Mumbai Police cracked IC814 Hijacking Case: IC814 विमान अपहरणावर बेतलेल्या नव्या वेबसीरीजमुळे जगाला हादरवून सोडणारी भयानक दहशतवादी घटना परत एकदा चर्चेत आली आहे. परंतु अपहरणकर्त्यांच्या नावांवरून ही वेबसीरीज वादातही अडकली आहे आणि त्यामुळेच सरकारला त्यादृष्टिकोनातून पाऊल उचलण्यास भाग पडले आहे. आता प्रथमच मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रँचने या प्रकरणाचा छडा कसा लावला याचे सत्य जगासमोर मांडले जात आहे. जगभरातील कोणत्याही पोलीस विभागाने केलेल्या तपासातील ही उकृष्ट कामगिरी होती. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात नेमकं घडलं काय हे जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरावं.

इंडियन एअरलाइन्स IC814 विमान अपहरण-IC814 Hijacking Case

२४ डिसेंबर १९९९ रोजी, काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC814 विमानाने नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर, अर्ध्या तासातच त्याचे अपहरण करण्यात आले. अधिकाऱ्यांना अपहरणाची माहिती मिळताच संपूर्ण देशाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या काळात, डी. शिवानंदन हे मुंबईचे सह पोलीसआयुक्त होते आणि मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुखही होते. इंडियन एक्स्प्रेसससाठी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, मला माझ्या बॉस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त आर. एच. मेंडोन्सा यांनी या घटनेची माहिती दिली आणि संपूर्ण गुन्हे शाखेला हाय अलर्टवर राहण्यास सांगितले.आम्ही सर्वजण त्या घटनांचा आढावा घेत होतो.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
मोबाइल फोनमुळे वाढतोय ब्रेन कॅन्सरचा धोका? ‘डब्ल्यूएचओ’च्या अभ्यासातून सत्य समोर
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

मुंबईचा नंबर आणि पाकिस्तानात सततचा संपर्क

अपहरणाच्या दुसऱ्याच दिवशी ख्रिसमसचा दिवस होता. २५ डिसेंबर रोजी मी क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयात असलेल्या माझ्या कार्यालयात होतो. तेव्हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माझ्या कार्यालयात अचानक रॉ चे अधिकारी दाखल झाले. हा पाहुणा म्हणजे हेमंत करकरे हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी होते. जे त्यावेळी रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या (RAW) मुंबई कार्यालयात तैनात होते. ही काही सामान्य भेट नव्हती हे मला लगेच कळले. हेमंत करकरे यांनी मला माहिती दिली की, रॉने एक फोन नंबर मिळवला जो क्रमांक मुंबईचा असून सतत पाकिस्तानमधील एका फोन नंबरच्या सतत संपर्कात असतो. त्यांनी मला तो फोन नंबर दिला आणि मी लगेच कामाला लागलो…

पहिला ब्रेकथ्रू

कार्य सुरळीत आणि कार्यक्षमतेने पार पडावे यासाठी टीम्स तयार करण्यात आल्या आणि त्यांना विशिष्ट काम देण्यात आले… कॉलरचे तपशील, टेलिफोनचे तपशील, सेल टॉवर्सचे स्थान, कॉल लॉग आणि इतर तपशील मिळविण्यासाठी एक टीम मोबाइल कंपनीकडे पाठवण्यात आली. दुसऱ्या टीमला मोबाईल नंबरवर पाळत ठेवण्यास आणि चोवीस तास निरीक्षण करण्यास सांगितले होते. इतर सर्व टीम्सवर कॉलरला शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. काय नेमकं घडतंय याची मोठ्या अधिरतेने अधिकारी वाट पाहत असताना, प्रथम माहिती पोलिसांच्या पथकाकडून आली जी मोबाइल कंपनीकडे रवाना झाली होती. हा नंबर जुहू आणि मालाड दरम्यान वापरला जात होता अशी माहिती त्यांनी दिली.

…त्यांना गुरांचा मोठ्याने आवाज ऐकू आला

माहिती उपयुक्त असली तरीही मार्ग सोपा नव्हता, कारण मुंबईसारख्या गर्दीच्या मेगापोलिसमध्ये लाखो लोक जुहू आणि मालाड दरम्यान राहतात. १९९९ साली, टेलिफोन संभाषण ऐकणे आणि नंतर ते स्थान मिळवणे हे एकमेव तंत्रज्ञान उपलब्ध होते. त्यामुळे यात काही तासांचा विलंब होत होता. आमच्या तपासणीच्या पहिल्या तीन दिवसात काहीही निष्पन्न झाले नाही. अधिकारी हताश होत होते आणि महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारच्या हातून वेळ निसटून जात होता. फोन संभाषण ऐकत असलेल्या टीमला कॉल्सच्या मागे गाई-गुरांचा आवाज ऐकू येत होता इतकीच माहिती उपलब्ध होती… दोन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या अनेक पथकांनी जुहू ते मालाडपर्यंतचा संपूर्ण परिसर शोधून काढला. त्यांनी मशिदीजवळील प्रत्येक गोठ्याची तपासणी केली परंतु काही उपयोग झाला नाही. २८ डिसेंबर १९९९ चा दिवस होता मुंबई-लिंक अपहरणाच्या घटनेची माहिती मिळून तीन दिवस उलटून गेले होते आणि अद्यापही कोणतीही ठोस माहिती आमच्या हाती लागली नव्हती… संध्याकाळी ६ वाजता सूर्य मावळत असतानाच आशेचा किरण चमकला. मोबाइल फोन नंबरवर नजर ठेवणाऱ्या सर्व्हेलन्स टीमला त्यांच्या सिस्टमवर फोन ॲक्टिव्ह असल्याचा अलर्ट मिळाला. आम्ही लगेच कॉल ऐकायला आणि रेकॉर्ड करायला सुरुवात केली. कॉल ऐकल्यावर आमचा आमच्या कानांवर विश्वास बसत नव्हता!

मुंबईस्थित कॉलरने पाकिस्तानातील त्याच्या हँडलरला फोन केला होता आणि त्याला सांगितले होते की त्याच्याकडे रोख रक्कम कमी आहे आणि त्याला तातडीने पैशांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने कॉलरने त्याला अर्धा तास थांबण्यास सांगितले, आणि तो व्यवस्था करून परत कॉल करेल अशी माहिती त्याने दिली. हे ऐकून मला कळले आता मला काय करायचं आहे ते, मी रेकॉर्डिंग रूममधील प्रत्येकाला हाय अलर्टवर राहण्याची आणि पुढील फोन कॉलचा प्रत्येक शब्द रेकॉर्ड करण्याची सूचना केली. दीर्घ प्रतीक्षेनंतर ४५ मिनिटांनी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास कॉल आला.

अधिक वाचा: ‘सुपारीबाज’ या शब्दावरून राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ पण सुपारी देणं ते अंडरवर्ल्ड; या शब्दाचा प्रवास नेमका कसा झाला?

निळी जीन्स, स्ट्रीप शर्ट – एक भेट

फोन करणारा जैश-ए-मोहम्मदचा (JeM) दहशतवादी होता जो पाकिस्तानातून कॉल करत होता. त्याने मुंबईतील व्यक्तीला त्याचा ठावठिकाणा विचारला. तो सावध होता आणि त्याने त्याच्या ठावठिकाण्याविषयी कोणतेही तपशील किंवा अचूक उत्तर दिली नाही. मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागातील जोगेश्वरी (पूर्व) या उपनगरात कुठेतरी असल्याचं त्याने अस्पष्ट उत्तर दिलं. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने मुंबईतील त्याच्या सहकाऱ्याला सांगितले की, त्यांनी १ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे जी हवाला व्यवहाराद्वारे देण्यात येईल. मुंबईतील व्यक्तीला पैसे घेण्यासाठी रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवर असलेल्या शालिमार हॉटेलमध्ये जाण्याची सूचना देण्यात आली. त्याला पुढे सांगण्यात आले की, निळ्या रंगाची जीन्स आणि पट्टेदार शर्ट घातलेली एक व्यक्ती त्याची हॉटेलमध्ये भेट घेईल आणि पैसे देईल. यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला.

सहा टीम्स तयार…

आमच्या खोलीत नीरव शांतता पसरली ..कारण आम्हा सर्वांना नुकत्याच मिळालेल्या माहितीची क्षमता लक्षात यायला थोडा वेळ लागला होता… साध्या वेशातील गुन्हे शाखेचे अधिकारी भेटस्थळी जाऊन लक्ष ठेवतील असे ठरले. जी व्यक्ती तेथे पैसे घेण्यासाठी येणार त्याला भिडणार नाहीत किंवा पकडणारही नाहीत, पण चोरून त्याचा पाठलाग करतील आणि तो कुठे लपला आहे ते शोधून काढतील असे ठरवण्यात आले. मी प्रत्येकी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एक कनिष्ठ अशा सहा टीम तयार केल्या. या सर्वांना मोहम्मद अली रोडवर जाऊन शालिमार हॉटेलच्या भोवती पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सूचना स्पष्ट होत्या, पैसे घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवायची होती.

मुंबई सेंट्रल लोकल स्टेशनवर…

रात्री ९.३० च्या सुमारास पथके घटनास्थळी पोहोचली आणि हॉटेल नजरेस पडेल असे ठिकाण निवडण्यास आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती तेथे आली आणि निळ्या रंगाची जीन्स आणि पट्टेदार शर्ट घातलेल्या एका व्यक्तीला प्रवेशद्वाराजवळ भेटली. हॉटेलमध्ये काही काळ घालवल्यानंतर ते दोघेही बाहेर आले, निळ्या जीन्स घातलेल्या व्यक्तीने टॅक्सी थांबवली आणि दक्षिण मुंबईच्या दिशेने ती व्यक्ती निघून गेली. अधिकाऱ्यांना सूचना स्पष्ट होत्या की, त्यांनी पैसे घेतलेल्या व्यक्तीवर पाळत ठेवायची आहे. ते आता पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची वाट पाहू लागले. काही वेळाने तोही टॅक्सीत बसून निघून गेला. ताबडतोब अधिकाऱ्यांनी त्याला संशय येणार नाही असे सुरक्षित अंतर ठेवून त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. टॅक्सी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचली, तिथून प्रवासी खाली उतरला आणि रेल्वे स्थानकात गेला. अधिकारीही झपाट्याने त्याचा पाठलाग करत रेल्वे स्टेशनवर पोहोचले. ती व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाऊन लोकल ट्रेनची वाट पाहू लागली. काही मिनिटांनी लोकल ट्रेन आली आणि ती व्यक्ती ट्रेनमध्ये चढली. अधिकारीही त्याच ट्रेनमध्ये चढले, तर काही जण त्याच डब्यात शिरले, तर काही जण शेजारच्या डब्यात गेले.

आणि पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले!

ट्रेन जोगेश्वरीला पोहोचली, ती व्यक्ती खाली उतरली आणि स्टेशनच्या बाहेर गेली. ती व्यक्ती ऑटोरिक्षात बसली; आमचे अधिकारी इतर ऑटोरिक्षात बसू लागले. जोगेश्वरी (पश्चिम) येथील बशीरबाग परिसरात ऑटोरिक्षा आल्यानंतर ती थांबली आणि ती व्यक्ती उतरली. रिक्षाचालकाला पैसे देऊन तो झोपडपट्टीत जाऊ लागला. यातच अधिकाऱ्यांची अडचण झाली. जोगेश्वरीतील बशीरबाग झोपडपट्टी ही मुंबईतील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. स्थानिक नसलेली कोणतीही व्यक्ती सहजपणे ओळखली जाऊ शकते आणि संशयाने पाहिले जाऊ शकते. कोणताही संशय न घेता या व्यक्तीचा पाठलाग करणे हे पोलीस अधिकाऱ्यांसमोरचे आव्हान होते. आपला सर्व अनुभव आणि कौशल्य वापरून अधिकारी त्या व्यक्तीच्या मागे लागले. काही मिनिटे चालल्यानंतर आणि अनेक क्रॉसिंग बायलेन्समधून गेल्यावर ती व्यक्ती एका छोट्याशा चाळीत पोहोचली आणि एक दरवाजा ठोठावला. एका अनोळखी व्यक्तीने दरवाजा उघडला आणि ती व्यक्ती त्या खोलीत शिरली आणि कडी लावून घेण्यात आली. आता मात्र अधिकाऱ्यांसाठी जिकिरीचं काम होत. साध्या गणवेशातील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या खोलीतील हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता मोक्याच्या जागा हेरल्या आणि पुढील दोन दिवस कसलाही संशय न येऊन देता चोख बंदोबस्त ठेवला.

ग्रीन सिग्नल आणि छापेमारी सुरू!

ग्रीन सिग्नल मिळताच मी घटनास्थळी धाव घेतली आणि ऑपरेशनचे निरीक्षण केले, त्यातच मुंबई पोलिसांचे उच्च प्रशिक्षित कमांडो आणि मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी बशीरबाग येथील खोलीत दाखल झाले. छापेमारी इतक्या अचूकतेने करण्यात आली की, दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक क्षणही मिळाला नाही. संपूर्ण टीमने गरुडाप्रमाणे झडप घातली आणि काही वेळातच दहशतवाद्यांना पकडण्यात आले. एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. रफिक मोहम्मद (वय ३४), अब्दुल लतीफ अदानी पटेल (वय ३४), मुस्ताक अहमद आझमी (वय ४५), मोहम्मद आसिफ उर्फ ​​बाबलू (वय २५), गोपालसिंग बहादूर मान (वय ३८) अशी त्यांची नावे आहेत. आम्हाला धक्का बसला, दोन एके-५६ असॉल्ट रायफल, पाच हँडग्रेनेड, अँटी-टँक टीएनटी रॉकेट लाँचर, शेल आणि तीन डिटोनेटर्स आणि स्फोटके, सहा पिस्तूल, दारूगोळा आणि १,७२,००० रु. खोलीतून रोख रक्कम जप्त करण्यात आली. जणू काही दहशतवाद्यांनी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती.

मातोश्रीचा नकाशा आणि …

विशेष म्हणजे खोलीतून मातोश्रीचा नकाशाही जप्त करण्यात आला आहे. मातोश्री हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान होते. आजही ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान आहे. जोगेश्वरी आणि मालाड या दोन ठिकाणीही एकाचवेळी छापे टाकण्यात आले. एका छाप्यात, नेपाळी जोडप्याने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर छापा टाकून जिवंत हातबॉम्ब, २-३ ग्लॉक पिस्तूल आणि १० हजार अमेरिकन डॉलर्स रोख जप्त करण्यात आली. अमेरिकन चलन जप्त केल्यामुळे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाले.

पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग

दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि चौकशीत त्यांनी संपूर्ण अपहरणाची कबुली दिली आणि ते त्यात कसे भाग घेत होते. पैसे स्वीकारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल पटेल असे असून तो मुंबईतच स्थानिक होता. तो मुंबईतील मुख्य सूत्रधार होता. मोहम्मद आसिफ उर्फ ​​बाबलू आणि रफिक मोहम्मद हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. गोपाल सिंग मान हा नेपाळी नागरिक होता तर इतर काश्मीरमधील ‘हरकत-उल-अनसूर’ या दहशतवादी गटाचे दहशतवादी होते. त्यांच्या चौकशीत त्यांच्याबरोबर जोगेश्वरीतील एकाच खोलीत आणखी तीन पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचेही समोर आले. छाप्यादरम्यान हे तिघे बाहेर गेले होते त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. मुंबई पोलिसांनी तात्काळ हाय अलर्टवर जाऊन तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोगेश्वरी आणि मालाड भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. परंतु, ते पळून गेले त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नाही. अपहरणकर्त्यांसह त्यांची संपूर्ण टीम जुलै १९९९ पासून मुंबईत लपून बसली होती आणि अपहरणाच्या तयारीत होती, हे अब्दुल लतीफ पटेल याच्या चौकशीदरम्यान उघड झाले.

अधिक वाचा:विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?

अपहरणकर्त्यांची ओळख

इब्राहिम अथर, बहावलपूर- कराची- पाकिस्तान; पाकिस्तानचा शाहिद अख्तर- कराची, सनी अहमद काझी- कराची, जहूर इब्राहिम- शाकीर सिंध हे अपहरणकर्ते होते. अपहरणकर्त्यांची खरी नावे शोधणे हे कंदाहार अपहरण प्रकरणातील एक मोठे यश होते. अपहरणकर्ते जगाला अनोळखी होते आणि त्यांनी अपहरण केलेल्या विमानात मंकी कॅप घालून त्यांची ओळख आणि चेहरा लपवला होता… मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच अपहरणकर्त्यांची खरी ओळख आणि खरी नावे जगासमोर उघड केली. दिल्लीतील आपल्या वरिष्ठांना मुंबईतील सर्व घडामोडींचे प्रत्येक मिनिटागणिक अपडेट देणाऱ्या करकरे यांनी आपल्या बॉसना अपहरणकर्त्यांची नावे आणि ओळख ताबडतोब सांगितली, त्यांनी तत्कालीन उपपंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना माहिती दिली. ही माहिती समोर आल्यानंतर भारत सरकार आणि जगाला अपहरणकर्त्यांची खरी ओळख पटली.

पुढील तपास आणि चौकशीत असे दिसून आले की, अपहरणकर्ते मुंबईत त्यांच्या अपहरणाच्या योजनेसाठी विमानतळांचे नियोजन आणि हेरगिरी करण्यासाठी आले होते. मुंबईत त्यांनी जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तेथे ते राहत होते. त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांनी काही मूलभूत कौशल्ये शिकण्यासाठी संगणक वर्गात प्रवेश घेतला होता. मोठी लाच देऊन बनावट भारतीय पासपोर्ट मिळवण्यातही ते यशस्वी झाले. वास्तविक, मुख्य सूत्रधार अब्दुल पटेल याने मुंबईतील पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच देऊन सलग दोन दिवस एकाच फोटोचा वापर करून दोन पासपोर्ट मिळवले होते. दहशतवादी त्यांच्या बनावट पासपोर्टसाठी मध्यवर्ती भागात असलेल्या सेव्हन स्पाइस ट्रॅव्हल एजन्सीच्या संपर्कात आले आणि संबंधितांवर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलीस पडताळणी यंत्रणेतील कमकुवतपणा आणि ट्रॅव्हल एजन्सी आणि पासपोर्ट कार्यालयाचा सहभाग उघड झाला. त्यानंतर पाच अपहरणकर्ते नेपाळमध्येच राहिले आणि त्यांनी अखेरीस २४ डिसेंबर १९९९ रोजी त्यांची योजना कार्यान्वित केली. जम्मू आणि काश्मीर तुरुंगातून तीन दहशतवाद्यांची अदलाबदल केल्यानंतर, भारत सरकारच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी त्यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या ताब्यात दिले आणि त्यांनी त्यांना अमृतसर येथे नेऊन तिथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मुंबई पोलिसांनी सोडवलेल्या सर्वात हाय-प्रोफाइल प्रकरणांपैकी एक होते.

(* IPS अधिकारी हेमंत करकरे यांचा नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला, तेव्हा ते महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते).