उत्तराखंडमधील भगवान शिवाचे पवित्र मंदिर केदारनाथ पुन्हा चर्चेत आले आहे. दिल्लीत शतकानुशतके जुन्या हिमालयीन मंदिराची प्रतिकृती उभारण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीत केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली जात असताना संपूर्ण संत समाजाने संताप व्यक्त केला आहे. उत्तराखंडमध्येही मंदिराच्या या प्रतिकृती उभारण्याला जोरदार विरोध होत आहे. पुजार्‍यांपासून ते स्थानिक लोकांकडून दिल्लीत या मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे. याचे नेमके कारण काय? काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊ.

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बुरारी येथील हिरांकी येथे श्री केदारनाथ धाम ट्रस्ट, बुरारी यांच्याद्वारे तीन एकर जागेवर बांधली जात आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंडमधील मूळ केदारनाथ धाम तेथील हवामान परिस्थितीमुळे दरवर्षी सहा महिने बंद असल्याने या मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. बिझनेस टुडेच्या म्हणण्यानुसार, मंदिर समितीने असा दावा केला आहे की, ही प्रतिकृती हुबेहूब असेल; जी समान वास्तुकला आणि साहित्य वापरून तयार केली जाईल. समितीचे संस्थापक व अध्यक्ष सुरिंदर रौतेला यांच्या देखरेखीखाली हे मंदिर तयार करण्यात येईल. ते जमिनीचेदेखील मालक आहेत आणि सुमारे १२ कोटी रुपयांचा बांधकाम खर्चही ते उचलणार आहेत, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

हेही वाचा : झोमॅटो-स्विगीवरून खरंच दारू मागवता येणार का?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी १० जुलै रोजी मंदिराच्या भूमिपूजन आणि दगडी बांधकाम समारंभाला उपस्थित होते. समितीचे प्रशासकीय प्रमुख जितेंद्र सुलारा यांनी मंगळवारी सांगितले की, मंदिराचे बांधकाम २०२६ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशातील हिमालयात मूळ मंदिर स्थित आहे. हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिंदू धर्मात केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री व यमुनोत्री हे पवित्र चार धाम आहेत.

प्राचीन मंदिराचे पावित्र्य कमी केल्याचा आरोप

केदारनाथचे पुजारी, अनेक धार्मिक नेते व उत्तराखंडमधील नागरिक या प्रकल्पाला तीव्र विरोध करीत आहेत. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी १२ ते १५ जुलैदरम्यान तीन दिवस याविरोधात आंदोलन केले आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. देवभूमी रक्षा अभियानाचे अध्यक्ष स्वामी दर्शन भारती यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी लोकांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. “बाबा केदार यांच्या नावाचा गैरवापर करणे हे पाप आहे. मी सर्व सनातनींना आवाहन करतो की, जागे व्हा आणि हे षडयंत्र हाणून पाडा”, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विरोधी काँग्रेसनेही मुख्यमंत्री धामी आणि सत्ताधारी भाजपावर प्राचीन मंदिराचे पावित्र्य कमी केल्याचा आरोप केला आहे.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (बीकेटीसी) अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, “दिल्लीतील मंदिराच्या बांधकामाशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. हे केदारनाथ ट्रस्ट नावाच्या संस्थेद्वारे केले जात आहे. त्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत देऊ केलेली नाही. काही लोकप्रतिनिधींच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कारण- हा एक धार्मिक सोहळा होता.

“देवस्थानांची देखरेख करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने मंदिराची प्रतिकृती बांधण्याची योजना आखल्यास दिल्लीतील ट्रस्टवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अजय म्हणाले, “केदारनाथ व बद्रीनाथ या मंदिरांच्या नावाने ट्रस्ट तयार करणार्‍या व्यक्ती, संस्था, मंदिरे, रुग्णालये, आश्रम इत्यादी बांधण्यासाठी पैसे गोळा करीत असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. काही जण ऑनलाइन प्रार्थना आयोजित करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करण्यासाठी ॲप्सचा वापर करीत आहेत. याबाबत आम्ही शक्य ती सर्व कायदेशीर कारवाई करू.”

निषेधाचे कारण काय?

आंदोलन करणार्‍यांनी अनेक चिंताजनक कारणे सांगितली आहेत. पुजारी यांचे मानणे आहे की, पवित्र ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती धार्मिक परंपरांचे उल्लंघन करते. ते म्हणतात की, मूळ देवस्थानांना हिंदू श्रद्धेमध्ये अनन्यसाधारण स्थान आहे आणि प्रतिकृती तयार करणे धर्माच्या विरोधात आहे. केदारनाथ धामहून दिल्लीत दगड आणल्याने मंदिराशी संबंधित पवित्र परंपरेला बाधा येते. त्यांनी हे घोषित केले की, एकच केदारनाथ धाम आहे आणि नेहमी तेच राहील. दुसरे कोणतेही मंदिर त्या मंदिराचे स्थान घेऊ शकत नाही.

“दिल्लीत केदारनाथ धामच्या नावाने मंदिर बांधणे म्हणजे हिंदूंच्या पिढ्यान् पिढ्या पूज्य असलेल्या शतकानुशतके जुन्या हिमालयीन मंदिराच्या पावित्र्याचा अनादर आहे”, असे केदारनाथ येथील पुजाऱ्यांच्या संघटनेशी संबंधित उमेश पोस्ती यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि दिल्लीत आणखी एक घोटाळा होईल, असेही ते म्हणाले.

“केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब”

त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “प्रतीकात्मक केदारनाथ असू शकत नाही. शिवपुराणात १२ ज्योतिर्लिंगांचा उल्लेख त्यांची नावे आणि स्थाने यांसह करण्यात आला आहे. केदारनाथाचे स्थान हिमालयात असताना ते दिल्लीत कसे असू शकते? यामागे राजकीय कारणे आहेत. आमच्या धार्मिक स्थळांमध्ये राजकीय लोक हस्तक्षेप करीत आहेत. केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे आणि तो मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तिकडे घोटाळा करून आता केदारनाथ दिल्लीत बांधणार? आणि मग आणखी एक घोटाळा होईल. केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब आहे. त्याची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. याला जबाबदार कोण? आता ते दिल्लीत केदारनाथ मंदिर बांधणार असल्याचे सांगत आहेत, हे होऊ शकत नाही.”

अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी ‘पीटीआय’ला सांगितले, “१२ ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ एक आहे आणि ते उत्तराखंडमध्ये आहे. १२ ज्योतिर्लिंगाची शक्ती अतुलनीय आहे म्हणून लोक तेथे आशीर्वाद घेण्यासाठी जातात. जर त्याच नावाचे दुसरे मंदिर (दिल्लीत) तयार होत असेल, तर ते १२ ज्योतिर्लिंगांत समाविष्ट नसेल. प्रतिकृती मंदिरात लोकांना समाधान मिळणार नाही. केदारनाथच्या नावाने दुसरे मंदिर करणे योग्य नाही. मंदिर बांधायचे असेल, तर याला वेगळे नाव देण्यात यावे. एकच केदारनाथ मंदिर आहे आणि ते तसेच राहील.”

हेही वाचा : ‘पीएम श्री’ योजनेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार? ही योजना नेमकी आहे तरी काय?

त्यांना उत्तर देताना जितेंद्र सुलारा म्हणाले, “भारतभर वैष्णोदेवीची अनेक मंदिरे आहेत. मुंबईत बद्रीनाथ मंदिर आहे. इंदूरमध्ये केदारनाथ मंदिरदेखील आहे. मग दिल्लीत मंदिर का बांधू शकत नाही? मंदिर बांधणे सनातन धर्माच्या विरोधात नाही. पण, त्याची तुलना केदारनाथमधील मूळ मंदिराशी होऊ शकत नाही. कारण- इथे ज्योतिर्लिंग नाही. हे दुसरे शिव मंदिर असेल.”