Premium

मुंबईत अनेक ठिकाणी संथ गतीनं तर अल्पसंख्याक भागात वेगानं मतदान; कारण काय?

मुंबईतील अल्पसंख्याक भागात जोरदार मतदान झाल्याचं दिसून आलं. मुंबईतच दुसरीकडे मात्र, अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान झालं.

Mumbai Lok Sabha Elections voting
मुंबईत अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडलं. यामध्ये मुंबईमधील सहा मतदारसंघ आणि भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण, पालघर, या मतदारसंघात मतदान झालं. महाराष्ट्रात एकूण ५४.३३ टक्के मतदान झालं. मुंबईत अनेक मतदार केंद्रावर संथ गतीनं मतदान पार पडलं. असं असलं तरी मुंबई उपनगरातील कुर्ला, वांद्रे, मालवणी, चांदिवली, मीरा रोड आणि मुंब्रा येथील अल्पसंख्याक भागात वेगाने मतदान झाल्याचं दिसून आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे यंदाची निवडणूक वेगळी ठरली. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आहेत. त्यामुळे अनेक जणांना ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला मतदान न करता आघाडीतील पक्षाला मतदान करावं लागलं. आता काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनीही आपण कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, पण यावेळी पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला मतदान केल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना खुले पत्र, “लोकशाहीच्या उत्सवात मतदारांच्या मनामनात मोदी, ४ जूननंतर..”

अल्पसंख्याक भागात मतदानाचा टक्का वाढला?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अल्पसंख्याक भागात जोरदार मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे. माजी मंत्री नसीम खान आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी अल्पसंख्याक भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याचं म्हटलं आहे. तसंच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीच्या यशाची अपेक्षा व्यक्त केली.

नसीम खान काय म्हणाले?

“अल्पसंख्यांकांमध्ये मतदानाचा उत्साह पाहून आनंद झाला. भर उन्हातही धीर धरून ते आपला हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहिले. अल्पसंख्याकांकडून मतदानाला इतका सकारात्मक प्रतिसाद आपण कधीही पाहिला नव्हता”, असं प्रदेश काँग्रेसचे नेते आरिफ नसीम खान म्हणाले.

मुंबई उत्तर मध्यमधील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की, “बिगर काँग्रेस उमेदवार असलेल्या जागांवरही अल्पसंख्याकांकडून चांगलं मतदान झालं. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की, अल्पसंख्याकांनी एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा या सारख्या पक्षांना नाकारले आहे. त्यामुळे येणारा निकाल अनेकांना धक्का देईल”, असं ते म्हणाले.

पहिल्यांदा शिवसेनेला मतदान केलं

मुंबई दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी शिवसेनेचे अरविंद सावंत मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. कट्टर शिवसैनिक हे अल्पसंख्याकांबरोबर आहेत. मी काँग्रेसचा असून नेहमी ‘हाता’च्या चिन्हाला मतदान केलं. मात्र, यावेळी पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला मत केलं असल्याचं अमीन पटेल यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Voting increased in minority areas in mumbai lok sabha elections gkt

First published on: 21-05-2024 at 14:31 IST
Show comments