दिल्लीतील कथित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीने गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास आणि कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल हे अटक झालेले आजवरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षातील ते तिसरे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनादेखील मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर, या अटकेविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान आप मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आता पक्षाचे अनेक नेते अटकेत असल्याने पक्षाचे काय होणार? आगामी निवडणुकीत पक्षावर याचा किती परिणाम होणार? केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यास पक्षाचे नेतृत्व कोण करणार? याबद्दल जाणून घेऊ या.

कथित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

केजरीवाल राजीनामा देणार?

आपच्या नेत्यांनी त्यांच्या अटकेनंतर जे विधान केले आहे, त्या विधानावरून केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत, हे स्पष्ट होते. दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कार्यरत राहतील आणि तुरुंगातून सरकार चालवतील. “अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील… याबद्दल कोणतेही दुमत नाही, असे आतिशी यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले. “आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत की, गरज पडल्यास ते तुरुंगातून काम करतील. त्यांना असे करण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही”, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीचे आरोग्य आणि शहर विकास मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही तेच मत व्यक्त केले. “दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख बदलण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही याआधीही सांगितले आहे की, जर त्यांना अटक झाली, तर ते तुरुंगातूनच काम करतील आणि ही भूमिका बदललेली नाही. मात्र, तुरुंगातून सरकार चालवणे सोपे नाही. यात अनेक कायदेशीर आणि घटनात्मक आव्हाने आहेत.”

यापूर्वी सत्येंद्र जैन (वेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक) आणि सिसोदिया यांसारख्या आपमधील अनेक मंत्र्यांनी जामीन नाकारल्यानंतर राजीनामा दिला आहे.

केजरीवालांच्या अनुपस्थितीत ‘आप’चे नेतृत्व कोण करणार?

केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तरी पक्षाला सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असेल, जो प्रत्यक्ष आप आणि दिल्ली सरकार चालवू शकेल. अरविंद केजरीवाल दैनंदिन कामकाजाबरोबर देशाच्या इतर भागांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच केजरीवाल ‘आप’चा चेहरा आहेत.

परंतु, आता त्यांच्या अटकेमुळे पक्षाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. सिसोदिया, जैन आणि संजय सिंहसारखे आपचे वरिष्ठ नेते आधीच तुरुंगात आहेत. त्यामुळे या नावांव्यतिरिक्त योग्य नेता शोधणे पक्षासाठी आव्हान आहे. २०१२ मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पक्षातील काही सक्षम नेत्यांमध्ये आतिशी, भारद्वाज, राघव चढ्ढा, गोपाल राय आणि संदीप पाठक यांच्या नावांचा समावेश आहे. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता, कॅबिनेट मंत्री आतिशी आणि भारद्वाज पक्षातील जबाबदार्‍या सांभाळत आहेत. सुनीता या माजी भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी आहेत.

शिक्षण, वित्त, पीडब्ल्यूडी, महसूलसह दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक खाते सांभाळलेल्या आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात. त्या पक्षाच्या प्रवक्त्या असून त्यांनी आप सरकार आणि अरविंद केजरीवाल यांचा बचाव केला आहे. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत आणि वृत्त वाहिन्यांवरील उपस्थितीत त्यांनी भाजपावर हल्ला केला आहे.

आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

दिल्ली मंत्रिमंडळातील आणखी एक प्रमुख सदस्य म्हणजे सौरभ भारद्वाज. त्यांच्याकडे आरोग्य आणि शहरी विकासासह महत्त्वाची खाती आहेत. भारद्वाजदेखील अनेकदा पक्षाच्या नेत्यांचा बचाव करताना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) व केंद्रातील सरकारवर निशाणा साधताना दिसतात.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (पीटीआय) वृत्तानुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील योग्य दावेदार असू शकतात. ते पंजाबमधील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत, परंतु ते दिल्लीला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्ली आणि पंजाबसह गुजरात आणि गोव्यातही आपचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणुकाही असणार आहेत. त्यामुळे यावर पक्षाला त्वरित काम करावे लागणार आहे.

लोकसभेतील संधी धोक्यात?

दिल्लीमध्ये पक्षाचे चार, तर गुजरातमध्ये पक्षाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा प्रचार केजरीवाल यांच्याभोवती केंद्रित आहे. “संसद में भी केजरीवाल, तो दिल्ली होगी और खुशहाल” हे दिल्ली मोहिमेचे शीर्षक असून, गुजरातमध्ये “गुजरात में भी केजरीवाल” असा नारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये, मान हा ‘आप’चा चेहरा आहेत, तर केजरीवालदेखील वारंवार पंजाबला भेट देत असतात. पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती न करता पक्ष सर्व १३ जागा लढवत आहेत. परंतु, केजरीवाल यांनी दिल्ली, गुजरात आणि हरियाणामध्ये काँग्रेसबरोबरच्या युतीवर शिक्कामोर्तब केल्याने अटकेचा फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज आहे.

पक्ष या अटकेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घेईल आणि जनतेची सहानुभूती गोळा करेल, असे चित्र आहे. “मुख्यमंत्र्यांना खोट्या खटल्यात शिक्षा झाली, त्यांच्या वृद्ध आई-वडिलांशी केंद्र सरकारचे काय वैर? त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही. कोणीही सहानुभूती दाखवू शकत नाही आणि ते नाराज आहेत”, असे भारद्वाज यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

आतिशी यांनी केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात प्रथमच एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना Z+ सुरक्षा आहे. आता ते केंद्र सरकारच्या ईडीच्या ताब्यात आहेत. आम्ही त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहोत”, असे त्यांनी लिहिले.

हेही वाचा : बॉम्बस्फोटाप्रकरणी वादग्रस्त विधानावर कारवाई, कोण आहेत ‘या’ भाजपाच्या खासदार?

भाजपा मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांजवळ सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याच ठिकाणावर आप नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता आहे. “मद्य घोटाळा प्रकरणामुळे केजरीवाल यांची प्रतिमा काही प्रमाणात खराब झाली असेल, परंतु त्यांच्या योजनांचा फायदा झालेल्या मूळ मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. लोक अजूनही त्यांना दिल्लीतील सर्वोत्तम नेता मानतात. ‘आप’ला आशा आहे की, केजरीवाल यांच्या अटकेमुळे १२ वर्षे जुना पक्ष आणखी मजबूत होईल”, असे ‘मनीकंट्रोल’मधील ज्येष्ठ पत्रकार औरंगजेब नक्शबंदी लिहितात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal arrest loksabha poll new cm candidate rac