बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका कवितेवर सध्या प्रचंड टीका होत आहे. ‘जंगलात ठरली मैफल’ असे या कवितेचे नाव असून, या कवितेमध्ये काही इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’, या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी या कवितेचे छायाचित्र पोस्ट करीत म्हटले आहे, “हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक! कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे ‘वन्स मोर वन्स मोर झाला शोर…’ किमान मराठी भाषा शिकवताना तरी मराठी शब्द वापरायला हवेत, असे वाटत नाही का? तुमचे मत काय?” त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर या कवितेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एकूणच बालभारतीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम, त्यामध्ये निवडले जाणारे साहित्य आणि निवडसमिती आणि त्यातील हितसंबंध या अनुषंगाने लोक टीका करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवितेचा आशय आणि त्यावरील आक्षेप काय?

ही कविता पूर्वी भावे यांची असून त्या माध्यम क्षेत्रात कार्यरत आहे. निवेदक, नृत्यांगना म्हणून त्या सुप्रसिद्ध असून इयत्ता तिसरीला असताना त्यांनी स्वत: ही कविता लिहिली होती. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एक आनंदाची बातमी जरा उशिरा शेअर करत आहे. इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात माझी कविता अभ्यासाला आहे. ही कविता मी स्वतः तिसरीत असताना लिहिली होती. वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती, वाद्यांची माहिती आणि कवीचं वय या निकषांवर ही कविता शैक्षणिक समितीने निवडली आहे. एक वेगळी अचीव्हमेंट!”

या कवितेमध्ये जंगलात जमलेल्या प्राण्यांच्या मैफलीचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामध्ये अस्वल, हत्ती, कोल्होबा, वाघोबा, अशी प्राण्यांची नावेही आहेत. मात्र, कवितेच्या काही कडव्यांमध्ये हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. विशेषत: या कवितेतील ‘बात’, ‘शोर’ व ‘वन्स मोर’ या शब्दांवर आक्षेप घेतला जात आहे. ही कविता सुमार दर्जाची असून, बालभारती मंडळ अशा कवितांची निवड कोणत्या निकषांवर करते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या कवितेवर टीका करताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी, ‘या कवितेची निवड कुणी आणि का केली’, असा उद्विग्न सवाल आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे. अभिनेता किरण माने यांनी म्हटले आहे, “सरकारी संस्थांशी संबंधित सगळ्या क्षेत्रात असे सुमार दर्जाचे लोक भरलेले आहेत.” अभिनेते व लेखक अक्षय शिंपी यांनी या कवितेसंदर्भात म्हटले आहे, “बालकविता, बडबडगीतं लिहिणं ही फारच जबाबदारीची गोष्ट आहे. मॅड विचार, कल्पनाविलास, भाषा वाकवायची क्षमता, तिच्याशी खेळण्याची क्षमता, गेयता आदी बाबींचा कस इथे लागतो. बडबडगीतांना उच्च साहित्यमूल्य असतं. शिशूवर्गात असताना ऐकलेली बडबडगीतं अजूनही लक्षात आहेत. ती पिढ्यान् पिढ्या नदीसारखी प्रवाही असतात. उर्दू भाषेत एक शेर लिहायचा असेल, तर त्यापूर्वी किमान पाच हजार उत्तम शेर वाचण्याची पूर्वअट असते; किंबहुना सक्तीच असते. ही सक्ती मराठीतदेखील लागू करायला हवी, असं वाटलं. तळटीप : दोष कवयित्री किंवा कवितेचा नसून, ती निवडणाऱ्यांचा आहे.”

दुसऱ्या बाजूला काहींनी कवितेतील शब्दांचे समर्थनही केले आहे. कौस्तुभ खांडेकर यांनी “इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या कवितेवरून एवढा कालवा करण्यासारखं नक्की काय आहे” असा सवाल केला आहे. वन्स मोर, वन्स मोर हे शब्द सर्रास कुठल्याही कार्यक्रमात बोलले जातात. जी भावना तिथे दाखवायची आहे, त्याला वन्स मोर या शब्दांऐवजी पर्यायी मराठी शब्द मला माहीत नाहीत. शोर हा एकमेव शब्द अप्रस्तुत वाटू शकतो; पण तेवढं कवयित्रीनं घेतलेलं स्वातंत्र्य म्हणता येणार नाही का”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे, “मराठी भाषा टिकवायची पद्धती आणि त्याबद्दलचा ग्रामरनाझी आग्रह मराठी भाषेपासून मुलांना लांब नेतो आहेच, अजून किती नेणार?”

हेही वाचा : जो बायडेन यांची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार… पुढे काय होणार?

इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकातील वादग्रस्त कविता

शिक्षणतज्ज्ञांना काय वाटते?

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या संदर्भात म्हटलेय, “मला या कवितेतील इंग्रजी-हिंदी शब्दांवर फारसा आक्षेप नाही; मात्र त्यामध्ये प्रतिभेची चमक जाणवलीच नाही. लहान मुलांना अद्भुतरम्यता अपेक्षित असते. ती या कवितेत अजिबातच नाही. कवितेमध्ये फक्त यमक जुळवण्याचा अट्टहास केलेला दिसून येत आहे. उदाहरणार्थ, ‘प्राण्यांची मैफल’ बोलावली म्हणून ‘हत्तीची अक्कल’ काढण्याचा यमक जुळवलेला आहे, त्याला काही अर्थच नाही. इसापनीती आणि पंचतंत्राने आपल्यासमोर अद्भुतरम्य प्राणीविश्वाचे काही मानदंड रचून ठेवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लांडग्याला ‘गुंडू-पांडू’ असे काहीतरी म्हणणे हे आजवर कधीच पाहिलेले नाही. लहान मुलांची उत्सुकता ताणणे वा त्यांच्या कल्पनाशक्तीला गती देणे, अशी कोणतीच अद्भुतरम्यता या कवितेमध्ये दिसत नाही. पाडगांवकर वा विंदांच्या कवितेमध्ये धक्कादायक चमत्कृती असायची, तीपण या कवितेमध्ये कुठेच नाही. त्यामुळे त्यातील एखाद्या शब्दावर आक्षेप घेण्यापेक्षा ती कविताच पाठ्यपुस्तकात येण्याच्या दर्जाची वाटत नाही. यमकांची ओढाताण करताना काहीही कल्पना रेखाटल्या आहेत, असे दिसते.”

‘राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ’ म्हणून ‘ऍक्टीव्ह टीचर्स फोरम’ हा गट काम करतो. या गटाचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी या कवितेच्या निवडीवर आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी लोकसत्ताशी बोलताना म्हटले की, “ही कविता बालसाहित्याच्या निकषांवर खरी उतरत नाही. तितकी ती सकसही नाही आणि प्रयोगशील नाही. ट ला ट जोडून केलेले यमक अधिक आहेत. मराठी बालसाहित्याच्या समृद्ध दालनामध्ये याहून अधिक सरस कविता मिळाल्या असत्या. अशा चांगल्या कविता उपलब्ध असूनही त्यांची निवड केली जात नाही, याचे नवल वाटते. पाठ्यपुस्तकातील साहित्य लक्षावधी मुलांपर्यंत जाते आणि त्यांच्यावर परिणाम करते, हे लक्षात घेऊन निवड समितीने दर्जेदार साहित्याची निवड केली पाहिजे.”

पुस्तकनिर्मिती करणाऱ्या बालभारतीच्या निवड समितीवर आक्षेप

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले, “अनेकदा निवड समिती ज्या प्रकारच्या साहित्याची निवड करते, त्यातून महाराष्ट्रातील उच्च प्रतीचे बालसाहित्य पाठ्यपुस्तकामध्ये जात नाही. यामागे हितसंबंध हादेखील भाग असतो. दुसरा भाग म्हणजे लहान मुलांना प्राणी-पक्ष्यांच्या कविता आवडतात म्हणून त्यामध्ये कुणाच्याही कविता घेऊन टाका, असा दृष्टिकोन दिसून येतो. लहान मुलांच्या भावविश्वाला अनुसरून दर्जेदार साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये यावे, अशा दृष्टिकोनाचा स्पष्ट अभाव दिसून येतो.”

बालसाहित्यामध्ये विविध प्रयोग करणारे आणि ‘मूलकेंद्री’ पाठ्यपुस्तकांसाठी आग्रही असणारे प्राथमिक शिक्षक फारुक काझी म्हणाले, “शब्दांवर आक्षेप घेण्यापेक्षा मुळात त्या कवितेतच काही दम नाही. ती कोणत्या निकषांवर निवडली गेली, हाच प्रश्न आहे. प्रश्न एका शब्दाचा वा वाक्याचा नसून कवितेचा निवडीचाच आहे. लहान मुलांच्या कवितांमध्ये, बडबडगीतांमध्ये अधिक गेयता अपेक्षित असते; मात्र, या कवितेमध्ये गेयता नसून ओढून-ताणून यमक जुळवण्याचा प्रयत्न दिसतो. मुद्दा हा आहे की, अशा कविता घेताना निवड समितीनेही विचार केला पाहिजे. मुलांना सहज गुणगुणता येतील अशा दर्जेदार कविता उपलब्ध असताना त्या घेतल्या जात नाहीत, ही खरी समस्या आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : बायडेन यांच्या पाठिंब्यानंतरही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता? ट्रम्पसमोर कितपत संधी?

प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब चासकर म्हणाले की, “पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या समितीमधील किती तज्ज्ञ या वयोगटातील मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे असतात? त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणानंतर प्राथमिक शाळा कधी बघितलेल्या असतात का? पाठ्यपुस्तकासाठी साहित्य निवडताना त्यांना मुलांचे अनुभवविश्व आणि भावविश्वाची किती जाण आणि भान असते? त्यांचा मुलांशी संवाद असतो का, या सगळ्याच बाबी महत्त्वाच्या ठरतात. या गफलती यातूनच होतात, हे समजून घेतले पाहिजे.”

‘बालभारती’ने काय म्हटले?

या वादासंदर्भात ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, “पहिलीचे पुस्तक आणि त्यातील कविता सात-आठ वर्षांपूर्वी छापलेल्या आहेत. मग त्यावर आज कसा काय वाद होत आहे? टीका करणारे करतील; पण त्यात काही चूक असेल, तर आपण ती दुरुस्त करू. ही कविता मी पुन्हा वाचून तज्ज्ञांशी बोलून घेतो.” कवितेत असलेल्या हिंदी आणि इंग्रजी शब्दांबाबतच्या आक्षेपांबाबत त्यांनी सांगितले, “मिनीट या इंग्रजी शब्दाला आपण मराठीत काय म्हणतो? टेबल, पेन असे इंग्रजी शब्द आपण आहेत, तसेच वापरतो. मिनीटला घटिका हा शब्द वापरला, तर लोकांना तो कळणार नाही. तरीही याबाबत मी तज्ज्ञांशी बोलतो.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balbharati first standard marathi poem jangalata tharali maifal controversy poorvi bhave vsh
Show comments