G7 Summit 2024: १३ जून रोजी इटलीत G7 शिखर परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचे आगमन विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर घडलेल्या एका घटनेने साऱ्या जगाचेच लक्ष वेधले आहे. ही घटना म्हणजे, इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची झालेली विटंबना; ही विटंबना खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून करण्यात आली. त्याच निमित्ताने नेमके काय घडले आणि खलिस्तानी समर्थक महात्मा गांधींचा एवढा दुस्वास का करतात, हे जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटलीत नेमके काय घडले?

इटलीमध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे बुधवारी अनावरण झाले आणि त्यानंतर काही वेळातच खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या पुतळ्याच्या पादपीठावर (पेडस्टल) खलिस्तानी समर्थकांकडून खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल वादग्रस्त मजकूरही लिहिण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ सदर परिसर स्वच्छ करून घेतल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

अधिक वाचा: Gandhi Jayanti: अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महात्मा गांधींनी कशी प्रेरणा घेतली?

ही घटना G7 शिखर परिषदेच्या एक दिवस आधी घडली. या संदर्भांत परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग हा गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 परिषदेतील निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी महत्त्वाची संधी असेल. क्वात्रा यांनी या (पुतळा विटंबना) प्रकरणाची चर्चा इटालियन अधिकाऱ्यांशी करणार असल्याचेही सांगितले. किंबहुना ते पुढे म्हणाले, आम्ही या प्रकरणाची शहानिशा केली आहे. इटालियन अधिकाऱ्यांकडून या विषयी योग्य ती दखल घेतली आहे. या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना इटलीतील भारतीय राजदूत वाणी राव म्हणाल्या, ही घटना दक्षिण इटलीमधील ब्रिंडिसी नावाच्या गावात झाली आहे. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी गांधीजींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी योग्य ती स्वच्छता केली आहे. आम्ही त्यांच्याकडे आमच्या समस्या मांडल्या असून या घटनेला जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन स्थानिक कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

गेल्यावर्षीही अशीच एक घटना घडली होती. खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. म्हणूनच खलिस्तानी समर्थकांना गांधीजींचा दुस्वास का, या प्रश्नाचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते.

खलिस्तान ही मूलतः स्वतंत्र शीख राज्याची मागणी करणारी चळवळ आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शीखांचा एक वेगळा देश अस्तित्त्वात यावा यासाठी ही चळवळ सुरु झाली होती. परंतु कालांतराने या चळवळीचे स्वरूप बदलले आहे. स्वतंत्र भारतात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’च्या माध्यमातून ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु आजही या चळवळीची पाळेमुळे जिवंत आहेत.

खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधीजींना होणाऱ्या विरोधासाठी ऐतिहासिक आणि वैचारिक कारणे आहेत. ती तीन टप्प्यांमध्ये समजावून घेणार आहोत.

अधिक वाचा: महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट आणि राम यांचा नेमका काय संबंध आहे?

१. चळवळीची सुरुवात आणि भारताची फाळणी:

१९४० साली लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर डॉ. वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली होती. परंतु महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारतातच शीख समुदायाला अर्धी स्वायत्तता देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा मागे पडला. याबद्दल महात्मा गांधींना खलिस्तानसमर्थक दोषी मानतात. महात्मा गांधीजींनी शिखांच्या हितसंबंधांचा आणि आकांक्षांचा विश्वासघात केला अशी खलिस्तानसमर्थकांची धारणा आहे.

२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका

महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) प्रमुख नेते होते. खलिस्तानसमर्थक अनेकदा गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करतात, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आणि नंतरही शीख समुदायाला भेडसावणारे प्रश्न, समस्या यांच्याकडे लक्षच दिले नाही असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो.

३. स्वातंत्र्योत्तर धोरणे

भारत स्वतंत्र झाल्यावरही खलिस्तानची मागणी इंग्लंडमधील चरणसिंह पंथी आणि आणि डॉ. जगजित सिंह चौहान यांनी लावून धरली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारत सरकार आणि शीख समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशेषत: प्रादेशिक स्वायत्तता, भाषा धोरणे आणि आर्थिक असमानता यासारख्या धोमुद्द्यांवरून, काही शीखांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. खलिस्तान समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, महात्मा गांधींच्या अखंड भारताच्या दृष्टीकोनाने शिखांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले गेले, यामुळे शिखांमध्ये उपेक्षिततेची भावना निर्माण झाली.

सारांश, खलिस्तानचा महात्मा गांधींना होणारा विरोध हा ऐतिहासिक आहे, शीख हितसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष आणि भारतातील शीख स्वायत्तता आणि स्वयंनिर्णयाच्या आकांक्षांना हानिकारक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रणांच्या संयोगातून हा विरोध निर्माण झाल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bust of mahatma gandhi was vandalised in italy by khalistani extremists why do khalistani supporters hate gandhiji svs
First published on: 15-06-2024 at 09:14 IST