बारसू येथे घडत असलेल्या घडामोडींमुळे अनेक राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे कोकणात सुरु आहेत. त्यानिमित्ताने होणाऱ्या चर्चांमध्ये कोकणातील इतिहासाचे दाखले दिले जात आहेत. काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात कातळशिल्पाचा तर राज ठाकरे यांच्या सभेत कातळशिल्प आणि मराठा आरमाराचा दाखला देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या संरक्षणार्थ स्थापन केलेले नौदल व त्या नौदलात कर्तृत्त्व गाजवलेल्या मायनाक भंडारी यांचा संदर्भ कोकणाचा गौरवशाली इतिहास सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला. त्याच निमित्ताने मराठ्यांच्या आरमारातील ‘मायनाक भंडारी’ यांच्या पराक्रमाविषयी जाणून घेणे समयोचित ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण किनारपट्टीवर स्वतंत्र आरमाराची गरज का भासली?

भारताला सुमारे ७५०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीने प्राचीन व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अगदी इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकापासून भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध होते, याचे पुरावेही आहेत. म्हणूनच भारतीय राजवंशानी वेळोवेळी या किनारपट्टीच्या संरक्षणार्थ आरमारसदृश्य यंत्रणा राबवल्याचे पुरावे प्राचीन अभिलेखांमधून मिळतात. परंतु मध्ययुगीन काळात आपले या किनारपट्टीकडे दुर्लक्ष झाले होते. म्हणूनच पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शक्तींनी बिनविरोध या भूमीत आपले पाय पसरले. वास्को दा गामा याने १४९८ साली पहिल्यांदा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाय ठेवला. आपल्या नाविक सामर्थ्याच्या बळावर त्याने भारतात आपली सत्ता स्थापन केली. कालिकतचा समुद्री राजा वगळता वास्को दा गामा याला कोणत्याही स्थानिक राजसत्तांनी विरोध केला नाही. याचीच परिणती म्हणून मराठा साम्राज्य उदयास येण्यापर्यंत या परकीय सत्ता बिनविरोध भारतीय समुद्रावर पर्यायाने व्यापारावर सत्ता गाजवत राहिल्या व समृद्धी आपापल्या देशांमध्ये पोहोचवत राहिल्या हे कटू सत्य आहे. समुद्री राजानंतर आपल्या नाविक शक्तीने परकीयांना शह दिला तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी. ‘ज्याचे आरमार त्याचेच राज्य’ हे तत्व अचूक हेरून महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना याच किनारपट्टीवर केली.

आणखी वाचा : Jain Pilgrimage Centre: दक्षिण कोकणातील प्राचीन जैन तीर्थ !

महाराजांचे आरमार

भारताला हजारो वर्षांची नाविक परंपरा असली तरी पोर्तुगीज, इंग्रज यांच्या सारख्या आधुनिक तंत्रज्ञान बाळगणाऱ्या शत्रूच्या नौदलाचा सामना करणारे आरमार उभारणे हे जिकरीचे काम होते. शत्रू दबा धरून होता. महाराज आरमार स्थापन करत आहेत याचा सुगावा लागताच पोर्तुगीज व इंग्रज हे महाराजांच्या कामावर नजर ठेवून होते. इतकेच नव्हे तर पोर्तुगीज वसईचा कॅप्टन ‘आंतानिओ डे मेल्लो इ कास्त्रो ‘ याला महाराजांचे आरमार कल्याणच्या खाडीच्या बाहेर जावू नये याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला. शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करत स्थानिक दर्यावर्दी व कुशल सुतार यांच्या मदतीने तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा उत्तम प्रकारे अभ्यास करून आरमाराची पायाभरणी केली. महाराजांनांतर मराठा आरमाराची धुरा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सांभाळली. मराठा आरमार सक्षम व शिस्तबद्ध करण्याचे श्रेय आंग्र्यांकडे जाते. मराठा आरमाराच्या जडणघडणीत अनेक ज्ञात-अज्ञात दर्यावर्दींचा हातभार लागला आहे. महाराजांच्या सोबतीने आरमाराचा पाय मजबूत करण्यात दौलत खान, मायनाक भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आणखी वाचा: विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?

कोण होते मायनाक भंडारी?

मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारी प्रमुखांपैकी एक होते. त्यांचे पूर्ण नाव मायाजी भाटकर असे होते. मायनाक भंडारी यांची समाधी आजही रत्नागिरी शहराजवळील भाट्ये या गावी आहे. कोकणातील परंपरेप्रमाणे गावाच्या नावावरून आडनाव लावण्याची पद्धत त्या काळात देखील प्रचलित असल्याचे दिसते. महा नायक या आरमारातील पदवीचा अपभ्रंश मायनाक झाल्याचे अभ्यासक मानतात.

मायनाक भंडारी यांचे खांदेरी किल्ला बांधण्यातील योगदान

जंजिरा हा सिद्दींच्या ताब्यात होता. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सिद्धींला आपले अधिपत्य राखण्यात सतत यश येत होते. त्यामुळे मराठ्यांनी जंजिरा अनेकदा सर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यात यश आले नाही म्हणूनच शिवाजी महाराजांनी पर्यायी जागा शोधण्याचे ठरविले. या नवीन जागेच्या शोधात त्यांची नजर मुंबईजवळ असलेल्या खांदेरी-उंदेरी या बेटांवर गेली. महाराजांनी खांदेरी हे बेट किल्ल्याच्या बांधणीसाठी निवडले होते. हे जरी खरे असले तरी या बेटावर ताबा मिळविणे इतके सहज शक्य नव्हते. १९६२ साली मराठ्यांनी या बेटावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बेटावर पाणी नसल्याने या मोहिमेला स्थगिती देण्यात आली होती. खांदेरी या बेटाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे होते. मुंबईबंदरात शिरणारे किंवा तेथून बाहेर पडणारे कोणतेही जहाज खांदेरीहून दिसल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे इंग्रज व सिद्दी यांनी मिळून मराठ्यांना या बेटावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मराठा आरमाराची धुरा सांभाळत असलेल्या ‘मायनाक भंडारी’ व ‘दौलत खान’ यांना आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली नाविक सामर्थ्यासमोर माघार घेणे भाग पडले होते. या युद्धात सिद्दींकडून क्रूरतेची परिसीमा गाठण्यात आली होती. अनेक ज्ञात-अज्ञात मराठा आरमारी सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. विशेष म्हणजे मराठा व इंग्रज हे द्वंद्व असले तरी इंग्रजांनीही सिद्दींच्या क्रूरतेची निंदा केली होती. असे असले तरी मराठ्यांनी हार मानली नव्हती.

खांदेरीवर अधिपत्य

१६६९ सालापासून खांदेरी या बेटावर पुन्हा एकदा अधिपत्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मोहिमेत मराठा आरमाराकडून मायनाक भंडारी हे प्रमुख होते. १५ सप्टेंबर १६७० रोजी मायनाक भंडारी हे १५० मावळे व चार छोट्या तोफांसह खांदेरी या बेटावर दाखल झाले. मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने त्यांना बेट सोडून जाण्याचा इशारा दिला होता. मायनाक भंडारी यांनी शरणागती पत्करली नाही. ‘मरण आले तरी बेहत्तर मालकाच्या (शिवाजी महाराजांच्या) आज्ञेशिवाय मी येथून जाणार नाही’ हे ठामपणे सांगितले. १६७९ साली पुन्हा एकदा मराठा आरमाराने या बेटावर किल्ला बांधण्याचे ठरविले होते.

आणखी वाचा : आणखी वाचा: विश्लेषण: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

पावसाळ्यात बांधकाम

विशेष म्हणजे यावेळी मराठा आरमाराने किल्ला बांधण्यासाठी पावसाळ्याचा काळ निवडला होता. यामागे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे या काळात पाण्याचा तुडवडा होणार नाही व दुसरे म्हणजे या काळात सिद्दीचे आरमार पावसामुळे सुरतच्या बंदरावर नांगरून ठेवलेले असते त्यामुळे त्याच्या कडून कुठलाही अडसर होणार नाही. या किल्ल्याच्या बांधकामासाठी तत्कालीन एक लाख होनांची तरतूद कल्याण आणि चौलच्या व्यापारी उत्पन्नातून करण्यात आली होती. खांदेरीचे महत्त्व इंग्रजांना चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच इंग्रजांच्या गोटात महाराजांच्या या कृतीची लगेच दखल घेतली गेली. मुंबईहून सुरतला झालेल्या पत्रव्यवहारात याची नोंद सापडते. खांदेरी बेटाला इंग्रजांकडून ‘हेनरी केनेरी’ संबोधण्यात येत होते. त्यांच्या पत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा या बेटावर किल्ला बांधण्याचा बेत आहे हे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. इतकेच नाही तर हे हिंदू-पोर्तुगीज खबऱ्यांकडून हे वृत्त कळल्याचे ते या पत्रांमध्ये नमूद करतात. किंबहुना हे बेट आपले असल्याचे इंग्रज नमूद करतात. खांदेरीच्या आजूबाजूच्या बेटांवर नजर ठेवण्याकरिता गस्त घालण्याचा सल्ला या पत्रांद्वारे देण्यात आला होता.

मायनाक भंडारी यांची शर्थ

मराठ्यांनी या बेटाचा ताबा घेतल्यामुळे २ सप्टेंबर १६७९ रोजी मुंबईच्या (इंग्रजांच्या) सल्लागार मंडळाने पुढील ठराव मंजूर केला होता. या ठरावात हेनरी केनरी बेटावर किल्ला बांधण्यासाठी अनेक माणसे थळहून येथे येत आहेत. त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने लवकरच शिबाडे पाठवून त्यांना बळानिशी अटकाव करावा असे संमत करण्यात आले होते. त्यानुसार ठरावात मंजूर झाल्याप्रमाणे ४ सप्टेंबर १६७९ रोजी इंग्रजी शिबाडे खांदेरीच्या दिशेने रवाना झाली होती. इंग्रज व मराठा यांच्या मधील खांदेरीवरून होणाऱ्या कुडघोडीत मराठ्यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले. परंतु या प्रकरणात मध्येच सिद्दीने येवून उंदेरी बेटाचा ताबा घेवून किल्ला बांधण्यास सुरुवात केल्याने मराठा व इंग्रज या दोघांनाही माघार घ्यावी लागली होती. असे असले तरी या नाविक युद्धात मायनाक भंडारी यांनी शर्थीने खांदेरी बेटाचे स्थान अबाधित ठेवले हा त्यांचा पराक्रम विसरून चालणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barsu refinery dispute chhatrapati shivaji maharajs who was maynak bhandari mentioned by raj thakrey svs
Show comments