनंदन करतो. निकाल अपेक्षित की अनपेक्षित त्यांचं ते पाहतील. मात्र आज जसे निकाल लागले ती लोकशाही आहे. ही लोकशाही देशात टिकली पाहिजे म्हणून आपण लढतो आहोत. २०२४ ची निवडणूक अशासाठी महत्त्वाची आहे की आता जशा निवडणुका होत आहेत तशा त्या नंतरही होत राहिल्या पाहिजेत. जनतेने ठरवलं पाहिजे की कुणाला सत्ता दिली पाहिजे. आपल्याकडे प्रजा ठरवते राजा कोण? तो अधिकार जातो आहे असं वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र आणि बंगाल यांची परंपरा आहे की ती दोन्ही राज्यं अन्यायाच्या विरोधात लढतात. जेवढे क्रांतिकारी या दोन राज्यांनी दिले आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. आपल्याला ही परंपरा पुढे न्यायची आहे. आताही जे मिंधे गेलेत तिकडे त्यांना कळतच नाही आपण काय करत आहोत. ते गद्दार तर आहेतच पण गद्दार केवळ शिवसेनेशी नाहीत, त्यांची गद्दारी महाराष्ट्राच्या मातीशी करत आहेत. सत्तेसाठी इतरांची धुणीभांडी ते करत आहेत. जे पाहून जीव जळतो आहे, त्यामुळेच आपण लढतो आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

माझं पद गेलं म्हणून मला ही लढाई लढायची नाही. सोन्यासारखे शिवसैनिक बरोबर असल्याने पदाचं काही वाटत नाही. हल्ली निवडणूकही EVM वर होतं त्यामुळे कळतच नाही कोण कुणाचा आवाज काढतं आहे. एका स्वाभिमानासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्याला जे संपवायला निघालेत त्यांना संपवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray first reaction on four states election result our battle is for democracy scj
Show comments