कुठलाही अभिनेता रातोरात स्टार होत नसतो. अनेक वर्षांच्या मेहनतीने तो स्टार बनतो. अभिनयात करियर करण्यासाठी आज लाखो तरुण तरुणी बॉलिवूडमध्ये येत असतात. मात्र त्यांना लवकर काम मिळेल याची शाश्वती नसते. अमिताभ बच्चनपासून ते अगदी आजच्या नवाजुद्दीन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठीपर्यंत, हेअभिनेते मेहनत करून आज त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सध्या चर्चा आहे ती एकाच अभिनेत्याची तो म्हणजे ‘रिषभ शेट्टी’. आज हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कांतारा’ या चित्रपटाने जगभरात १७० कोटींचा टप्पा पार केला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत सध्या या चित्रपटाची चर्चा आहे. ‘केजीएफ’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला त्यानंतर आता ‘कांतारा’ हिट होताना दिसून येत आहे. याच संपूर्ण श्रेय जात ते अभिनेता लेखक, दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीला. आपल्या करियरची सुरवात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने सांगितले की ‘मीदेखील बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलो होतो. सुरवातीला मला इथे छोटी छोटी काम करावी लागली, लोकल कोऑर्डिनेशन ते निर्मात्यांचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मला संकलनामध्ये आवड होती मात्र मला काम मिळत नव्हे शेवटी मी पुन्हा माझे गाव गाठले आणि कांताराची कथा लिहण्यास सुरवात केली.

रिषभने २००६ आलेल्या ‘सायनाईड’ या कन्नड चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला मात्र त्यानंतर लगेच काम मिळाले नाही. २०१० साली आलेल्या ‘नाम ऐरोली ओनिडा’ या चित्रपटात काम केले. याच दरम्यान त्याची मैत्री राकेश शेट्टीशी झाली. राकेश हा टीव्ही मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. दोघांनी मिळून २०१४ साली ‘उलीदवरु कंदंठे’ नावाचा चित्रपट केला. हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर ‘किरिक पार्टी’, ‘सा.हाय.प्रा.शाले कासारगोडू, कोडुगे: रामण्णा राय’ असे चित्रपट रिषभने दिग्दर्शित केले. त्याने २०१९ मध्ये ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.

विश्लेषण : आधी न्यूड फोटोशूट, आता विम्याचा घोळ; वाद म्हणजेच रणवीर सिंग हे समीकरण नेमकं का रूढ झालं?

असा घडला कांतारा :

रिषभने एका मुलाखतीत सांगितले की ‘मी कर्नाटकात वाढलो आहे. १९८० मध्ये वन (संवर्धन) कायदा लागू झाल्यानंतर अतिक्रमण आणि शिकार या मुद्द्यांवर गावकरी आणि वनविभाग यांच्या एक संघर्ष सुरु झाला. एका माणूस रानडुकराची शिकार करतो कारण त्या जनावराने त्याच्या शेतीची नुकसान केलेलं असते. हे दोन मुद्दे माझ्या कथेसाठी टर्निंग पॉईंट ठरले, मग माझ्या पुढे दोन पात्र उभी राहिली ती म्हणजे गावकरी आणि वनविभाग अधिकारी, यात मग मी मी भूत कोला सण आणि दैव (देवता) च्या भूमिकेचा विचार केला’. रिषभ पुढे म्हणाला की ‘मला नेहमीच माहीत होते की माझ्याकडे एक चांगली कथा आहे जी प्रेक्षकांना आवडेल. ही एक अशी कथा आहे जी सगळ्यांशी कनेक्ट करू शकेल. जेव्हा मी चित्रपट बनवतो तेव्हा प्राथमिक विचार असा असतो की त्याचा मला कंटाळा येऊ नये’.

कांताराचे यश बघून आता रिषभला अनेक निर्माते, अभिनेत्यांचे फोन येत आहेत. अल्लू अर्जुनच्या वडिलांनी त्याला फोन करून सांगितलं की पुढील चित्रपटात तू काम करावेस, तसेच मल्याळम स्टार पृथ्वीराजनेदेखील कांताराचा मल्याळम रिमेक करण्याचे घोषित केले आहे. रिषभचे खासगी आयुष्याबद्दल फारसे कोणाला माहित नाही. रिषभ कुंदापूर तालुक्यातील केरडी गावातला, शिक्षणासाठी बंगलोरला स्थायिक झाला. पदवीचे शिक्षण घेता घेता छोटे मोठे उद्योग तो करत होता. पाण्याचे भरलेले कॅन्स ठिकठिकाणी पोहोचवण्याचा त्याचा व्यवसाय होता. सुरवातीपासून चित्रपटाची आवड असल्याने त्याने चित्रपट क्षेत्रात डिप्लोमा केला आणि चित्रपट, मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. २०१७ साली त्याने प्रगती शेट्टीशी लग्न केले. २०१९ मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला. कर्नाटकातील एका गावात राहणारा एक मुलगा चित्रपट बनवायचे स्वप्न बघतो आणि आज त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. आज रिषभ शेट्टी हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. त्याने केलेला संघर्ष तितकाच प्रेरणादायी आहे. रिषभच्या या प्रवासावरून एकच वाटत आपण आपल्या कामाशी, आपल्या कामावर विश्वास ठेवणे, यश एक दिवस नक्कीच मिळते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained the journey of kantara star rishabh shetty and his life journey spg
Show comments