राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी १ तारखेच्या एक्झिट पोल्सनंतर निवडणूक निकालांबाबत भाकित वर्तवलं होतं. एकीकडे जवळपास सर्वच एक्झिट पोल्स एनडीएला ३५० हून जास्त जागांचा अंदाज वर्तवत असताना योगेंद्र यादव यांनी मात्र एनडीएला ३०० च्या आत जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तसेच, भाजपाला २४० ते २४५ जागा मिळतील असं ते म्हणाले होते. योगेंद्र यादव यांनी वर्तवलेला अंदाज जवळपास जसाच्या तसा खरा ठरला. आता निकालांनंतर योगेंद्र यादव यांनी या निकालांचं विश्लेषण करताना टी-२० क्रिकेट वर्ल्डकपचं उदाहरण दिलं आहे!

इतके तंतोतंत अंदाज कसे वर्तवले?

योगेंद्र यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अंदाजांविषयी आणि भाजपाच्या विजयाविषयी भाष्य केलं आहे. “संपूर्ण देशाला भाजपाकडून, त्यांच्या माध्यम सहकाऱ्यांकडून, पोलस्टार्सकडून, विश्लेषकांकडून फसवलं जात होतं. त्यामुळे आपण देशासमोर आपल्याला खरे वाटणारे आकडे मांडायला हवेत असं मला वाटलं. नंतर तेच आकडे खरे ठरले. पण हे असं वारंवार करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मला असं वाटत नाही की भारतात अशी स्थिती पुन्हा यावी जिथे माध्यमं आणि पोलस्टार्स त्यांचं काम करणार नाहीत आणि एका राजकीय कार्यकर्त्याला हे काम करायला लागावं. मी तसं करणं ही खरंतर एक वेदनादायी बाब होती”, असं योगेंद्र यादव या मुलाखतीमध्ये म्हणाले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने अपप्रचार केला जातो, असं योगेंद्र यादव म्हणाले. “भाजपाला अजूनही असं वाटतं की ते कोणताही अपप्रचार करू शकतात आणि इतर सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवतील असं त्यांना वाटतं. सध्या निकालांनंतर नवीन अपप्रचार असा चालू केला आहे की “आम्ही तर २०० हून जास्त जागा जिंकलो आहोत. काँग्रेसला १०० जागाही जिंकता आलेल्या नाहीत”. हे अत्यंत वाईट आहे”, असं योगेंद्र यादव म्हणाले.

भाजपाचा विजय आणि टी-२० विश्वचषकाचं उदाहरण!

भाजपाकडून २००हून अधिक जागा जिंकल्यामुळे विजय झाल्याचा केलेला दावा योगेंद्र यादव यांनी खोडून काढला. “सध्या टी-२० वर्ल्डकप चालू आहे. अमेरिकेची क्रिकेट टीम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये उतरली आहे. त्यांनी चांगला खेळही केला आहे. कल्पना करा की अमेरिकेशी भारतीय संघाचा सामना असताना २०व्या षटकात भारतीय संघानं अमेरिकेचा दोन विकेट्सनं पराभव केला. जर कुणी म्हणालं की भारतानं हा एक मोठा विजय मिळवला आहे, तर तुम्ही काय म्हणाल? हा खरं तर एका नवख्या संघाचा जागतिक विजेता म्हणून पाहिल्या जाणाऱ्या संघानं केलेला पराभव आहे”, असं योगेंद्र यादव म्हणाले.

“यंदाची निवडणूक अशीच होती. मी राजकीय सामर्थ्यावर बोलत नाहीये. एकतर पैसा हा मुद्दा होता. भाजपा आणि विरोधकांमध्ये आर्थिक पाठबळात किती फरक होता? यावर कुणीही नेमका आकडा सांगू शकणार नाही. पण जाहिरातींवर दोन्ही बाजूंनी केलेला खर्च पाहिला तर भाजपानं काही ठिकाणी विरोधकांपेक्षा ५० पट, तर काही ठिकाणी १०० पट खर्च केलाय. हे सगळं वैध पैशाच्या बाबतीत. काळ्या पैशाच्या बाबतीत तर आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे अमर्याद पैसा असताना विरोधी पक्ष त्यांच्या स्वत:च्या बँक अकाऊंटमधील पैसाही वापरू शकत नव्हते”, अशा शब्दांत योगेंद्र यादव यांनी निवडणुकीवर भाष्य केलं.

“काही अपवादात्मक वाहिन्या वगळता इतर सर्वांनी या निवडणुकीत जे काही केलं, ते अत्यंत लाजिरवाणं आहे. ते सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते म्हणूनच काम करत होते. ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी विरोधकांनाच जाब विचारून जबाबदार धरत होते. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला जात होता”, असं त्यांनी नमूद केलं.

“संस्थात्मक ताकदीचा विचार केला तर प्रशासन, पोलीस, ईडी, आयटी हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होतं. सूरत आणि इंदौरमध्ये जे घडलं ते फक्त कुठल्यातरी दुर्गम भागातल्या सरपंचपदाच्या निवडणुकीतच घडू शकतं. हे लोकसभेच्या निवडणुकीत होऊ शकत नाही. पण ते घडलं”, असं योगेंद्र यादव म्हणाले.

निवडणूक आयोगावर डागली तोफ!

दरम्यान, यावेळी योगेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगावरही तोफ डागली. “निवडणूक आयोगानं त्यांच्या पदाला आणि संस्थेच्या सन्मानाला काळिमा फासणारं काम केलं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात मी निवडणूक आयोगाचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम केलं आहे. त्यावेळी सर्व देशांच्या किमान १०० मुख्य निवडणूक आयुक्तांना भारतीय निवडणूक आयोग किती चांगलं काम करतोय हे सांगण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाचा एक माजी दूत म्हणून मला त्यांच्या कामगिरीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे”, अशा शब्दांत योगेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं.

Video: “…तर अधिक कठीण काळ येऊ शकतो”, लोकसभा निकालांवर योगेंद्र यादवांचं मोठं विधान; म्हणाले, “मोदी-शाहांना…”!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारादरम्यान अशा गोष्टी बोलत होते ज्या फक्त आदर्श आचारसंहितेचंच उल्लंघन करत नव्हत्या, तर देशाच्या दंडसंहितेत परवानगी नसलेल्याही गोष्टी त्यात होत्या. पण त्यांच्यावर निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही. अशा स्थितीत या निवडणुकांकडे आपण जर पाहात असू, तर या सामान्य निवडणुका मानता येणार नाहीत”, असंही ते म्हणाले.

“याला विजय म्हणाल की पराभव?”

“४०० पारची घोषणा अजिबात विसरू नका. हा दावा सत्ताधाऱ्यांनी स्वत: केला होता. संपूर्ण माध्यमांनी तो उचलून धरला होता. सर्व पोलस्टार्सनं त्याच बाजूने कल दिला होता. निवडणूक काळात जे काही वृत्तांकन झालं, त्याचा पूर्ण बाज हा ‘येणार तर मोदीच’ असा होता. जर ते २९० पर्यंत खाली आले आहेत, जर त्यांच्या विक्रमी बहुमताचे दावे केले जात असताना त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आला नसेल, तर त्याला तुम्ही विजय म्हणाल की पराभव? हे एक अत्यंत साधं राजकीय गणित आहे”, असं म्हणत योगेंद्र यादव यांनी भाजपाच्या दाव्यावर खोचक टिप्पणी केली.