Premium

“हा ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’चा खेळ नाही”; सगळे अंदाज बरोबर आल्यानंतर योगेंद्र यादव काय म्हणाले?

स्वराज इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केलेले अंदाज अचूक आले आहेत.

Yogendra Yadav poll predictions were right loksabha election 2024 vsh
स्वराज इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव (छायाचित्र : योगेंद्र यादव / फेसबुक)

लोकसभा निवडणुकीचे चित्र एव्हाना बऱ्यापैकी स्पष्ट झाले असून भाजपाने आपले बहुमत गमावले आहे. भाजपा एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करणार नसला तरीही एनडीए आघाडीला बहुमत प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होतील, असे चित्र आहे. एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आलेले सगळे अंदाज फोल ठरले असून इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. निवडणुकीआधी अनेकांनी अंदाज व्यक्त केले होते. त्यापैकी स्वराज इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केलेले अंदाज बऱ्यापैकी अचूक आले आहेत. त्यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

निकालावर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया

स्वराज इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव म्हणाले की, आज खूप मोठा दिवस आहे. तुमचे अंदाज बरोबर आल्याचे म्हणत आज खूप लोकांनी फोन करुन अभिनंदन केलेले आहे. मात्र, माझे अंदाज बरोबर आले, ही काही फार मोठी गोष्ट नाही. हा काही ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’चा खेळ नाही. हा देश पुढे कशी वाटचाल करेल, याची हे निश्चित करणारी ही निवडणूक होती. राज्यघटना वाचेल की नाही, याची हे ठरवणारी ही निवडणूक होती. ‘तंत्र’वर ‘लोकां’चा विजय झाला आहे, असे आज नक्कीच म्हटले जाऊ शकते. एकाबाजूला सगळे ‘तंत्र’ वापरले जात होते. सर्वाधिक पैसे भाजपाकडे असल्याने इतर पक्षांपेक्षा शंभरपट खर्च त्यांनीच केला होता. पोलीस प्रशासन, ईडी, आयटी आणि दुर्दैवाची बाब म्हणजे निवडणूक आयोगदेखील त्यांच्या बाजूने काम करत होता. सगळी माध्यमे भाजपाचे प्रचारतंत्र राबवत होती. असे असूनही या देशातील जनतेने दाखवून दिले की, आमचा ‘लोकतंत्र’वर विश्वास आहे. त्यामुळे, हा या देशासाठी फार मोठा दिवस आहे.”

“संविधानाशी छेडछाड करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही”

पुढे ते म्हणाले की, “सरकार कुणाचेही येवो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, संविधानाशी छेडछाड करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही. मला आशा आहे की, खुर्चीवर कुणीही बसो, खुर्चीला प्रश्न विचारण्याची हिंमत या देशामध्ये पुन्हा प्राप्त होईल. आता आशा आहे की, माध्यमांनाही कंठ फुटेल. न्यायव्यवस्थेचे डोळेही अधिक चांगल्याप्रकारे पाहू शकतील. प्रशासनही थोडे प्रामाणिकपणे काम करायला सुरु करेल. हा या देशातील पक्षांचा नव्हे तर जनतेचा विजय अधिक आहे. ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’ असे म्हणतात, ते काही खोटे नाही. आज तेच सिद्ध झाले आहे. म्हणूनच मला असे वाटते की, हा भारताच्या लोकशाहीसाठी सर्वांत मोठा दिवस आहे.”

हेही वाचा : Loksabha Election Results 2024: भाजपाला फटका! तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालवर पुन्हा वर्चस्व

योगेंद्र यादव यांनी निवडणुकीपूर्वी काय मांडले होते अंदाज

योगेंद्र यादव यांनी सर्व प्रकारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे असल्याचा स्पष्टपणे दावा केला होता. त्यांनी निवडणुकीपूर्वीच काही अंदाज व्यक्त केले होते. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भाजपाला २४० ते २६० जागा मिळतील, तर एनडीएतील इतर घटकपक्षांना ३५-४५ जागा मिळतील, असा म्हटले होते. दुसरीकडे, काँग्रेसला ८५ ते १०० जागा तर इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांना १२० ते १३५ जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे त्यांनी व्यक्त केलेले सगळे अंदाज बरोबर आले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपाला २३९ तर एनडीए आघाडीला २९३ जागा मिळतील असे चित्र आहे; तर काँग्रेसला ९९ आणि इंडिया आघाडीला २३२ जागा प्राप्त होत असल्याचे सध्याचे आकडेवारी सांगते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yogendra yadav poll predictions were right loksabha election 2024 vsh

First published on: 04-06-2024 at 20:04 IST
Show comments