Indira Gandhi Bangladesh war 1971 अमेरिकेसारखा देश लोकशाहीचे कठोर पालन करताना दिसतो. त्या त्या वेळेस ‘गोपनीय’ म्हणून राखून ठेवलेल्या बाबी, ठराविक कालखंडानंतर गोपनीयतेचे धोरण बाजूस सारून जनतेसमोर आणल्या जातात. हेन्री किसिंजर यांच्याही संदर्भात अशा बाबी काही वर्षांपूर्वी सार्वजनिक झाल्या आणि ७० च्या दशकातील भारत आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात केलेली तिरस्करणीय विधाने जगासमोर आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तिरस्कार करताना त्यांनी b**ch असा शब्दप्रयोग केला होता. मात्र अनेक दशकांनंतर किसिंजर यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी इंदिराजींच्या ‘असाधारण’ व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली त्याविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर 

सुरुवातीस अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून, नंतर परराष्ट्रमंत्री  म्हणून हेन्री किसिंजर यांनी ७० च्या दशकात जगभरात अमेरिकेचे नेतृत्व केले, त्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे चीन, आफ्रिका, मध्य पूर्व आणि भारतीय उपखंडातील घटनांना वेगळे वळण मिळाले ज्याचे दूरगामी परिणाम जगाने पाहिले. काहींच्या मते, किसिंजर हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मुत्सद्देगिरीमध्ये निपुण होते; तर अनेकांसाठी विशेषत: ज्यांना त्यांच्या राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचा फटका बसला आहे, त्यांच्यासाठी ते एक दादागिरी करणारे आणि युद्धखोर होते, काहींनी त्यांची तुलना अगदी ‘युद्ध गुन्हेगार’ म्हणून देखील केली. किसिंजर यांचे भारताबरोबरचे  संबंध फारसे चांगले नव्हते. त्यांनी किंवा राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारताबद्दल आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दलची नापसंती लपवण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. निक्सन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी व्यक्त केलेल्या भारतविरोधाची रूपरेषा व्हाईट हाऊसमधील तत्कालीन ध्वनिमुद्रणातून अलीकडेच उघड झाली.

व्यवहारिक मात्र तत्त्वशून्य राजकारण 

किसिंजर यांचा जन्म २७ मे १९२३ रोजी जर्मनीतील फर्थ येथे झाला, किसिंजर हे जन्माने ज्यू होते, १९३८ साली ते आपल्या कुटुंबासह नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले. तिथे आल्यावर किसिंजर यांनी हार्वर्ड विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर लवकरच अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात त्यांचे महत्त्व वाढले. १९६९ ते १९७७ या कालखंडात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि नंतर परराष्ट्रमंत्री म्हणून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात प्रमुख भूमिका बजावली. किसिंजर यांचा मुत्सद्देगिरीचा दृष्टीकोन व्यावहारिक विचारांवर आणि राष्ट्रीय हितसंबंधांचा पाठपुरावा करणारा होता. किसिंजर यांच्या मतानुसार जोपर्यंत प्रमुख देशांमधील निर्णयकर्त्यांचे आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये एकमत आहे तोपर्यंत ते करतात ते ‘कायदेशीरच’ असते, त्या समोर जनमत आणि नैतिकतेचे प्रश्न अप्रासंगिक म्हणून नाकारले जाऊ शकतात. याचा अर्थ किसिंजर यांच्या यशाला लहान देशांचे सार्वभौमत्व आणि लोकशाही कार्यप्रणाली कमी करण्याचा रक्तरंजित वारसा होता. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने कंबोडियावर केलेल्या बॉम्बस्फोटात, १९७३ च्या चिलीतील लष्करी उठावात अमेरिकेचा सहभाग, अर्जेंटिनाच्या लष्करी गटाला अमेरिकेने दिलेला पाठिंबा आणि विशेष म्हणजे बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला पाठिंबा, तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बंगाली नागरिकांवर पाकिस्तानी शासन आणि लष्कराने केलेले भयंकर अत्याचार या घटनांमध्ये किसिंजर यांच्या धोरणाचे पडसाद पाहाता येतात. 

अधिक वाचा: Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

पूर्व पाकिस्तानातील संकटामुळेच भारताला किसिंजर यांच्या धोरणांचा…

१९७० साली पाकिस्तानमध्ये  सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या काळात ३०० सर्वसाधारण मतदारसंघात मतदान झाले, त्यापैकी १६२ मतदारसंघ पूर्व पाकिस्तान (म्हणजेच आताचा बांगलादेश) मध्ये होते. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगने पूर्वेकडील १६२ जागांपैकी १६० जागा जिंकून विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले. पूर्वेकडील बंगाली राष्ट्रवादाच्या वाढत्या लाटेला रोखण्यासाठी, पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी उच्चभ्रूंनी, मुख्यतः पश्चिमेकडील पंजाबमधील, नवीन संसदेचे उद्घाटन थांबवले, ज्यामुळे यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. २५ मार्च १९७१ रोजी, पाकिस्तान लष्कराने ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरू केले, पूर्व पाकिस्तानमधील राष्ट्रवादी चळवळ दडपून टाकण्यासाठीची ही क्रूर कारवाई होती, यामध्ये ३० लाख बांगलादेशी नागरिकांना ठार करण्यात आले.  सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले.

भारताविरोधात भू- राजकीय खेळी

शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा मित्र देश होता, यामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानचे भारताशी असलेले ताणलेले संबंध आणि पाकिस्तानचे भौगोलिक स्थान.  त्यावेळी भारताने सोव्हिएत युनियनशी मैत्री केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सोव्हिएत प्रभावाचा सामना करण्यासाठी चीनशी संबंध प्रस्थापित करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानला जवळ केले, हा त्यांच्या भू-राजकीय खेळीचा भाग होता. असे असले तरी अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला बांगलादेश मध्ये अत्याचार करण्याचे अधिकृत परवानगीच मिळाल्यासारखी स्थिती होती.

पाकिस्तानी अत्याचार अव्याहतपणे सुरू असताना, ढाक्यातील अमेरिकन वकिलातीचे प्रमुख आर्चर ब्लड यांनी वॉशिंग्टन डीसीला यात हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी अमेरिकन सरकारवर टीकास्त्र सोडले होते, “आपले सरकार लोकशाहीच्या दडपशाहीचा निषेध करण्यात अपयशी ठरले आहे. अमेरिकन सरकार अत्याचाराचा निषेध करण्यात अपयशी ठरले आहे. आपले सरकार नागरिकांच्या संरक्षणासाठी सशक्त उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि त्याच वेळी पश्चिम पाकचे वर्चस्व असलेल्या सरकारला शांत करण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय जनसंपर्क प्रभाव कमी करण्यासाठी अतिप्रयत्नशील आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. 

अधिक वाचा: टायगर ३: बॉलिवूडमधील पाकिस्तानचे चित्रण आणि नवा बदल, पण असे का?

इंदिराजींबद्दल तीव्र नापसंती होती आणि भारतीयांचा तिरस्कार

निर्वासितांचा एक मोठा प्रवाह भारतात प्रवेश करत असताना, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने डिसेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध केले. भारताच्या हस्तक्षेपाच्या एक महिना अगोदर, इंदिराजींनी निक्सन आणि किसिंजर यांची भेट घेतली होती, दोघांनाही भारताबद्दल बिलकुल सहानुभूती नव्हती. भेटीनंतर निक्सन आणि किसिंजर यांच्यात झालेल्या संभाषणात, दोघांनीही इंदिराजींना “b*ch” (बीच-कुत्री) म्हटले, किसिंजर यांनी त्यांच्यावर “युद्ध सुरू” केल्याचा आरोप केला. किसिंजर यांनी भारतीयांना “b**ds” (बास्टर्ड) आणि “सर्वात रानटी आक्रमक लोक” म्हटले. तत्पूर्वी, १७ जून १९७१ रोजी झालेल्या एका बैठकीत निक्सन आणि किसिंजर यांनी भारतीयांची ‘नपुंसक’ आणि ‘दयनीय’ लोक अशी अवहेलना करत, ‘खुशामत करण्यात तरबेज’ तसेच भारतीय महिलांना “जगातील सर्वात अनाकर्षक महिला” असे संबोधत भारताच्या बदनामीची मुक्ताफळे उधळली. व्हाईट हाऊस मध्ये संध्याकाळी ५.१५ ते ६.१० दरम्यान झालेली ही बैठक ओव्हल ऑफिसमधये ध्वनिमुद्रित झाली. ५४ मिनिटे ४२ सेकंदाच्या टेपमध्ये ५० व्या मिनिटाला निक्सन म्हणतात, “निःसंशयपणे जगातील सर्वात अनाकर्षक महिला या भारतीय महिला आहेत.” ते पुढे म्हणतात : “हे लोक नपुंसक आहेत, बाकी काहीही नाही. हे लोक काळ्या आफ्रिकन लोकांसारखेच आहेत, परंतु त्यांच्याकडे प्राणितुल्य बळ  तरी असते, हे तरी किमान पाहू शकतो, परंतु देवा, हे भारतीय म्हणजे अगदीच दयनीय …” असे ते म्हणताच हशा पिकला.

निक्सन आणि किसिंजर या दोघांनाही अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत केनेथ बी कीटिंग यांच्याबद्दल प्रचंड शंका होती, कीटिंग भारतीयांच्या बाजूने का होते असा प्रश्न निक्सन विचारात होते, हेही या टेपमध्ये रेकॉर्ड झाले आहे. पुढे, किसिंजर म्हणतात: “ते (भारतीय) उत्कृष्ट खुशामतखोर आहेत, अध्यक्ष महोदय. खुशामत करण्यात ते माहीर आहेत. ते सूक्ष्म खुशामत करण्यात माहीर आहेत. अशाच प्रकारे ते ६०० वर्षे जगले. याचाच वापर करून ते मुख्य पदांवर असलेल्यांना आपल्याकडे आकर्षित करतात.  हे त्यांचे महान कौशल्य आहे.” 

१९७१ चे युद्ध सुरू झाले तेव्हा किसिंजर आणि निक्सन यांनी भारतासाठी गोष्टी कठीण करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने नऊ भारतीय हवाई तळांवर बॉम्बफेक केल्यानंतर भारताने युद्ध सुरू केले तेव्हा निक्सन रागावले आणि किसिंजर यांना म्हणाले, “तिने (इंदिराजी) आम्हाला जोखले. (मथितार्थ- आणि युद्ध सुरू करत अपेक्षाभंग तर केलाच पण युद्ध जिंकून आपले नाकही ठेचले) “.

अधिक वाचा: भारताचा ‘झोरावर’ चिनी ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होणार का? काय आहे ‘प्रोजेक्ट झोरावर’?

अमेरिका पाकिस्तानच्या तर रशिया भारताच्या बाजूने ..

६ डिसेंबर रोजी, युद्धाच्या तीन दिवसांनंतर चीनला भारताच्या सीमेवर सैन्य हलवण्यास उद्युक्त करण्याची कल्पना  निक्सन यांना सुचली. त्यांनी किसिंजरना सांगितले की, “आपण त्यांना (चीनला) सांगायचे आहे की, त्यांच्याकडून भारतीय सीमेकडे केलेली हालचाल खूप महत्त्वाची ठरू शकते. परंतु , किसिंजरना माहीत होते की चीनच्या कोणताही हस्तक्षेपाचा परिणाम सोव्हिएत प्रभाव वाढण्यात होऊ शकतो. म्हणून त्यांनी “इंदिराजांना घाबरवण्यासाठी” बंगालच्या उपसागरात नौदल पाठवण्याची योजना आखली. अशा प्रकारे, १० डिसेंबर १९७१ रोजी, यूएसएस एंटरप्राइझ या आण्विक विमानवाहू युद्धनौकेसह ‘टास्क फोर्स ७४’ ला हिंदी महासागराकडे जाण्याचे आदेश देण्यात आले. 

परंतु सोव्हिएत रशियाने अमेरिकेच्या कारवाईला आळा घालण्यासाठी आपलाही नौदल ताफा भारताच्या मदतीसाठी रवाना केला. एंटरप्राइझ जवळपास एक महिना भारतानजिक राहिले, मात्र रशियन नौदलाच्या उपस्थितीमुळे अमेरिकेचा प्रभाव निष्प्रभ ठरला आणि भारताचा पूर्व पाकिस्तानमध्ये बहुआयामी हल्ला यशस्वीपणे सुरू राहू शकला. १६ डिसेंबर रोजी, पूर्वेकडील पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली आणि बांगलादेश अस्तित्त्वात आले. अमेरिका आणि किसिंजर यांच्या सर्व प्रकारच्या दबावांना न जुमानता भारत आणि इंदिराजी ठाम राहिल्या आणि शेवटी युद्धात आपले उद्दिष्ट साध्य केले.

किसिंजर यांचे मतपरिवर्तन… 

किसिंजर यांनी त्या नंतर अनेक वर्षांनी इंदिरा गांधी यांचे वर्णन “असामान्य चारित्र्य” असलेली व्यक्ती असे केले आणि भारताच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यात त्यांचा दृढनिश्चय आणि दृढता मान्य केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former us secretary of state henry kissinger dies aged 100 why did he oppose india svs
Show comments