(हा मूळ इंग्रजी लेख रनेंद्र यांचा असून इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेला आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १८७४ सालच्या सुमारास, एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरसा मुंडा याचा जन्म झाला. त्याचे बालपण वडिलांच्या जन्मस्थानापासून दूर असलेल्या ‘छलकड’ येथे त्यांच्या मावशीच्या घरी गेले. त्याचा जीवनप्रवास म्हणजे त्याला घेरलेल्या अपंग दारिद्र्याच्या आणि अन्नाशिवाय घालवलेल्या दिवसांच्या कथा होत.

“बीर बिरसा ने बाग मारा (शूर बिरसाने वाघाला मारले)”. हा माझ्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात आदिवासी प्रतिक बिरसा मुंडा यांच्याबद्दलचा ‘ओझरता’ संदर्भ मला आठवतो. याचे कारण म्हणजे मुख्य प्रवाहातील इतिहासकारांनी चंद्रगुप्त मौर्यापासून ते समाजवादी राजकारणी जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंतचे योगदान मान्य केले, परंतु भारताच्या आदिवासी हक्क चळवळीत आणि स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांनी बजावलेली भूमिका फार फारशी मान्य केली नाही, त्यामुळेच त्याच्या कर्तृत्त्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.

पाटणा विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक जे. सी. झा यांनी ‘कोल विद्रोह’ यावर प्रकाशझोत टाकणारे संशोधन केले. ‘कोल विद्रोह’ हा १८३१- १८३२ या कालखंडात आर्थिक शोषणाविरुद्ध आदिवासींनी केलेला विद्रोह होता. ६० च्या दशकात जे. सी. झा यांचा विद्यार्थी कुमार सुरेश सिंग यांनी झा यांचे या विषयावर असलेलं मुख्य काम प्रकाशित केले. तोपर्यंत बिरसा मुंडा यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती, झा यांच्या संशोधनाच्या प्रकाशनानंतर बिरसा मुंडा हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर सिंग हे आयएएस अधिकारी झाले आणि बिरसा मुंडा बंडाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘खुंटी’ येथे त्यांनी काम केले.

झा यांच्या मूळ पुस्तकाचे शीर्षक ‘द डस्ट स्टॉर्म अँड द हँगिंग मिस्ट’ हे होते. नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ‘बिरसा मुंडा अँड हिज मूव्हमेंट १८७४ -१९०१’ या शीर्षकाखाली प्रकाशित केले, ज्यात बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा आणि कालखंडाचा लेखाजोखा मांडला होता – त्याच्या ख्रिश्चन धर्मातील परिवर्तनापासून ते हिलर (उपचार करणारा) ते प्रेषित (प्रॉफेट) ते बंडाच्या घोषणा देणारा क्रांतिकारी नेता असा प्रवास या पुस्तकात मांडला गेला.

गरिबी, धर्मांतरण आणि आत्मज्ञान

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १८७४ सालच्या सुमारास, एका गरीब शेतकरी कुटुंबात मुंडा यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण वडिलांच्या जन्मस्थानापासून दूर असलेल्या ‘छलकड’ येथे त्याच्या मावशीच्या घरी गेले. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे त्यांना घेरलेल्या अपंग दारिद्र्याच्या आणि अन्नाशिवाय घालवलेल्या दिवसांच्या कथा आहेत.
मुंडा यांनी १८८६ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि यावेळी एक समारंभ पार पडला. अशा धर्मांतरांच्या मुळाशी समाजाचा जगण्याचा संघर्ष असतो. सरंजामी व्यवस्थेच्या उदयामुळे आणि आर्थिक शोषणामुळे त्यांच्याकडून हिरावून घेतलेल्या जमिनी परत मिळतील,असे वचन या धर्मांतरप्रसंगी देण्यात आले होते. मुंडा यांचा मिशनरींवर विश्वास होता तरी ते त्यांच्यातून बाहेर पडले आणि त्यांनी आपली मिशनरी शाळा सोडली. हा त्यांच्या आयुष्याचा परिवर्तनाचा काळ ठरला, त्यांनी पाहिले “ साहेब एक टोपी (म्हणजेच ब्रिटिश आणि मिशनरी एकच टोपी घालतात).” त्यातून त्यांच्या मनात मिशनरीविरोधी आणि ब्रिटिशविरोधी विचारांची बीजे रुजली गेली.

बिरसा हे आदिवासी सरदार म्हणूनही ओळखले जात होते. १८५६ ते १८९६ या कालखंडा दरम्यान ब्रिटीश दडपशाहीचा त्यांनी मूक प्रतिकार केल्याने त्याचा अधिक प्रभाव होता. आदिवासींच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आणि जमिनीचे हक्क बहाल करण्याच्या मागणीसाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि न्यायालयापर्यंतही त्यांनी तक्रारी आणि याचिका केल्या. रांची गॅझेटियर्सने नमूद केल्याप्रमाणे, आदिवासी समुदायांनी एका दशकात वकील, लिपिक आणि न्यायालयीन कर्मचार्‍यांना फी म्हणून १ लाख रुपये दिले, असे हे न्यायासाठी देखील शोषण होते. आदिवासी सामाजिक-आर्थिक व्यवस्था विघटित होत होती, तरीही त्यांनी १८८६ पर्यंत हा प्रतिकार शांततापूर्ण केला.

मास्टर स्ट्रॅटेजिस्ट बिरसा मुंडा

१८९४ आणि १८९६ सालच्या दरम्यान, बिरसा अध्यात्मिक झाले आणि त्यांना “बिरसा, रोगर (रोग बरे करणारा)” म्हणून ओळखले जात असे आणि त्याबरोबरच त्यांच्या चमत्कारी शक्तींच्या कथा ही वाढल्या. त्यांनी स्वतःचा धर्म, बिरसैत याचाही प्रचार केला, या धर्मावर ख्रिश्चन आणि वैष्णव या दोन्ही धर्माचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. या काळात बिरसा यांनी स्वतःला हळदीने मढवले, एक शक्तिशाली वलय असलेली व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. येथे आपल्याला एका ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’च्या मनात डोकावता येते: बिरसा सामाजिक किंवा धार्मिक माध्यमांद्वारे, कथा मांडण्यास आणि संवाद साधण्यास तयार होता.
१९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात देशभरात विविध बंडानी कळस गाठला होता. अल्लुरी सीताराम राजू यांनी गोदावरीच्या काठावर केलेले रामपा बंड, गुरु गोविंदगिरीच्या अधिपत्याखाली राजस्थानमधील भील विद्रोह, छत्तीसगडमधील धुर बंड आणिमकेओंझार ओडिशामध्ये होणारे बंड हे सर्व एकाच वेळी होत होते.

आदिवासी सरदारांच्या मूक बंडाच्या अपयशाचा बिरसा यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर १८९५ ची राजकीय चळवळ आली, त्या वेळेस बिरसा यांनी आपल्या लोकप्रियतेचा वापर करून लोकांना त्यांच्या जमिनींवर भाडे न देण्याचे आवाहन केले. बिरसाच्या उपदेशांचा सूर देखील बदलला – ते म्हणाले, धर्मांतरित आणि बाहेरच्या लोकांकडे लक्ष देणार नाही.

अखेरपर्यंत लढा

२२ ऑगस्ट १८९५ रोजी बिरसा यांना “क्षेत्रातील शांतता भंग” करण्याच्या कटाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी अटक केली. खुंटी येथे हजारोंच्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती, जिथे त्यांचा खटला सुरू होता. दोन वर्षांनी त्यांची सुटका झाली, पण बंड संपले नाही. बिरसा मुंडा यांना ही जमीन युरोपियन मिशनर्‍यांपासून तसेच ब्रिटीश अधिकार्‍यांकडून मोकळी करून हवी होती. त्यांनी मुंडा जमातींना जमिनीचे खरे मालक म्हणून त्यांच्या हक्कांची जाणीवजागृती करण्यासाठी चळवळ चालू ठेवली.

मुंडा जमातींनी परदेशी लोकांवर अनेक धनुष्य-बाण हल्ले केले आणि त्याचा परीणाम जाळपोळीत झाला, यात खुंटी पोलिस स्टेशनचा काही भाग जाळला गेला. ब्रिटीशांनी प्रत्युत्तर दिले, ब्रिटिशांकडून झालेल्या गोळीबारात सेल रकाब हिलवर आश्रय घेतलेले अनेक समर्थक मारले गेले. तसेच बिरसा मुंडा यांना फेब्रुवारी १९०० मध्ये अटक करण्यात आली. काही महिन्यांनंतर, त्याचा कारागृहात मृत्यू झाला, हा मृत्यू कॉलरामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या मृत्यूमुळे आदिवासींमध्ये असंतोष वाढला, त्यामुळे ब्रिटिश अधिकार्‍यांनी आदिवासी जमीन मालकांचे ‘हक्कांचे रेकॉर्ड’ तयार केले. १९०८ चा छोटा नागपूर भाडेकरार कायदा करण्यात आला, ज्याचा आजही झारखंडमध्ये प्रभाव आहे, हा कायदा आदिवासी जमिनींच्या विक्री किंवा हस्तांतरणावर निर्बंध घालतो.

सार्वजनिक प्रेरणा स्थान ‘बिरसा मुंडा’

या समृद्ध इतिहासाची काही तुरळक उदाहरणे असूनही १९८२ साली मुंडा यांचा पुतळा खुंटीपासून १३० किलोमीटर दूर ओडिशाच्या राउरकेला येथे पोलिसांच्या अत्याचाराला तोंड देणार्‍या रोजंदारी कामगारांनी उभारला होता. आजही बिरसा मुंडा सामाजिक चेतना जागविण्याचे काम करतात. १९८९ मध्ये मुंडा यांच्या छायाचित्राचे संसदेत अनावरण करण्यात आले आणि १९९८ मध्ये एक पुतळा उभारण्यात आला. गेल्या वर्षीपासून, केंद्र सरकार बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर हा ‘आदिवासी गौरव दिवस (आदिवासी गौरव दिवस) म्हणून साजरा करत आहे’. १५ नोव्हेंबर रोजी, भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान मानल्या जाणार्‍या उलिहाटू येथे त्यांना आदरांजली वाहिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bir birsa ne bagh mara who was birsa munda svs
Show comments