Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजू शकतं. लोकसभेच्या निकालानंतरच राज्यात विधानसभा निवडणुकीच वारे वाहू लागले. त्यामुळे जागा वाटप, मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यंदा खरी लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालत होऊ शकते. दरम्यान, महायुतीचं जागावाटप कसं होईल? उमेदवारी देताना कोणते निकष असतील? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विधानसभेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु, तरीही जागा वाटपाची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना किती जागा मिळणार? इतर मित्र पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. लोकसभेला जागा वाटपादरम्यान उशीर झाल्याने त्याचा फटका निकालावर बसला. त्यामुळे विधानसभेला लवकरात लवकर जागा वाटप करण्याची शक्यता आहे. यावर अजित पवार म्हणाले, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे संपवावं लागेल, असा आमचा प्रयत्न आहे.

उमेदवारांचं इलेक्टिव्ह मेरिट पाहावं लागणार

उमेदवारांबाबत ते म्हणाले, “विरोधक कोणते उमेदवार उभे करणार पाहावं लागेल. विधानसभेचे उमदेवार उभे करताना इलेक्टिव्ह मेरिट पाहावं लागतं. तिथली राजकीय परिस्थिती, तिथली थोडी समीकरणं पाहावी लागतात. मी नाव घेणार नाही, पण काहींना मागच्या निवडणुकीत लोकसभेचं तिकिट मिळालं असतं तर ते पराभूत झाले असते, पण तिकिट न मिळाल्याची सहानुभूती मिळून ते निवडून आले. लोकसभेला अपक्ष निवडून येणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.”

हेही वाचा >> Amit Thackeray : आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवणार का? अमित ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “जिकडे गरज असेल तिकडे…”

उमेदवार ठरवताना निकष काय?

असा उमेदवार निवडायचा की त्याला मतदारांनीही पाठिंबा दिला पाहिजे. तसंच, इतर तिन्ही मित्र पक्षांचंही समर्थन असलं पाहिजे. कारण, या तिन्ही पक्षांचेही काही मतदार असतात ते या उमेदवाराला मतदान करणार असतात, असं अजित पवार म्हणाले.

अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा अनुभव

“इलेक्टिव्ह मेरिट ठरवताना प्रत्येकजण आपआपला प्रयत्न करणार. किती जागा लढवणार याबाबत मी काहीही बोललो नाही. आम्ही तिन्ही पक्ष आणि घटकपक्ष बसून जागांचं वाटप करू. आम्हाला अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.