संदीप द्विवेदी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

India Pakistan Cricket: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघ २००८ मध्ये पाकिस्तानात झालेल्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला होता. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्याची ती शेवटची वेळ. सगळं काही जुळून आलं तर पुढच्या वर्ष तब्बल १६ वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानच्या भूमीवर खेळताना दिसेल.

इस्लामाबाद इथे झालेल्या एससीओ बैठकांमधील चर्चेचे संकेत म्हणजे भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानला रवाना होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे.

सगळं काही जुळून आलं तर, शांततेसाठी मैत्री सेतू पुन्हा सुरू होऊ शकतो. शांतीचं प्रतीक असणारं कबुतरं हवेत सोडताना दिसू शकतात. सीमांचे महादरवाजे खुले होऊ शकतात. भारतीय राजकारणी पाकिस्तानातल्या स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसू शकतात. लाहोरमधले टॅक्सी ड्रायव्हर भारतीय चाहत्यांकडून कसे पैसे घेत नाहीत अशा कहाण्या तुम्हाला ऐकायला मिळू शकतात.

गेल्या दोन दशकात भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये बरेच चढउतार झाले आहेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. दोन्ही देशांचं क्रिकेट, त्यांचे संघ आणि पवित्राही बदलला आहे. भारतीय संघाने गरुडभरारीच्या बरोबरीने कोटीच्या कोटी उड्डाणंही घेतली आहेत. योगायोगाने त्याचवेळी पाकिस्तान संघाची मात्र सार्वकालीन वाताहत झाली आहे. जगभरात भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते पसरलेले आहेत. त्यांची एक छबी टिपण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. अमेरिका ते झिम्बाब्वे कुठेही सामना असो- भारतीय प्रेक्षक असतातच. पाकिस्तानला मायदेशातच पाठिंबा आक्रसत गेला आहे.

दारुण पराभवातून बोध घेत पाकिस्तानने चार दिवसात कसा मिळवला संस्मरणीय विजय

भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानात नेहमीच प्रेम मिळालं आहे. पण आता तिथे भारतीय क्रिकेटपटूंकडे अवाक भावनेनं पाहिलं जातं. आपल्या संघाची कामगिरी कौतुक करण्यासारखी राहिलेली नसताना पाकिस्तानी चाहते भारतीय खेळाडूंची भरभरून प्रशंसा करतात. भारतीय क्रिकेटपटूंची पाकिस्तानात किती लोकप्रियता आहे याचा मापदंड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ठरू शकते. पाकिस्तान क्रिकेट संघाची लोकप्रियता, दर्जा यात घाऊक घसरण होत असताना भारतीय क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेची उंची अनुभवणं रिअॅलिटी चेक ठरू शकतो.

कसोटी असो, एकदिवसीय असो किंवा टी२०- पाकिस्तानने प्रत्येक प्रकारात नीचांक गाठला आहे. कुठला पराभव अधिक जिव्हारी लागणारा हे सांगणं कठीण आहे. गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने त्यांना नमवलं. काही महिन्यांपूर्वी टी२० वर्ल्डकपमध्ये अनुनभवी अमेरिकेने त्यांना चीतपट केलं. काही दिवसांपूर्वीच मुलतान इथे झालेल्या कसोटीत पाकिस्तानने ५५६ धावांचा डोंगर उभारुनही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

दुसरीकडे भारतीय संघाची घोडदौड सुरूच आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत फायनलचा अपवाद वगळता भारतीय संघाची कामगिरी दिमाखदार अशीच झाली आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर त्यांनी नाव कोरलं. टेस्ट प्रकारात मायदेशात भारतीय संघाला नमवणं अत्यंत कठीण मानलं जातं. ११ वर्षात भारतीय संघाने मायदेशात केवळ ४ टेस्ट गमावल्या आहेत (सध्या सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची मालिका अपवाद)

पाकिस्तान क्रिकेटचं मातेरं व्हायला प्रशासकीय अनागोंदी कारणीभूत आहे. गेल्या चार वर्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चार चेअरमन लाभले आहेत. याच चार वर्षात तब्बल २७ जण निवडसमितीचा भाग झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मुलतान इथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर नव्या निवडसमितीने माजी कर्णधार, प्रमुख फलंदाज बाबर आझम आणि प्रमुख गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी यांना संघातून डच्चू दिला. एरव्ही असं केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटली असती पण या दोघांची कामगिरी एवढी सर्वसाधारण झाली होती की चाहत्यांनी या दोघांना वगळल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला.

“हे दिवसही निघून जातील…”, बाबरने विराटसाठी केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, विराटकडे बाबर आझमला पाठिंबा देण्याची चाहत्यांची मागणी

माजी खेळाडू, स्वयंघोषित तज्ज्ञ, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर्स पाकिस्तान क्रिकेट संघावर अश्लाघ्य भाषेत टीका करतात. टीकेचं रुपांतर ट्रोलिंगमध्ये आणि आक्षेपार्ह शेरेबाजीत कधी होतं कळतही नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराच्या पत्रकार परिषदेवेळी संघाच्या माध्यम व्यवस्थापकांना पत्रकारांनो जरा सभ्यतेने प्रश्न विचारा असं सांगावं लागलं होतं.

ज्या देशात क्रिकेटपटूंना दैवत मानून त्यांचा उदोउदो केला जात असे, त्यापैकी एक खेळाडू म्हणजे इम्रान खान. पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून देणारा हा कर्णधार सध्या तुरुंगात आहे. इम्रानची पत्नी जेमिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेरच्या जगापासून अतिशय दूर अंधारकोठडीत त्यांचं जीवन व्यतीत होत आहे.

विराटचा चाहतावर्ग

पाकिस्तानचे चाहते आजही इम्रान खानच्या काळात जातात. ते गौरव क्षण आठवतात. सगळ्यांनी पाकिस्तान संघाला रद्दबातल ठरवलेलं असताना त्वेषाने पुनरागमन करणारा १९९२ वर्ल्डकप स्पर्धेतला संघ आणि त्याचं स्पिरिट कुठे हरवलंय असं चाहते म्हणतात. नोंद घ्यावी, दखल घ्यावी, दैवत मानावा असं कोणी खेळाडूच नसल्याने पाकिस्तानचे चाहते मूळ पंजाबी असणाऱ्या विराट कोहलीलाच फॉलो करतात. विराट कोहलीत त्यांना वासिम आक्रम दिसतो. कोणाला जावेद मियांदाद दिसतो तर कोणाला वकार युनिस. २०१७ ते २०१९ या कालावधीत भारताच्या इस्लामाबाद इथल्या दूतावासात कार्यरत राजदूत अजय बिसारिया यांनी इम्रान खान कोहलीसंदर्भात काय म्हणाले होते याची आठवण करून देतात. विराट हा सचिनपेक्षाही मोठा खेळाडू आहे असं इम्रान म्हणायचे असं बिसारिया सांगतात. खेळाप्रति निष्ठा, व्यावसायिकता आणि विजिगीषु वृत्ती हे विराटचे गुण बघा, त्यातून शिका असा सल्ला वासिम आक्रम पाकिस्तानच्या युवा खेळाडूंना देतात.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात दाखल झाला तर विराट कोहलीचं भव्य स्वागत होईल हे नक्की. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली म्हणाला होता, ज्या दिवशी विराट मुलतान, रावळपिंडी, लाहोर, कराचीत खेळेल तेव्हा तुम्हाला त्याची तिथे किती लोकप्रियता आहे याचा अंदाज येईल. स्टेडियममध्ये पाकिस्तानला पाठिंबा देणारे हिरवे झेंडे असतील पण जो पाठिंबा बाबर आझम, शाहीन शहाला मिळतो तसा विराटला मिळेल. विराट पाकिस्तानमध्ये खेळणं हा दोन्ही देशातील नागरिकांसाठी रोमांचकारी क्षण असेल. दोन्ही देशांदरम्यानचा तणाव निवळून शांतता नांदण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा क्षण असेल.

क्रिकेटने जोडली मनं आणि देशही

क्रिकेटपटूंनी दोन्ही देशांदरम्यान दुरावलेले संबंध पूर्ववत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९७८ मध्ये बिशन सिंग बेदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. दौरा संपेपर्यंत पाकिस्तानचे तेव्हाचे प्रशासक झिया अल हक यांच्याशी त्यांचं खास नातं निर्माण झालं होतं. दुर्मीळ रक्तगट असणाऱ्या एका रुग्णाला रक्ताची गरज असल्याचं बेदी यांनी वर्तमानपत्रात वाचलं. बिशन सिंग बेदी यांचा रक्तगट तोच होता. त्यांनी तातडीने रक्तदान केलं होतं. झिया यांना ही गोष्ट कळली आणि त्यांच्या मनात बेदींबद्दलचा आदर दुणावला. झिया भारत भेटीवर आले होते तेव्हा बेदी यांना भेटायचं आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

२००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय संघाची भेट घेतली. तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली याला त्यांनी एक बॅट दिली. फक्त खेळ नव्हे तर मनंही जिंकून या असा संदेश त्या बॅटवर होता.

अर्थात खेळाडूंवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं दडपण असतंच आणि शांततेचे पाईक होण्याचा दबावही असतो. व्यावसायिक खेळाडूंसाठी हे सगळं चित्त विचलित करणारं ठरू शकतं. कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना सौरव गांगुलीने पाकिस्तानात खेळताना निर्णायक वनडेपूर्वी ड्रेसिंगरुममध्ये दिलेला संदेश नक्कीच आठवेल- मनं जिंकणं वगैरे ठीकेय पण त्याआधी आपल्याला सामना जिंकायचा आहे. आपण इथे जिंकण्यासाठी आलो आहोत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket diplomacy will bring india pakistan closer india might play on pakistan soil in champions trophy psp