गेली १०० वर्षे हिंदू परंपरेचा वारसा अविरत जोपासणाऱ्या ‘गीता प्रेस’ या प्रकाशन संस्थेला अहिंसक तसेच गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला. आजपर्यंत या प्रकाशन संस्थेने श्रीमद भगवद्गीता तब्बल १६ कोटी २१ लाख प्रती तर इतर १४ भाषांमध्ये सुमारे ४१ कोटी ७ लाख प्रती प्रकाशित केल्या आहेत. एक कोटी रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सन्मान भारत सरकारकडून महात्मा गांधींच्या नावे दिला जातो. गीता प्रेसला जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली असून, ही शुद्ध ‘फसवणूक’ असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता प्रेसचा इतिहास काय? हिंदू धर्म जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान काय?

गीता प्रेस ही एक ना-नफा ना तोटा तत्त्वावर चालविली जाणारी प्रकाशन संस्था आहे; जी कमीत कमी किंमतीत धार्मिक हिंदू पुस्तकांचे प्रकाशन व विक्री करते. जय दयाल गोयंडका, घनश्याम दास जालान आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी २९ एप्रिल १९२३ रोजी या प्रकाशन संस्थेची सुरुवात केली. १९२६ साली ऑगस्ट मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या अंकात महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी योगदान दिले होते. मूलतः या प्रकाशन संस्थेची स्थापना ही कोलकात्यात झाली होती. परंतु कोलकात्यात या प्रकाशन संस्थेला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे संस्थेचे कार्यालय गोरखपूरला हलविण्यात आले.

आणखी वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?

गीता प्रेस, गोरखपूर- १९२७

गीता प्रेसचे सध्याचे व्यवस्थापक लालमणी तिवारी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीनुसार, गोयंडका यांचा गीतेवर विश्वास होता, गीता हा देवाचा संदेश असल्याचे ते मानत. म्हणूनच त्यांनी संस्थेचे नाव गीता प्रेस असे ठेवले. इतकेच नाही प्रेस सुरु करण्याबाबत त्यांनी सत्संगातील सहभागींशी चर्चा केली. गोरखपूरचे घनश्यामदास जालान हे सत्संगात नियमित सहभागी होत असत. गोरखपूरमध्ये प्रेस सुरू झाल्यास आपण त्याची काळजी घेऊ, असे आश्वासन जालान यांनी दिले. त्यानंतर प्रेससाठी गोरखपूरमध्ये जागा शोधण्याचे ठरले. जालान यांचा मृत्यू १९९३ मध्ये झाला, तोपर्यंत ते या प्रकाशन संस्थेच्या विश्वस्तांपैकी एक होते.

हिंदू धर्म सुलभ केला

गीता प्रेसचा मुख्य उद्देश हा हिंदू धर्माची शिकवण लोकांपर्यंय पोहोचवणे असा होता. गीता प्रेसने रामायण, हनुमान चालीसा आणि शिव चालीसा यांसारखी पुस्तके तसेच लहान मुलांसाठी देवी- देवतांच्या कथांची पुस्तके उपलब्ध करून देत हिंदू धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला. या प्रकाशन संस्थेने १४ पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये ग्रंथ- पुस्तके प्रकाशित केली आहेत.

गीता प्रेस आणि भारतीय रेल्वे

गीता प्रेस आणि भारतीय रेल्वे यांचे अतूट नाते आहे. लांबच्या पल्ल्याच्या ट्रेन प्रवासाने गीता प्रेसला सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर गीता प्रेसची पुस्तके प्रामुख्याने मिळत असत. वाचनप्रिय भारतीयांनी प्रवासादरम्यान गीता प्रेसची पुस्तके आपसूक जवळ केली. अजूनही लांबच्या पल्ल्याच्या प्रवासादरम्यान भारतीय रेल्वेच्या अनेक बुक ठिकाणी अशा स्वरूपाचे स्टॉल्स आहेत, जिथे गीता प्रेसची पुस्तके उपलब्ध असतात.

गीता प्रेसची सुरुवात

गीता प्रेसची सुरुवात भगवद्गीतेच्या प्रकाशनापासून झाली. यंदा, ही १८०० पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे प्रकाशन संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेतर्फे दररोज सरासरी ६० हजार पुस्तके वितरित केली जातात, असे लालमणी तिवारी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. कल्याण हे मासिक ही या प्रकाशन संस्थेची खास ओळख आहे. आजपर्यंत कल्याण या मासिकाच्या सुमारे १६ कोटी ७४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

आणखी वाचा: विश्लेषण: बॅडमिंटनला ‘पूना गेम’ म्हणून का ओळखतात?

गीता प्रेसचा लेखाजोखा पुस्तकरूपात

अक्षया मुकुल यांनी गीता प्रेसचा लेखाजोखा सांगणारे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकात गीता प्रेस कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नाही असे नमूद केले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे गीता प्रेस हिंदू राष्ट्रवादाच्या चाकातील एक महत्त्वाचा कोन होता, ज्याने सर्वांशी युती केली; यात विचारवंत, उदारमतवादी, राजकारणी, परोपकारी, विद्वान, रास्व संघ, हिंदू महासभा, जनसंघ आणि विश्व हिंदू परिषद सारख्या धार्मिक संघटना आणि काँग्रेसमधील परंपरावादी घटक या सर्वांचा समावेश होत होता. मुकुल यांनी विद्वान पॉल अर्ने यांचा हवाला देऊन प्रकाशन संस्थेला “विसाव्या शतकातील छापील हिंदू धर्माचे प्रमुख शोधक” म्हणून संबोधले आहे. १९९२ साली पोद्दार यांच्या सन्मानार्थ विश्व हिंदू परिषदेने ‘हिंदू चेतना’ हा विशेषांक प्रसिद्ध केला होता. या अंकात पोद्दार यांची १९६४ साली शिवराम शंकर आपटे यांनी घेतलेली मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. ही मुलाखत आधी पोद्दार यांनी रा. स्व, संघाला दिली होती. नंतरच्या काळात विश्व हिंदू परिषदेने ती प्रसिद्ध केली. पोद्दार हे विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी आपटे यांच्याकडे ‘गीता प्रेस’नेच ‘विश्व हिंदू परिषदेच्या रोपट्यात फुललेल्या सहिष्णू आदर्शांची पेरणी केली’ असे मुलाखतीत नमूद केले होते.

गीता प्रेसने गाठलेले उच्चांक

गीता प्रेसने ४१ कोटींहून अधिक पुस्तके प्रकाशित केल्याचा दावा केला आहे. यामध्ये भगवत् गीतेच्या १६. २१ कोटी, तुलसीदासांवरील ११.७३ कोटी, पुराण-उपनिषदांच्या २.६८ कोटी आणि मुलांसाठी प्रकाशित ११.०९ कोटी प्रतींचा समावेश आहे. २०२२ मध्ये त्यांच्या ग्रंथांची विक्री १०० कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे मानले जाते, तर २०२१ मध्ये ही विक्री ७८ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये ६९ कोटी रुपयांची वार्षिक विक्री उलाढाल नोंदवली गेली. तर २०१८ मध्ये ६६ कोटी, २०१७ मध्ये ४७ कोटी आणि २०१६ मध्ये ३९ कोटी इतकी उलाढाल होती. गीता प्रेस त्यांच्या पुस्तकांच्या कमी किमतीचे श्रेय थेट कच्चा माल खरेदी ज्यांच्याकडून केली जातो, त्या स्रोतांना देते. त्यामुळे ग्राहकांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही, किंबहुना हे प्रकाशन प्रत्यक्ष प्रकाशनासाठी कोणतीही देणगी स्वीकारत नाही किंवा ते त्यांच्या प्रकाशनांची जाहिरातही करत नाही.

गांधी शांतता पुरस्कार

१९९५ मध्ये सरकारने स्थापन केलेला, गांधी शांतता पुरस्कार हा महात्मा गांधींच्या आदर्शांना श्रद्धांजलीपर दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग याची पर्वा न करता हा पुरस्कार सर्व व्यक्तींसाठी खुला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने एकमताने गीता प्रेस, गोरखपूरला २०२१ च्या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. गीता प्रेसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना दिलेला गांधी शांतता पुरस्कार हा संस्थेने समाजसेवेत केलेल्या कार्याचा गौरव असल्याचे निरीक्षण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नोंदवले आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ‘मी गीता प्रेस, गोरखपूरचे २०२१ चा गांधी शांतता पुरस्कारासाठी अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या १०० वर्षांमध्ये लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे.”

आणखी वाचा: विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय?

गीता प्रेसची परंपरा

गीता प्रेसच्या या कामाबद्दल गांधी शांतता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गीता प्रेसने यावर ‘या पुरस्काराने सन्मानित करणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे, परंतु प्रकाशक कोणत्याही प्रकारच्या देणग्या न घेण्याची परंपरा राखून या पुरस्काराची रोख रक्कम स्वीकारणार नाहीत, असे आवर्जून नमूद केले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विश्वस्त मंडळाची रविवारी बैठक झाली आणि एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस न स्वीकारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. हा प्रतिष्ठित पुरस्कार दिल्याबद्दल प्रकाशकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

काँग्रेसची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गीता प्रेसच्या प्रकाशकांना २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने घेतलेला हा निर्णय “फसवणूक” असल्याचा आरोप करत या पुरस्काराची तुलना हिंदुत्ववादी वि. दा. सावरकर आणि महात्मा गांधींचा मारेकरी असणाऱ्या नथुराम गोडसे यांना पुरस्कार देण्याशी केली आहे. तसेच त्यांनी अक्षया मुकुल यांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला, यात नमूद केल्याप्रमाणे महात्मा गांधी व गीता प्रेसमध्ये वादळी संबंध होते; असे असताना गांधींच्या नावाचा पुरस्कार गीता प्रेसला देणे ही शुद्ध फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi peace award to 100 year old gita press svs
Show comments