Lok Sabha Election Result 2024 Updates: सध्या देशभरात नव्या एनडीए सरकारची चर्चा पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक निकालांनंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून येत्या दोन ते तीन दिवसांत ते पुन्हा शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. पण दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी हालचाली केल्या जात असल्याचे दावे होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं या निकालांमधून काय अर्थ निघतो? भाजपाला कोणती शिकवण मिळते? विरोधकांचं गणित काय असेल? असा सर्व मुद्द्यांवर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

“मोदी-शाहांना लोकशाहीची सवय नाही”

योगेंद्र यादव यांनी या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर परखड भाष्य केलं. “मोदी आणि शाहांना लोकशाहीची सवय नाहीये. पण आता या निवडणूक निकालांनंतर पहिल्यांदा त्यांना कदाचित लोकशाहीचे निर्बंध पाळावे लागतील. अटल बिहारी वाजपेयींना या सगळ्याची सवय होती. यात दोन गोष्टी होऊ शकतात. मोदी-शाहांना याची जाणीव होईल की हे भाजपा सरकार नसून आघाडी सरकार आहे. दुसरं त्यांना याची जाणीव होईल की नव्या सरकारमध्ये दक्षिणेकडचा तेलुगू देसम पक्ष येत आहे”, असं योगेंद्र यादव म्हणाले.

“सातत्याने दक्षिणेला हेटाळण्याच्या धोरणाचा तेलुगू देसम पक्ष विरोध करू शकतो. मतदारसंघ पुनर्रचनेला ते विरोध करू शकतात. टीडीपी आणि जदयूसाठी मुस्लीम व्होटबँकही महत्त्वाची आहे. त्यामुळे ते मुस्लीम विरोधी धोरणं किंवा हिंदू-मुस्लीम मुद्द्याला विरोध करू शकतात”, असं योगेंद्र यादव यांनी मुलाखतीत नमूद केलं.

उतारावरच्या गाडीला ब्रेक!

या निवडणूक निकालांमुळे देशाच्या उतारावर जात असलेल्या गाडीला ब्रेक लागल्याचं विधान योगेंद्र यादव यांनी केलं. “मोदी व शाहांना या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू शकतो की उतारावरून वेगाने खाली जाणाऱ्या एका गाडीत आपण १४० कोटी भारतीय बसलो आहोत आणि त्या गाडीला हा ब्रेक लागला आहे. असा ब्रेक लागत असेल तर त्याचं स्वागतच होईल. ज्यांना लोकशाहीच्या निर्बंधांची सवय नाही, ज्यांना असं वाटतं की कुणीही आणि काहीही मॅनेज होऊ शकतं, त्यांच्यासाठी असे ब्रेक लागल्यास प्रत्येक लोकशाहीविरोधी सत्ताधाऱ्यांना हे ब्रेक खाली आणू शकतात”, असं योगेंद्र यावर यावेळी म्हणाले.

निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला, पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

“…असं न झाल्यास लोकशाहीसाठी सकारात्मक चिन्हं”

तुम्ही कधी लोकांना सांगता की प्रत्येकाला १५ लाख मिळतील आणि नंतर कुणीही तुम्हाला त्यावर प्रश्न विचारू नये अशी अपेक्षा ठेवता. तुम्ही म्हणता की मला फक्त ५० दिवस द्या आणि त्यानंतर मला खांबावर लटकावून टाका आणि नंतर कुणीही बाहेर जाऊन खांब शोधणार नाही असं तुम्हाला वाटतं. तुम्ही म्हणू शकता की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल आणि नंतर त्याचं काय झालं याची माहितीच देत नाही. तुम्हाला असं वागण्याची सवय झाली की मग तुम्ही बेजबाबदार होता. पण नंतर तुम्ही जेव्हा निर्बंधांचा सामना करता, तेव्हा सगळ्यात आधी हे निर्बंध टाळून शॉर्टकटचा मार्ग शोधू लागता. किंवा कधीकधी तुम्ही या गोष्टींना थेट विरोध करण्याच्या भूमिकेत जाता. ही शक्यता आपण अजिबात नाकारू शकत नाही. आणि असं झालं तर आपल्याला आणखी कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. पण तसं न झाल्यास या निकालांमुळे लोकशाही प्रक्रियेसाठी आशेची अनेक किरणं दिसू लागली आहेत असं म्हणता येईल”, असं सविस्तर भाष्य योगेंद्र यादव यांनी यंदाच्या लोकसभा निकालांवर केलं आहे.

Lok Sabha Election Result 2024 Updates: भाजपाचा पराभव फक्त अयोध्येत नाही, एकूण ५ जागा गमावल्या; वाराणसी वगळता १२ पैकी ९ ठिकाणी बसला फटका!

“भाजपाला दक्षिण भारतात मिळालेली मतं, जागा ही राजकारणासाठी चांगली बातमी आहे. त्यामुळे उत्तर विरुद्ध दक्षिण या प्रचाराला आवर घातला जाण्यास मदत होईल”, असंही ते म्हणाले.