५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना ५० जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. पोलीस यंत्रणा कोलमडल्याने, हिंदू कुटुंबे, संस्था आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागला. बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी ढाका येथील ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली आणि हिंदू समुदायाच्या नेत्यांना आश्वासन दिले की, “आपण सर्व एकच आहोत” आणि “सर्वांना न्याय दिला जाईल”.

सर्वात मोठा अल्पसंख्याक- हिंदू

बांगलादेशच्या आठ विभागांमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण बदलत जाते. मैमनसिंगमध्ये फक्त ३.९४% हिंदू आहेत तर तेच प्रमाण सिल्हेटमध्ये १३.५१ % आहे. बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक पाचवी व्यक्ती हिंदू आहे. ढाका विभागातील गोपालगंज (जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या २६.९४% हिंदू आहेत), सिल्हेत विभागातील मौलवीबाजार (२४.४४% हिंदू आहेत), रंगपूर विभागातील ठाकूरगाव (२२.११% हिंदू आहेत) आणि खुलना विभागातील खुल्ना (२०.७५% हिंदू आहेत) हे काही महत्त्वाचे विभाग आहेत. २०२२ च्या गणनेनुसार १३ जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या १५% पेक्षा जास्त आणि २१ जिल्ह्यांमध्ये १०% पेक्षा जास्त होती.

अधिक वाचा: Bangladesh: बांगलादेशातील ‘ढाकेश्वरी’ला मुस्लीम विद्यार्थ्यांचा पहारा; काय सांगतो या हिंदू मंदिराचा इतिहास?

लोकसंख्येतील घटता वाटा

ऐतिहासिकदृष्ट्या आजचा बांगलादेश घडवणाऱ्या बंगाली भाषक प्रदेशातील लोकसंख्येमध्ये हिंदूंचा मोठा वाटा होता. गेल्या शतकाच्या सुरूवातीस, ते या प्रदेशातील लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश होते. तेव्हापासून लोकसंख्याशास्त्रीय बदल झाले आहेत. १९०१ पासूनच्या प्रत्येक जनगणनेने आजच्या बांगलादेशातील लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा कमी झाल्याचे सूचित केले आहे. ही घट १९४२ आणि १९७४ च्या जनगणनेदरम्यान, म्हणजे बांगलादेश पूर्व पाकिस्तान असताना सर्वात जास्त होती. परंतु, केवळ १९५१ च्या जनगणनेने पूर्वीच्या (१९४१) गणनेच्या तुलनेत हिंदूंच्या परिपूर्ण संख्येत लक्षणीय घट नोंदवली. ही घट सुमारे ११ .८ दशलक्ष ते सुमारे ९.२ दशलक्ष इतकी होती. २००१ च्या जनगणनेत ही संख्या हळूहळू ११.८ दशलक्ष विभाजनपूर्व पातळीपर्यंत पोहोचली. या प्रदेशातील मुस्लिमांची लोकसंख्या १९४१ मध्ये सुमारे २९.५ दशलक्ष वरून २००१ मध्ये ११०.४ दशलक्ष झाली. मुस्लिम लोकसंख्येतील वाढ १९०१ मध्ये अंदाजे ६६.१% वरून आज ९१ % पेक्षा जास्त आहे. ही टक्केवारी या काळात हिंदू लोकसंख्येत झालेल्या घसरणीशी संबंधित आहे. या बदलामागे अनेक घटक आहेत- ज्यात विभाजनापूर्वीच्या कारणांचा समावेश आहे.

प्रजननदर भिन्नता

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मुस्लिमांमधील प्रजननदर ऐतिहासिकदृष्ट्या बंगालमधील हिंदूंपेक्षा जास्त आहे. भारताच्या पहिल्या जनगणनेतील (१८७२) नंतरचा डेटा या गृहीतकाला समर्थन देतो, हे गृहीतक प्रामुख्याने हिंदू-बहुल पश्चिम बंगाल आणि मुस्लिम-बहुल पूर्व बंगाल यांच्यातील तुलनेवर आधारित आहे. अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ डेव्हिड मँडेलबॉम यांनी असा युक्तिवाद केला की, बंगालमधील भिन्न प्रजननदरांवर धर्माचा प्रभाव अप्रत्यक्ष आहे आणि तो प्रामुख्याने शैक्षणिक आणि आर्थिक घटकांद्वारे कार्य करतो (Human Fertility in India, 1974). बंगालमधील मुस्लिम हे निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील होते आणि शिक्षणात मागे होते. हे दोन्ही घटक उच्च प्रजनन दराशी संबंधित आहेत. फाळणीनंतरही हा ट्रेंड कायम राहिला. मुस्लिमांचा एकूण वैवाहिक प्रजननदर (वैवाहिक प्रजननक्षमतेचे आजीवन माप) हिंदूंसाठी ५.६ च्या तुलनेत प्रति स्त्री ७.६ मुलं होती, असे जनसांख्यिकी अभ्यासक जे स्टोकेल आणि एम ए चौधरी यांनी १९६९ च्या यांनी ‘पूर्व पाकिस्तानच्या ग्रामीण भागातील भिन्नता’ द मिलबँक मेमोरियल फंड त्रैमासिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे.

विभाजन आणि स्थलांतर

बंगाल आणि पंजाब हे ब्रिटिश भारतातील दोन प्रांत होते जे भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर विभागले गेले. विभागणी ढोबळ, ढिसाळ आणि अनेकदा अनियंत्रित होती. परंतु, बंगालमध्ये, पंजाबच्या विपरीत, १९४७ मध्ये नवीन सीमा ओलांडून लोकसंख्येची मोठ्या प्रमाणावर, राज्य-सुविधायुक्त देवाणघेवाण झाली नाही. इतिहासकार ज्ञानेश कुडैस्या यांनी लिहिले की ११.४ दशलक्ष हिंदू (अविभाजित बंगालच्या हिंदू लोकसंख्येपैकी ४२ %) फाळणीनंतर पूर्व बंगालमध्ये राहिले. “१९४७ मध्ये, फक्त ३ लाख ४४ हजार हिंदू निर्वासित पश्चिम बंगालमध्ये आले आणि पूर्व पाकिस्तानातील अल्पसंख्याकांमध्ये आशा टिकून राहिली की ते तेथे शांततेने जगू शकतील,” कुडैस्या यांनी लिहिले.(‘Divided Landscapes, Fragmented Identities: East Bengal Refugees and Their Rehabilitation in India, 1947-79’ in The Long History of Partition in Bengal: Event, Memory, Representations, 2024). निर्वासितांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर १९५० आणि १९६० च्या दशकात करण्यास सुरुवात केली. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सामुदायिक संबंधांवर आधारित हा बदल होता.

कुडैस्याने लिहिले: “१९४८ मध्ये सात लाख ८६ हजार लोक भारतात आले आणि १९४९ मध्ये दोन लाख १३ हजारहून अधिक बंगाली निर्वासितांनी सीमा ओलांडून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला… अंदाजे १५ लाख ७५ हजार लोकांनी १९५० मध्ये पूर्व बंगाल सोडले… आणखी एक लाख ८७ हजार निर्वासित आले [१९५१], १९५२ मध्ये आणखी दोन लाख, १९५३ मध्ये ७६ हजार, १९५४ मध्ये एक लाख १८ हजार आणि १९५५ मध्ये दोन लाख ४० हजार लोक भारतात आले… १९५५ मध्ये, जेव्हा पाकिस्तानने ‘इस्लामिक’ राज्यघटना स्वीकारली तेव्हा येणाऱ्या निर्वासितांची संख्या पुन्हा तीन लाख २० हजार झाली.

अधिक वाचा: Bangladesh 1971: चार लाख महिलांवर बलात्कार, ३० लाख मृत्यू; बांगलादेश पुन्हा त्याच वाटेवर आहे का? काय सांगतो इतिहास?

हळूहळू विस्थापनाची ही प्रक्रिया १९६० च्या दशकात सुरू राहिली. आसाम (सध्याचे मेघालय, नागालँड आणि मिझोरामसह), पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये १९५१ आणि १९६१ दरम्यान लोकसंख्येमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली, ज्यामागे मुख्य कारण पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांचे आगमन होते. १९७१ मध्ये स्थलांतराची आणखी एक लाट आली, कारण पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या सहयोगींनी स्वातंत्र्ययुद्धापूर्वी बंगाली लोकांविरुद्ध खुनी मोहीम सुरू केली होती. अंदाजानुसार, या संघर्षादरम्यान सुमारे ९.७ दशलक्ष बंगाली लोकांनी भारतात आश्रय घेतला, त्यापैकी सुमारे ७०% हिंदू होते. “पश्चिम पाकिस्तानी अधिकाऱ्यांना वाटले होते की लाखो पूर्व पाकिस्तानी हिंदूंना भारतात पळून जाण्यास भाग पाडून ते एक राजकीय शक्ती म्हणून बंगाली राष्ट्रवाद कमकुवत करतील,” संजीब बरुआ यांनी २०२१ मध्ये इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

एकुणातच भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बांगलादेशमधील (पूर्व पाकिस्तान) हिंदूंची संख्या घटत राहिली आणि कधीकाळी बहुसंख्य असलेले बांगलादेशी हिंदू हे आज अल्पसंख्याक ठरले.