बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी (२१ जून) भारतात आल्या आहेत. त्या बिमान बांगलादेश एअरलाइन्समधून आपल्या लवाजम्यासह नवी दिल्लीतील पालम विमानतळावर दुपारी साडेतीनला उतरल्या. शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा दोन आठवड्यांच्या आतच दुसऱ्यांदा भारत दौरा होत आहे. हसीना यांनी ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीमध्ये हजेरी लावली होती. शेख हसीना यांच्या या भारत दौऱ्यात काय होणार आहे आणि हा दौरा दोन्ही देशांसाठी का महत्त्वाचा आहे, ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेटीत काय घडण्याची शक्यता?

हसीना यांनी काल शुक्रवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर सखोल चर्चा झाली. या भेटीबाबत माहिती देताना एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर लिहिले आहे, “बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची आज सायंकाळी भेट घेऊन आनंद झाला. त्यांनी भारताला दिलेल्या राजकीय भेटीतून उभय देशांतील घनिष्ठ आणि शाश्वत संबंध अधोरेखित होतात. दोन्ही देशांमध्ये असलेल्या विशेष संबंधांमध्ये अधिक प्रगती होण्यासाठी त्या करीत असलेले मार्गदर्शन वाखाणण्याजोगे आहे.” आज शनिवारी (२२ जून) शेख हसीना यांना राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत करण्यात येईल. इथेच त्यांची पंतप्रधान मोदींसमवेत भेट होईल. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि हसीना यांच्यामध्ये द्विपक्षीय औपचारिक चर्चा होईल. शेख हसीना पंतप्रधान मोदींबरोबर विविध धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा करतील, अशी शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील विविध महत्त्वाच्या विषयांवरील करारांसंदर्भात ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. या द्विपक्षीय चर्चेमधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक उंचीवर नेण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जेच्या दळणवळणासंदर्भातील योजनांच्या वाढीबाबतही चर्चा होईल.

हेही वाचा : ‘एनडीए’ किंवा ‘इंडिया’… दोन आघाड्याच ठरतात लाभदायी… ‘तिसऱ्यां’साठी राजकारण कठीण!

नद्यांच्या पाणीवाटपाबाबत भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. दोन्ही राष्ट्रांमधील पाणीवाटपाच्या समस्यांवरील तोडग्यासाठी भारतासह बांगलादेशकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये गंगा पाणीवाटप करारासंदर्भात, तसेच तीस्ता नदीच्या पाण्यासंदर्भातील वादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशला तीस्ता नदीचा आपला भाग विकसित करायचा आहे. त्यासाठीदेखील ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. तसेच बांगलादेशला भारताकडून कांदा, आले, तांदूळ व गहू यांचा स्थिर पुरवठा हवा आहे. अशा विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारत आणि बांगलादेशदरम्यान वाहणाऱ्या गंगा व तीस्ता या दोन्ही नद्यांच्या पाणीवाटपावरून वाद आहे; तर दुसऱ्या बाजूला चीनने बांगलादेशला तीस्ता नदीच्या विकास प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर्सचा प्रकल्प हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चीन व बांगलादेशमध्ये होऊ घातलेल्या अशा प्रकारच्या प्रकल्पाबाबत भारताने सावधगिरी बाळगणे पसंत केले आहे. या विषयांशिवाय पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना म्यानमारमधील परिस्थितीबाबतही चर्चा करण्याची शक्यता आहे, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. तसेच मोंगला बंदराच्या वापराबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. हे बांगलादेशातील दुसरे सर्वांत मोठे बंदर आहे. भारत इराणच्या चाबहार बंदर किंवा म्यानमारच्या सित्तवे बंदराचा विकास करण्याचा विचार करीत आहे. या बंदराचा विकास करण्याच्या मोबदल्यात भारताला इराणमार्गे मध्य आशिया आणि युरेशियातील बाजारपेठ व्यापारासाठी लाभेल, असे सांगितले जाते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षणासंदर्भातील भागीदारी वाढविण्याबाबतही चर्चा केली जाऊ शकते. भारताने बांगलादेशला त्यांच्या संरक्षण क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी ५०० दशलक्षांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. अद्याप याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

ही भेट का महत्त्वाची?

जानेवारीपासून आपल्या पंतप्रधानपदाचा पाचवा कार्यकाळ सुरू केल्यानंतर हसीना यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांनी सप्टेंबरपासून भारताला तिसऱ्यांदा भेट दिली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांना बांगलादेशकडून दिले जात असलेले महत्त्व अधोरेखित होते. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भारताला अशा प्रकारची राजकीय भेट देणाऱ्या त्या पहिल्याच परदेशी पाहुण्या आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील लष्करी युद्ध सरावाबाबतची चर्चाही होऊ शकते. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना या जुलैमध्ये चीनचा दौरा करण्यापूर्वी भारताला भेट देण्यास उत्सुक होत्या. यातून बांगलादेश भारत आणि चीन या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवू इच्छित असल्याचे दिसते. ९ जून रोजी राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडला. या समारंभाला उपस्थित राहिलेल्या भारताच्या शेजारील देशांमधील प्रमुख नेत्यांमध्ये शेख हसीना यांचा समावेश होता. या समारंभाला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड व भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते. मालदीव, बांगलादेश, नेपाळ व भूतानचे पंतप्रधान त्यांच्या मंत्र्यांसोबत उपस्थित होते. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार शपथविधीनंतर मोदींनी सर्व नेत्यांची आटोपशीर भेट घेतली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकूणच धोरणात्मक संबंधांमध्ये काही वर्षांपासून वाढ होताना दिसत आहेत.

हेही वाचा : ‘नीट’, ‘नेट’ घोळामुळे चर्चेत असलेली ‘एनटीए’ संस्था नेमकी काय करते?

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणांतर्गत बांगलादेश हे महत्त्वाचे राष्ट्र ठरते. उभय देशांमध्ये सुरक्षा, व्यापार, वाणिज्य, ऊर्जा, दळणवळण, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण व सागरी व्यवहार यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी आहे. बांगलादेश हा दक्षिण आशियातील व्यापारामधील भारताचा सर्वांत मोठा भागीदार देश आहे; तर दुसऱ्या बाजूला भारत हा बांगलादेशचा आशियातील दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. बांगलादेशमधील उत्पादनांच्या निर्यातींसाठी भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे. २०२२-२३ मध्ये बांगलादेशने जवळपास दोन अब्ज डॉलर्सची निर्यात भारतात केली आहे. २०२२-२३ मध्ये दोन्ही देशांमध्ये १५.९ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh pm sheikh hasina meets pm modi on her second trip to india in 2 weeks vsh
Show comments