Who is Mushfiqul Fazal Ansarey: बांगलादेशच्या नवीन अंतरिम सरकारने मुश्फिकूल फजल अन्सारी यांची राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. अन्सारी हे अमेरिकास्थित पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते होते. ही त्यांची व्यावसायिक ओळख असली तरी त्यांची खरी ओळख त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर केलेल्या तिखट टीकेसाठी आहे. त्यामुळेच या नव्या नियुक्तीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या निर्णयामागील हेतूंबद्दल प्रश्नही विचारले जात आहेत.

मुश्फिकूल फजल अन्सारी कोण आहेत?

सुमारे एक दशक स्वतःच्या इच्छेने अमेरिकेत घालवल्यानंतर मुश्फिकूल फजल अन्सारी हे १२ सप्टेंबर २०२४ रोजी बांगलादेशात परतले. शेख हसीना सरकार पडल्यानंतर ते मायदेशी परतले आणि त्यानंतर लगेचच त्यांची एका वरिष्ठ राजनैतिक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नवीन तीन वर्षांच्या करारामुळे त्यांना बांगलादेशाच्या परराष्ट्र राजनैतिक मोहिमांमध्ये एक प्रमुख भूमिका मिळाली आहे, तरीही त्यांना कोणत्या देशात नियुक्त केले जाणार आहे हे अद्याप उघड झालेले नाही. बांगलादेशच्या सार्वजनिक प्रशासन मंत्रालयाने (Bangladeshi Ministry of Public Administration) अन्सारी यांच्या नियुक्तीबाबत एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यात त्यांना इतर कोणतेही व्यावसायिक काम करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा: बांगलादेशातील ‘ढाकेश्वरी’ला मुस्लीम विद्यार्थ्यांचा पहारा; काय सांगतो या हिंदू मंदिराचा इतिहास?

मुश्फिकूल फजल अन्सारी यांची राजकीय कारकीर्द कशी घडली?

मुश्फिकूल फजल अन्सारी यांची राजकीय कारकीर्द तशी बरीच मोठी आहे. २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) प्रमुख आणि त्यावेळच्या पंतप्रधान खालिदा झिया यांच्यासाठी सहायक प्रसारमाध्यम सचिव म्हणून काम केले होते. ही भूमिका त्यांच्या राजकीय संबंधांना बळकटी देणारी होती. मीडिया क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीनेही त्यांची ओळख अधिक व्यापक झाली. त्यांनी बांगलादेश टेलिव्हिजनसाठी (BTV) अँकर म्हणून आणि द डेली इत्तेफाकसाठी रिपोर्टर म्हणून काम केले आहे. शिवाय, ‘हॅलो एक्सलन्सी’ या एनटीव्हीवरील कार्यक्रमामुळे त्यांची प्रसिद्धी वाढली. या कार्यक्रमात त्यांनी परदेशी राजनीतिज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या.

मुख्य विरोधी पक्षनेत्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या बेगम खालिदा झिया, माजी सेनापती
आणि लष्करी शासक राष्ट्रीय पक्षाचे हुसेन मोहम्मद इरशाद
आणि जमात-ए-इस्लामी पक्षाचे मौलाना मतिउर रहमान निजामी यांची ढाका येथे मे ९ मे. २००० रोजी झालेली भेट. फाइल इमेज/रॉयटर्स

अन्सारी यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये विविध पदे भूषवली आहेत. त्यांनी परराष्ट्र धोरणावरील मासिक साऊथ एशिया पर्स्पेक्टिव्ह्सचे कार्यकारी संपादक आणि JustNewsBD या ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मसाठी व्हाईट हाऊसचे पत्रकार म्हणून काम केले आहे. अमेरिकेत असताना, त्यांचे काम मुख्यतः शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात बांगलादेशमधील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि राजकीय भ्रष्टाचार यांबद्दल चिंता व्यक्त करण्यावर केंद्रित होते. त्यांनी अनेकदा अमेरिकी गृह विभाग आणि संयुक्त राष्ट्रांच्या परिषदांमध्ये हे मुद्दे लावून धरले होते.

मुश्फिकूल फजल अन्सारी यांना भारतविरोधी म्हणून का पाहिले जाते?

अन्सारी यांनी पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या रोखठोक प्रश्न विचारण्याच्या शैलीसाठी नाव कमावले आहे. विशेषत: भारत सरकारच्या बांगलादेशातील अंतर्गत घडामोडींमधील सहभागाबद्दल त्यांनी सातत्याने प्रश्नचिह्न निर्माण केले होते. २०२४ च्या मार्च महिन्यात यू एस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांच्याबरोबर झालेल्या एका पत्रकार परिषदेत अन्सारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा आणि काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांच्या गोठवण्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्यामुळे राजनैतिक खळबळ निर्माण झाली होती. या वक्तव्यांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतावासातील डेप्युटी चीफ ऑफ मिशन ग्लोरिया बर्बेना यांना समन्स जारी करून अन्सारी यांच्या वक्तव्यांबद्दल निषेध नोंदवला.

अन्सारी यांनी २०२४ च्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांवर कथितपणे सुरू असलेल्या संगठित कारवाईकडेही लक्ष वेधले. त्यांनी याबाबत संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ते स्टेफान दुजारिक यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. यामुळे राजनैतिक तणाव निर्माण झाला होता. २०१५ साली, बांगलादेशच्या संयुक्त राष्ट्र मिशनने त्यांच्यावर पत्रकार म्हणून कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास आक्षेप घेतला होता. या आक्षेपामागे त्यांच्या सक्रिय राजकीय संबंधांचा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भात, मिशनच्या प्रसारमाध्यम सचिवांनी ‘सक्रिय राजकारणी’ व्यक्तींना प्रेस कार्ड दिल्याचा उल्लेख केला. हा सूचक उल्लेख अन्सारी यांच्या पत्रकारिता आणि राजकारणातील भूमिकेकडे निर्देश करणारा होता.

या वर्षाच्या सुरुवातीला अन्सारी एका वादग्रस्त प्रसंगात अडकले होते. त्यांनी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाचा चुकीचा संदर्भ देत भारताने बांगलादेशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा दावा केला होता. या चुकीच्या विधानानंतरही, अन्सारी यांना माध्यम आणि राजनैतिक वर्तुळात महत्त्वाचे स्थान आहे. ९ ऑक्टोबर रोजी X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये अन्सारी यांनी अमेरिकेच्या गृह खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांच्या प्रतिक्रियेचे सार पोस्ट केले होते: त्यात म्हटले होते की “… बांगलादेशातील मुद्दे भारतीय अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत अनेकदा समोर येतात, कारण माजी हुकूमशहा हसीना सध्या भारतात आहेत आणि बांगलादेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

अधिक वाचा: Bangladesh Sheikh Hasina: १९७५ ते २०२४ – मुजीब यांची हत्या ते लष्करी राजवट; बांगलादेशातील राजकारणात लष्कराची भूमिका महत्त्वाची का?

अन्सारी यांच्यावरील आरोप

बांगलादेशच्या माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांनी एकदा अन्सारी यांच्यावर ‘बीएनपीकडून पैसे घेतल्याचा’ आरोप केला होता तसेच त्यांच्यावर हसीना सरकारला लक्ष्य करण्यासाठी मुद्दाम प्रश्न विचारण्याचा आरोप केला होता. २०२२ साली, अन्सारी आणि इतर दोन जणांवर बांगलादेशातील बदनामीकारक डिजिटल सुरक्षा कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये “देशाची प्रतिमा मलीन केल्याचा” आरोप होता.

अन्सारी यांची नियुक्ती त्यांनी, बजावलेल्या भूमिकेचा मोबदला आहे का?

अन्सारी यांची राजनैतिक दूत म्हणून केलेली नियुक्ती त्यांच्या अनेक वर्षांच्या अवामी लीगविरोधातील ठाम भूमिकेसाठी दिलेले बक्षीस म्हणून पाहिले जात आहे. अन्सारी हे शेख हसीना यांच्या नेतृत्वाचे प्रखर टीकाकार होते. त्यांनी वॉशिंग्टनमधील आपल्या व्यासपीठाचा वापर करून राजकीय दडपशाही आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या मुद्द्यांवर हसीना सरकारला आव्हान दिले होते. याच पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांना बीएनपी सरकारकडून काय अपेक्षा आहे याबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी बीएनपीचे प्रतिनिधित्व करत नाही, त्यामुळे त्यांच्या वतीने बोलू शकत नाही.” तरीसुद्धा, बीएनपीच्या नेतृत्वाशी त्यांचा जवळचा संबंध आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्यासाठी त्यांनी केलेले काम यामुळे त्यांचा बीएनपीशी असलेला राजकीय हितसंबंध उघड आहे, असे अनेकांचे मत आहे. विशेष म्हणजे, २००६ साली अन्सारी हे खालिदा झिया यांच्याकडून मोहम्मद युनूस यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र देणाऱ्या सरकारी शिष्टमंडळाचा भागही होते.