‘विक्रम वेधा’ चित्रपटाचा टिझर नुकताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. २०१७ साली आलेल्या ‘विक्रम’ वेधा या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव, त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हिट’ हा चित्रपट देखील एका तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार त्यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट ‘बच्चन पांडे’ आणि ‘कठपुतळी’ हे दोन्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये एकीकडे ‘बॉयकॉट’ हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होताना दिसून येत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा पगडा हिंदी चित्रपटसृष्टीवर कायमच राहिलेला आहे. आज जरी आपण अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बघत असलो तरी हा प्रकार अगदी नवा नाही, बॉलिवूडमध्ये रिमेकची प्रथा आजवरची नाही तर गेली ३,४ शतके ही प्रथा सुरु आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतची सुरवात स्व. दादासाहेब फाळके यांनी सुरु केली. सुरवातीला मूकपट त्यानंतर बोलपट, कृष्णधवल ते रंगीत चित्रपट असा प्रगतीचा आलेख भारतीय चित्रपटसृष्टीचा आपण बघत आलो आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी प्रामुख्याने मराठी, हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत चित्रपट तयार केले जात होते. आज हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची देवाणघेवाण होताना दिसून येते त्याचे श्रेय जातं ते ‘राजश्री पिक्चर्स’ चे सर्वेसर्वा ‘ताराचंद बडजात्या’ यांना, चित्रपट वितरक म्हणून ते दक्षिणेत काम करत होते. सुरवातीला दक्षिणेतील निर्माते बॉलिवूडमध्ये येण्यासाठी उत्सुक नव्हते. मात्र ताराचंद बडजात्या यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये येण्यास भाग पडले. ‘चंद्रलेखा’, ‘मिलन’, ‘संसार’ अशा दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदीत डबिंग करून हे चित्रपट प्रदर्शित केले.
पुन्हा अनुभवायला मिळणार तोच थरार, ‘दृश्यम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? जाणून घ्या
दोन्ही चित्रपटसृष्टीची घोडदौड सुरु होती, पन्नास साठच्या दशकात हिंदी चित्रपट हे प्रामुख्याने बंगाली, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक असायचे. सत्तरच्या दशकात ‘राम और श्याम’ हा एका तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटापासून बहुदा रिमेक परंपरेला सुरवात झाली. सत्तर आणि ऐंशीच दशकं हे बॉलिवूडमधील महत्वाचे मानले जातात. कारण याच काळात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यासारखे सुपरस्टार्स यशस्वी घोडदौड करत होते. अभिनेते जितेंद्र यांच्या कारकिर्दीत बहुतांश चित्रपट हे दक्षिणेतील चित्रपटांचे रिमेक होते. ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’, ‘संजोग’ हे चित्रपट मूळ दक्षिणेत बनले होते. याचकाळात हॉलिवूड चित्रपट आणि त्यातील संगीताचे गारुड हिंदी चित्रपटावर होते. आर डी बर्मन यांनी चित्रपटातील संगीताची भाषा पूर्णपणे बदलून टाकली. दक्षिणेतील आणखीन एक स्टार याचकाळात बॉलीवूडमध्ये दाखल झाला तो म्हणजे कमल हासन, त्यांचे ‘सदमा’, ‘एकदुजे के लिये’ हे हिंदी चित्रपट तामिळ, तेलगू चित्रपटावर बेतले होते. कमल हासन पाहिले तामिळ भाषेत चित्रपट तयार करत आणि नंतर त्याच चित्रपटाचा हिंदी रिमेक करत असत, उदाहरणार्थ ‘चाची ४२०’
नव्वदच दशक सुरु झालं आणि दक्षिणेतील चित्रपटांच्या रिमेकची लाटच बॉलिवूडमध्ये आली. अनिल कपूर, सलमान खान यांचे ‘बेटा’, ‘विरासत’, ‘जुडवा’ सारखे चित्रपट आधी दक्षिणेत बनले होते. गोविंदाची कारकीर्द संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटावर घडली आहे. डेव्हिड धवन आणि गोविंदा या जोडीने ‘राजा बाबू’, ‘कुली१’ , ‘बडे मिया छोटे मिया’ यासारखे चित्रपट दोघांनी एकत्र करून बॉक्स ऑफिसवरून धुमाकूळ घातला होता. याच दशकात अब्बास मस्तान, मुकुल आनंद या दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर हॉलिवूडच्या चित्रपटांचा प्रभाव होता.
Photos : या दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी स्वत:च्या चित्रपटांचे बनवले हिंदीत रिमेक
२००० च्या दशकात प्रियदर्शन या दिग्दर्शकाने ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘चुपके चुपके’ सारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये केले जे त्यांच्याच दक्षिणेतील चित्रपटांचे रिमेक होते. विनोदी अभिनेते सतीश कौशिक यांनी देखील ‘तेरे नाम, ‘मुझे कुछ केहना हैं’ सारखे चित्रपट बनवले जे मूळ दक्षिणेत बनले होते. ‘रेहाना हैं तेरे दिल मै’, ‘साथिया’ या आर माधवनच्या तामिळ चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्यात आले. २००० च दशक संपत असताना सलमान आमिर सारख्या अभिनेत्यांच्या करियरला देखील दक्षिणेतील चित्रपटांनी कलाटणी दिली. ‘वॉन्टेड’, गझनीसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले, हेच समीकरण अजय देवगण याच्याबाबतीत देखील घडले, सिंघम सारखा पोलिसांवर बेतलेला चित्रपट दक्षिणेतील एका चित्रपटावर बेतला होता. मध्यन्तरी सलमान खानने रिमेकचा सपाटा लावला होता. अलिकडचा काही वर्षातला गाजलेला चित्रपट म्हणजे ‘कबीर सिंग’, तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हा रिमेक होता. जसे दक्षिणेतील चित्रपट हिंदीत बनले तसे हिंदीतील जुना गोलमाल, दिवार सारखे चित्रपट दक्षिणेत बनले गेले होते. अनेकवेळा असे झाले आहे की बॉलिवूडच्या अभिनेत्याचे करियर लयाला गेले असताना दक्षिणेतील हिट चित्रपटाचा रिमेक करून अभिनेत्यांचे करियर सावरलं गेलं आहे.