उत्तर प्रदेशमध्ये भाजापचा दारुण पराभव झाला आहे. अयोध्येतील राम मंदिरावरून भाजपाने देशभर प्रचार केला. परंतु, जिथं राम मंदिराचं नवनिर्माण झालंय, त्याच मतदारसंघात भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. अयोध्येचा समावेश असलेल्या फेजाबाद लोकसभा मतदारसंघात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद निवडून आलेत. या जागेवरून भाजपाची पिछेहाट का झाली, याबाबत अखिलेश यादव यांनी आज माध्यमांना कारणमिमांसा सांगितली. दि हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अयोध्येतील राम मंदिरात जानेवारी महिन्यात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत हा कार्यक्रम करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे राम मंदिराच्या नवनिर्माणामुळे या मतदारसंघात भाजपाचाच विजय होईल, असं एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलं होतं. याबाबत अखिलेश यादव म्हणाले, “उत्तर प्रदेशात भाजपा आणखी जागा हरू शकली असती हे सत्य आहे. मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येची वेदना वेळोवेळी पाहिली असेल.

ते पुढे म्हणाले की, “अयोध्येतील नागरिकांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांच्यासाठी त्यांच्या जमिनी बाजारभावाप्रमाणे संपादित केल्या गेल्या नाहीत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतलीत. त्यामुळेच अयोध्या आणि आजूबाजूच्या भागातील जनतेला तुम्ही उद्ध्वस्त केले. म्हणूनच भाजपाच्या विरोधात मतदान झाले”, असं अखिलेश यादव म्हणाले. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अवधेश प्रसाद सिंह म्हणाले की, भाजपचा पराभव झाला कारण त्यांनी प्रभू रामाची प्रतिष्ठा नष्ट केली.

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपा नेते नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

“भारतीय जनता पक्षाने अयोध्येच्या नावावर राजकारण केले. भाजपाने ‘मर्यादा पुरषोत्तम रामा’ची प्रतिष्ठा नष्ट केली आहे. भाजपाच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारी आहे. त्यांनी आमच्या जवानांचा, शेतकऱ्यांचा अनादर केला आहे”, असे ते म्हणाले. अवधेश प्रसाद यांनी भाजपाचे दोन वेळचे खासदार लल्लू सिंह यांचा ५४ हजार ५६७ मतांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सर्वांत मोठा पक्ष

सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. २०१४ आणि २०२९ मध्ये राज्यात प्रचंड विजय मिळवणाऱ्या भाजपला २०२४ मध्ये ८० पैकी फक्त ३३ जागा जिंकता आल्या. तर, समाजवादी पक्षाने ४३ जागा जिंकल्या आहत.