लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या यशाची. उत्तर प्रदेशातील ८० जागा या केंद्रातील सत्तेसाठी महत्त्वाच्या ठरतात. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असलेल्या अखिलेश यांच्या पक्षाने ३७ जागा जिंकत भाजपचा स्वबळावर सत्तेचा वारू रोखला. तीच बाब तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची. त्यांनीही राज्यात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र असताना ४२ पैकी २९ पटकावत भाजपच्या मनसुब्यांना धक्का दिला. भाजपचे संख्याबळ १८वरून १२वर घसरले. या साऱ्यांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी मिळवलेल्या यशाची विशेष चर्चा झाली नाही. जणू काही ते अपेक्षितच होते असाच सूर माध्यमांत होता. तामिळनाडूतील लोकसभेच्या सर्व ३९ तसेच पुदुच्चेरीची एकमेक जागा इंडिया आघाडीने जिंकत ४० विरुद्ध ० असे घवघवीत यश मिळवले.

दक्षिणेत भाजपच्या जागा जैसे थे

उत्तर भारतातील पक्ष हा शिक्का पुसून टाकण्यासाठी भाजपने यंदा दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले होते. तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, आंध्रमधील मतांची टक्केवारी पाहता त्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले. मात्र गेल्या वेळी दक्षिणेकडे जिंकलेल्या २९ जागाच कायम राहिल्या. त्याच कर्नाटकमध्ये १७, तेलंगणामध्ये ८, आंध्र प्रदेशात तीन तसेच केरळमध्ये भाजपने खाते उघडले ही मोठी घटना आहे. गेल्या वेळी कर्नाटकमध्ये भाजपच्या २५ जागा होत्या त्यात घसरण झाली. तेलंगणामध्ये चार तर आंध्रमध्ये तीन आणि केरळची एकमेव जागा यंदा वाढली. 

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंसाठी कोकण, ठाण्याचे मैदान आव्हानात्मक का ठरतेय?

तामिळनाडूत द्रमुक आणि द्रमुक…

तामिळनाडूत भाजपचे केंद्रीय नेतृत्व तसेच प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी मेहनत घेऊनही भोपळा फोडता आला नाही. उलट द्रमुक आघाडीने राज्यातील दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. हिंदू धर्माबाबतच्या द्रमुक नेत्यांच्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला होता. मात्र निवडणुकीत त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण द्रमुकची जी आघाडी होती त्याचा सामाजिक पाया व्यापक होता. दलित-मुस्लीम तसेच इतर मागासवर्गीयांमधील प्रभावी जाती त्यांच्याबरोबर कायम राहिल्या. त्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जागावाटपात फारशी आक्रमक भूमिका न ठेवता लवचीकपणा ठेवला. काही जागांची अदलाबदल सावधपणे केली. उदा. कोईम्बतूरमध्ये डाव्या आघाडीचा उमेदवार लढतो, मात्र भाजप नेते अण्णामलाई येथून लढणार हे पाहून ती जागा आधीच आपल्या पक्षाकडे घेतली. डाव्या पक्षांना दुसरी जागा दिली. परिणामी दोन्ही ठिकाणी यश मिळाले. याउलट भाजप तसेच अण्णा द्रमुक यांची युती निवडणुकीच्या तोंडावर तुटली. आधीच फारशी ताकद कमी, त्यात मतांचे विभाजन यामुळे तामिळनाडूतील निकाल अगदीच एकतर्फी लागला.

भाजपचा मतटक्का वाढला

तामिळनाडू जेमतेम तीन ते चार टक्के मते मिळवणाऱ्या भाजपने यंदा लोकसभेला साडेअकरा टक्के मते मिळवली. जवळपास ९ जागांवर भाजप दुसऱ्या स्थानी आहे. राज्यातील द्रविडी पक्ष बरोबर नसताना ही कामगिरी चांगली आहे. मात्र विजय मिळवण्यासाठी किमान वीस टक्के पार करणे गरजेचे असते. राज्यात पंतप्रधानांचे सातत्याने दौरे तसेच तामिळी संस्कृतीशी जोडून घेण्याचा हा परिणाम आहे. सध्या विधानसभेत भाजपचे चार आमदार आहेत. ते गेल्या वेळी अण्णा द्रमुकशी आघाडीतून निवडून आले आहेत. जर भाजपला हे बळ टिकवायचे असेल तर, अण्णा द्रमुकला बरोबर घ्यावे लागेल. अण्णा द्रमुकलाही राज्यातील किमान महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष हे स्थान राखायचे झाल्यास, भाजपबरोबर तडजोड करावी लागेल. कारण राज्यातील किमान शहरी-निमशहरी भागातील जनतेने काही प्रमाणात भाजपला स्वीकारले हे लोकसभा निकालातून दिसले. भले त्यांना जागा मिळाल्या नाहीत, पण दोन आकडी मतांची टक्केवारी गाठता आली. लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची वाताहत झाली. आताही लोकसभेला त्यांना २१ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली असली तरी, गेल्या वेळची एकमेव जागाही गमवावी लागली. राज्यात एक-दोन जागांचे अपवाद वगळता द्रमुकशी त्यांनी फारशी लढतही दिली नाही. अण्णा द्रमुक-भाजप एकत्र असते तर त्यांना चार ते पाच जागा जिंकता आल्या असत्या. आता सततच्या पराभवानंतर अण्णा द्रमुकमधील पडझड रोखणे पलानीस्वामी यांना कठीण जाईल. पुढील वर्षी मे महिन्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. मात्र भाजप-अण्णा द्रमुक जर एकत्र आले नाहीत तर लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल. यातून द्रमुकला सत्ता राखण्यासाठी फारसे परिश्रमही घ्यावे लागणार नाहीत असे सध्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कारण काय? जीडीपी वाढीचा अंदाज का वर्तविण्यात आला?

स्टॅलिन यांचे प्रभावी नेतृत्व

करुणानिधी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र स्टॅलिन यांनी पक्ष संघटनेवर तसेच प्रशासनावर भक्कम पकड मिळवली आहे. राज्यातील लोककल्याणकारी सामाजिक योजनांमुळे सरकारबाबतही फारसा विरोधी सूर दिसून येत नाही. त्यातच व्हीसीके, मुस्लीम लीग, एमडीएमके अशा विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष त्यांच्या आघाडीत आहेत. तसेच राष्ट्रीय पक्ष काँग्रेसशीही युती आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या पाठीशी जरी निष्ठावंत मतदार असला तरी, मतांची टक्केवारी ३०च्या पलीकडे जात नाही. त्यामुळे गेल्या वेळी प्रमाणे भाजपशी त्यांनी विधानसभेला आघाडी केली तरच काही प्रमाणात लढत होऊ शकते. दोन द्रविडी पक्षांच्या संघर्षात आता अण्णा द्रमुक प्रभावी नेतृत्वाअभावी खूपच कमकुवत होत असल्याचे चित्र आहे.

केरळमध्ये खाते उघडले

यंदाच्या निकालात केरळमध्ये भाजपचे यश हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्रिचूर मतदारसंघात अभिनेते व भाजप उमेदवार सुरेश गोपी यांनी डाव्या आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. या निकालानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची प्रतिक्रिया पाहता हे यश राज्यातील सत्तारूढ डाव्या आघाडीसाठी धक्कादायक ठरले. केरळमधील २० पैकी केवळ एक जागा डाव्या आघाडीला तीदेखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जिंकता आली. तर काँग्रेसला १४ व त्यांच्या मित्र पक्षांना चार जागा मिळाल्या. भाजपने १६.६८ टक्के मते मिळवताना आपली पारंपरिक मते राखण्याबरोबरच ख्रिश्चन समुदायातून काही प्रमाणात मते घेतली. तिरुअनंतपुरममध्ये भाजप उमेदवार व मंत्री राजीव चंद्रशेखर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे शशी थरुर यांच्याकडून ते १६ हजार मतांनी पराभूत झाले. अटिंगलमध्येही केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनी तीन लाखांवर मते घेतली. लोकसभेच्या निकालाचा विचार करता राज्यातील ११ विधानसभा मतदार संघांत भाजप उमेदवार पहिल्या क्रमांकावर होते तर सहा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातील १४० पैकी किमान २५ मतदार संघांवर लक्ष केंद्रित करून काही जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल. सध्या भाजपचा एकही सदस्य नाही. संख्येच्या दृष्टीने दक्षिणेकडे भाजपला लोकसभेत काही फायदा झाला नसला तरी, तामिळनाडूतील मतांची टक्केवारी, आंध्रमधील तीन तसेच तेलंगणात १७ पैकी ८ जागा पाहता विरोधकांना आता भाजपला उत्तर भारतातील पक्ष असे हिणवणे थोडे कठीण जाईल.

hrishikesh.deshpande@expressindia.com