History of Bandhani from Indus Valley Civilization to Ajanta: बांधणी ही कला भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्त्व करते. प्राचीन भारताच्या इतिहासातील हजारो वर्षे प्राचीन, असलेले टाय-डाय तंत्र आजही बांधणीच्या रूपात टिकून आहे. टाय-डाय ही रंगकामाची एक प्राचीन पद्धत, ज्यामध्ये कापडाच्या विशिष्ट भागांवर गाठी बांधून रंग दिला जातो. गाठी बांधलेल्या जागेवर रंग पोहोचत नाही, त्यामुळे त्या भागांवर नैसर्गिकरित्या नक्षी तयार होते. या कलेचे मूळ राजस्थान आणि गुजरातमध्ये सापडते. बांधणी हा फक्त एका कापडाचा तुकडा नाही तर ही एक कथा आहे. या कापडावर घातलेली प्रत्येक गाठ आपल्याला जन्म, विवाह, उत्सव यांच्या विविधरंगी कथा उलगडून सांगते.

या गाठीच सौंदर्याचा पाया!

कोलकात्याच्या नैना जैन या #EvergreenBandhanis च्या निर्मात्या आहेत. त्या सांगतात, ही कला फक्त त्यांच्यासाठी करिअर नाही तर भूतकाळाचा सन्मान करत भविष्य घडवण्याचा एक मार्ग आहे. बांधणी या कापडाच्या निर्मितीत नक्षी तयार करण्यासाठी प्रत्येक छोटा भाग बारकाईने उचलून कापसाच्या धाग्याने बांधला जातो. या गाठी बांधणीच्या सौंदर्याचा पाया आहेत असे नैना म्हणाल्या.

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

कच्छच्या खेड्यांतील कारागीर या कलेत कुशल आहेत. ते प्रत्येक गाठ अचूकपणे बांधून एकरूपता आणि प्रमाणबद्धता सुनिश्चित करतात. या श्रमप्रधान कलेला पूर्णत्वास नेण्यासाठी दिवस, आठवडे किंवा कधी कधी महिनेही लागू शकतात.

बांधणी, जयपूर; फोटो: जॉन कोनेल, यूके/विकिपीडिया

इतिहासाची एक झलक History From Harappan civilization

बांधणीचे मूळ ५,००० वर्षांहून अधिक जुने आहे. जयपूरच्या पर्ल अकादमीतील सहाय्यक प्राध्यापिका पूजा आर्या यांनी सांगितले की, बांधणीचे सर्वात जुने संदर्भ इसवी सनाच्या सहाव्या आणि सातव्या शतकातील अजंठा लेणीतील चित्रांमध्ये सापडतात. परंतु ही कला कदाचित आणखी प्राचीन आहे. ऐतिहासिक नोंदी असे सूचित करतात की, बांधणीसारख्या टाय-डाय तंत्रज्ञानाचा वापर इसवी सनपूर्व २००० साली मोहेनजोदारोमध्ये होत होता, असे प्राचीन हडप्पा संस्कृतीचा संदर्भ देताना आर्या सांगतात. त्यानंतर राजस्थानच्या बाडमेर आणि जैसलमेर प्रदेशात या समृद्ध कलेचा विकास झाला. या कापडावरील प्रत्येक नक्षीकाम, रंग एक वेगळीच कथा सांगतात. लाल बांधणी ही वधू- नवविवाहितेच्या मनातील आनंद व्यक्त करते, तर पिवळी बांधणी ही मातृत्त्व आणि नवचेतनेचे प्रतीक म्हणून मिरवते.

बांधणी तयार करण्याची प्रक्रिया/The process of making Bandhani

या कलेसाठी सरळ, एकही चून नसलेल कापड घेतलं जात. त्यावर खडूने नक्षीकामाची रूपरेखा रेखाटली जाते. या कामात कुशल असणाऱ्या महिलांना ‘बांधणारी’ म्हटले जाते. यानंतर महिला आपल्या बोटाच्या आधाराने गाठी बांधण्यास सुरुवात करतात. गाठी बांधल्यानंतर कापड विविध रंगांत बुडवले जाते. हलक्या-फिक्कट रंगाने सुरुवात होते आणि हळूहळू गडद रंगांचा समावेश केला जातो. कापडावर नक्षीकामाचे स्तर तयार केले जातात. या कलेतील कुशलता हजारो लहान गाठी पूर्ण प्रमाणबद्ध बांधण्यात आहे, ज्यामुळे नक्षीकामाला पूर्णत्त्व येते. कापड रंगवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, त्याला ताणले जाते, ज्यामुळे गाठांखाली दडलेली नक्षी उघड होते. आज मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बांधणीचे उत्पादन घेतले जाते. परंतु त्यापेक्षा हाताने तयार केलेल्या नक्षीकामातच किंवा त्या अपूर्णतेतच खरी मजा आहे. दोन ठिपके सारखे न दिसणे हेच खरे सौंदर्य आहे असे जैन म्हणाल्या.

लुप्त होत चाललेल्या कलेचे संरक्षण करणे गरजेचे

आता मशीनमेड कापड तयार करण्यात येते. त्यामुळे पारंपरिकरित्या या उद्योगात गुंतलेल्या कुटुंबातील तरुण वर्ग अधिक स्थिर आणि फायद्याच्या नोकऱ्यांसाठी शहराकडे वळत आहेत. बांधणी व्यवसाय अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. जैन आणि आर्या दोघांनीही या नामशेष होत चाललेल्या कलेला पुनरुज्जीवित करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. “अनेक कारागीर वृद्ध आहेत आणि त्यांच्या मुलांना कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याची इच्छा नाही. सध्या ही हस्तकला नामशेष होत आहे. तिचे तातडीने जतन करण्याची गरज आहे, ” जैन सांगतात.

अधिक वाचा: Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

“सरकारी हस्तक्षेप आणि पाठिंबा ही कला जतन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान उद्योगांना टिकून राहण्यासाठी साधने, तांत्रिक मदत आणि भांडवलाची गरज आहे आणि या गोष्टीशिवाय बांधणीचे भविष्य अनिश्चित दिसते,” असे आर्या म्हणाल्या. परंतु, आता आशा वाढत आहे. फॅशन डिझायनर बांधणीला पुन्हा नव्या रूपात आणत आहेत. सेलिब्रिटी ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करत आहेत. अंबानींसारखी (Ambani) प्रभावशाली कुटुंबे विवाहसोहळे आणि सणांसाठी बांधणीचा वापर करत आहेत, ज्यामुळे ही कला भारतीय संस्कृतीत टिकून आहे. उदाहरणार्थ, एक घरचोला बांधणी साडी नववधूसाठी अत्यावश्यक असते, तर पील बांधणी दुपट्टा हा परंपरेने आईला बाळाच्या जन्मानंतर परिधान केला जातो, असे जैन सांगतात.

बांधणीला पाठिंबा देण्यासाठी काय करता येऊ शकते?

पहिला टप्पा म्हणजे खऱ्या आणि बनावट बांधणीमधील फरक ओळखायला शिकणे. अस्सल बांधणीला एक विशिष्ट क्रश असतो, कारण प्रत्येक गाठ हाताने बांधलेली असते. ठिपक्यांमधील आणि नक्षीतील असमानता ही त्याच्या अस्सलपणाची ठळक चिन्हे आहेत. दुसरे म्हणजे, या श्रमप्रधान प्रक्रियेचे कौतुक करा आणि खऱ्या कारागिरीसाठी योग्य किंमत मोजण्याची तयारी ठेवा. “बांधणी अभिमानाने परिधान करा . हे केवळ वस्त्र नसून इतिहास, परंपरा आणि कारागिरीचे प्रतीक आहे. बांधणी परिधान करून, तुम्ही फक्त फॅशनच फॉलो करत नाही, तर एका संपूर्ण कारागीरांच्या जगाला तुमचा पाठिंबा व्यक्त करता आणि या शाश्वत कलेला जिवंत ठेवता,” असे जैन सांगतात.