डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव आता जगभरात आणि भारताच्या विविध राज्यांमध्ये वेगाने होत आहे. जगातील जवळपास अर्धी लोकसंख्या या आजाराच्या जोखमीखाली आहे. त्यानंतर आता डेंग्यूच्या चार प्रजातींवर प्रभावी प्रतिबंधात्मक लस असण्याची गरज तीव्र झाली आहे. २००१ साली डेंग्यूचा फैलाव देशातील फक्त आठ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात झाला होता. आजघडीला २०२२ साली भारताच्या सर्व राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. डेंग्यूच्या विळख्यात येणारे लडाख हे शेवटचे स्थान आहे. गेल्यावर्षी लडाखमध्ये डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आले होते. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जुलैच्या अखेरपर्यंत डेंग्यूची लागण झालेली ३१ हजार ४६४ प्रकरणे समोर आली होती आणि या आजारामुळे ३६ रुग्णांचे प्राण गेले होते, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या आजारातून अंतर्गत रक्तस्त्राव, रक्ताभिसरणाचा झटका आणि मृत्यूचा धोका उद्भवतो. सध्या देशात या आजाराविरोधात प्रभावी लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.

हे वाचा >> Dengue Fever: किती दिवस असतो डेंग्यूचा ताप; तो पूर्णपणे बरा करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

लसीची मानवी चाचणी

सध्या मानवी चाचणीसाठी भारतात तीन लसी सिद्ध झाल्या आहेत. पहिली लस विकसित केली आहे, पिनासिया बायोटेक (Panacea Biotec) या कंपनीने. युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शन डिसिज या संस्थेने डेंग्यूच्या चार प्रजातींवरील विकसित केलेल्या कमकुवत आवृत्त्यांवर (लसीच्या) पिनासिया बायोटेक काम करत आहे.

यूएसमधील प्रयोगशाळेने डेंग्यू विषाणूच्या चारही प्रजातींच्या कमकुवत आवृत्त्या विकसित केल्या. DENV1, DENV2, DENV3 आणि DENV4 या प्रजातींच्या अनुवांशिक रचनेमध्ये बदल करण्यात आल्यानंतर पिनासिया बायोटेकने त्यावर लस विकसित केली. कंपनीने या आधीच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या १८ ते ६० वयोगटातील १०० सुदृढ प्रौढांवर केल्या आहेत. या चाचणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गंभीर प्रतिकूल घटना घडल्या नाहीत. तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये (चाचणीत सहभागी असलेल्या) डेंग्यूच्या चारही प्रजातींविरोधात प्रतिपिंड (अँटीबॉडीज) विकसित झाल्याचे दिसून आले.

लसीची उत्पादन क्षमता वाढविल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मोठ्या स्तरावरील चाचण्या यावर्षी डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या चाचण्या भारतातील २० वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातील, ज्यामध्ये १८ ते ८० वयोगटातील १० हजार ३३५ सुदृढ प्रौढांचा समावेश केला जाईल.

हे वाचा >> डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी होतात का? प्लेटलेट्स वाढवण्याची इतर कारणे आणि मार्ग जाणून घ्या

दुसरी लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित केली जात आहे. ही लसदेखील युनायटेड स्टेट्सच्या कमकुवत विषाणूवर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील ६० प्रौढांवर लसीची चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्याच टप्प्यात संबंधित लस सुरक्षित आणि आजाराला प्रतिबंध करत असल्याचे दिसले. दुसऱ्या टप्प्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट आणि आयसीएमआर एकत्र येऊन मोठ्या स्तरावर चाचणी घेणार आहेत. यावेळी २ ते १८ वयोगटातील मुलांवरही चाचणी केली जाणार आहे.

हेच तंत्रज्ञान वापरून इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड या कंपनीकडूनही लस विकसित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या १८ ते ५० वयोगटातील ९० लोकांवर सुरू झालेल्या आहेत.

विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील लस

डेंग्यू विरोधातील आणखी दोन भारतीय लस सध्या संशोधन संस्थांमध्ये विकसित करण्याच्या मार्गावर आहेत किंबहुना त्यांची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही लसींनी समान कल्पना वापरून वेगवेगळ्या लस विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा >> Dengue Alert: रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यास पपई किंवा गुळवेलीचा रस पिताय? मग जरा थांबा, वाचा डॉक्टर काय सांगतात…

डेंग्यूवरील लस विकसित करण्याच्या मुख्य आव्हानांपैकी एक आहे, अँटीबॉडी-डिपेंडंट एनहान्समेंट (ADE). याचा अर्थ, डेंग्यूच्या विषाणूच्या एका प्रजातीविरोधात प्रतिपिंडांची (अँटीबॉडीज) पातळी कमी असलेल्या व्यक्तीला डेंग्यूच्या दुसऱ्या विषाणू प्रजातीचा अधिक गंभीर संसर्ग होऊ शकतो. यावरूनच डेंग्यू विरोधातील पहिल्याच लसीला मंजुरी मिळाल्याचा वाद निर्माण झाला होता. फिलिपिन्समध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर असे लक्षात आले की, ही लस धोकायदायक आहे. ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला नव्हता, अशा लोकांनाही या संसर्गाचा गंभीर धोका या लसीमुळे वाढू शकत होता.

या समस्येपासून दूर राहण्यासाठी दोन भारतीय संशोधन संस्थांनी प्रोटीनचा एक विशिष्ट भाग निवडला, ज्यामुळे एडीईची (अँटीबॉडी-डिपेंडंट एनहान्समेंट) समस्या उद्भवू शकत नाही. सन फार्मास्युटिकल्सच्या सहकार्याने ही लस तयार केली जात आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) यांनी विषाणूपासून काही कणांची निर्मिती केली आहे, जी लस निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारतात विकसित होत असलेल्या लस चारही विषाणूंच्या प्रजातींपासून १०० टक्के संरक्षण देतात, असे लक्षण दिसत आहे. उंदीर आणि माकडांवर यांची चाचणी घेण्यात आली आहे. मानवावर या लसीची चाचणी करणे अद्याप बाकी आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी या संस्थांमधील संशोधक पथकदेखील चार विषाणूंच्या कणांचा वापर करून लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल करून अंतिम लस तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue vaccines in india a look at the ongoing trials and development kvg