खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारा आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. खलिस्तानसमर्थक फुटीरतावादी नेता व कट्टरपंथी गट शीख फॉर जस्टिसच्या प्रमुखाने एका व्हिडीओमध्ये भारताला ‘बाल्कनीज’ करण्याची धमकी दिली आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांना प्रत्युत्तर म्हणून पन्नूने हा व्हिडीओ प्रकाशित केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ओटावा येथे झालेल्या एका जनसुनावणीला संबोधित करताना मॉरिसन म्हणाले होते, “कॅनडाचे धोरण अगदी स्पष्ट आहे, की भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.” याच वक्तव्याला गुरपतवंत सिंग पन्नूने प्रत्युत्तर दिले. पन्नू नक्की काय म्हणाला? बाल्कनायजेशन म्हणजे नक्की काय?

गुरपतवंत सिंग पन्नू नक्की काय म्हणाला?

पन्नू खलिस्तानच्या निर्मितीसाठी समर्थन करणारा न्यूयॉर्कस्थित शीख फुटीरतावादी नेता आहे. त्याने आपल्या ‘मिशन ऑफ एसएफजे २०२४ : वन इंडिया, टू २०४७’ या शीर्षकाच्या व्हिडीओमध्ये जम्मू आणि काश्मीरसह आसाम, मणिपूर व नागालँडसारख्या देशाच्या विविध भागांत फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची धमकी भारताला दिली, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. पन्नू हा एसएफजे या प्रतिबंधित संघटनेचा कायदेशीर सल्लागार व प्रवक्ता आहे, जो सार्वमताद्वारे खलिस्तान मिळवू पाहत आहे. कॅनडा आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिक असलेल्या पन्नूने भारताचे बाल्कनायजेशन करण्याची धमकी दिली, तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना अरुणाचल प्रदेश परत घेण्याची विनंती केली.

पन्नू खलिस्तानच्या निर्मितीसाठी समर्थन करणारा न्यूयॉर्कस्थित शीख फुटीरतावादी नेता आहे. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : Internet Archive Hacked : सायबर हल्ल्यात लाखो पासवर्ड आणि ईमेलची चोरी; नेमके प्रकरण काय?

“आता चिनी सैन्याला अरुणाचल प्रदेश परत घेण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे,” असे पन्नू म्हणाला. पन्नू पुढे म्हणाला, “२०४७ पर्यंत भारताच्या सध्याच्या सीमा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाईल. भारतीय प्रदेशातील त्यांची ऐतिहासिक मातृभूमी पंजाब ताब्यात घेऊन, एक सार्वभौम राज्य स्थापन केले जाईल, जे खलिस्तान म्हणून ओळखले जाईल. पन्नूने ऑगस्ट २०१८ मध्ये लंडनच्या ट्रॅफलगर स्क्वेअरमध्ये खलिस्तानसमर्थक शीख मेळाव्याची योजना आखली होती; ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच वर्षी भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आणि बेकायदा क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ५१ अ अंतर्गत त्याची शेतजमीन जप्त करण्यात आली.

बाल्कनायजेशन म्हणजे काय?

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नुसार, “एखाद्या मोठ्या प्रदेशाचे किंवा राज्याचे लहान प्रदेश किंवा राज्यांमध्ये विखंडन” अशी बाल्कनायजेशनची व्याख्या आहे. बाल्कनायजेशन सहसा वांशिक, संस्कृती व धर्मातील भेद अशा काही कारणांमुळे होते. या शब्दाची उत्पत्ती पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस झाली. ‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार इंग्रजी संपादक जेम्स लुई गार्विन यांच्याकडून बाल्कनायजेशन हा वाक्यांश आला. परंतु, इतर म्हणतात की, हा वाक्यांश जर्मन समाजवाद्यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्कच्या कराराच्या परिणामाचे वर्णन करून तयार केला गेला होता. त्यावेळी ऑट्टोमन साम्राज्याच्या विघटनानंतर बाल्कनमधील घटनांचे वर्णन करण्यासाठी बाल्कनायजेशन या वाक्यांशाचा प्रयोग केला जायचा. ‘Thought.co’ नुसार, बाल्कन द्वीपकल्पावरील ऑट्टोमन साम्राज्याने १८१७ आणि १९१२ च्या दरम्यान बाल्कन प्रदेशात विखंडन करून विविध प्रदेश तयार केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार बाल्कन द्वीपकल्पाला त्याचे नाव बाल्कन पर्वतावरून मिळाले आहे.

हेही वाचा : स्कूलबसची सुरक्षा ऐरणीवर; थायलंडच्या दुर्देवी घटनेनंतर दक्षिण आशियात ठरतोय काळजीचा विषय

पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याच्या राखेतून अनेक नवीन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. हुकूमशाही, वांशिकता आणि गृहयुद्धात राज्यांची झालेली अधोगती यांचे वर्णन करण्यासाठी आज हा शब्द वापरला जातो. बाल्कनायजेशन सहसा वांशिक विभाजनाच्या परिणामामुळे होते. परंतु, ‘thought.co’नुसार, राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, साम्राज्यवाद आणि वसाहतवादविरोधी इतर घटकदेखील त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुख्य म्हणजे बाल्कनायजेशन हे केवळ बाल्कन देशांपुरते मर्यादित नाही. ‘ब्रिटानिका’च्या मते, इतर अनेक ठिकाणीदेखील ही घटना पाहिली गेली आहे. त्यामध्ये १९५० व १९६० च्या दशकातील आफ्रिका, तसेच सोविएत युनियनचे पतन आणि १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियाचे नाहीसे होणे इत्यादी घटनांचा समावेश आहे. बाल्कनायजेशनचे परिणाम वाईट असतात. ‘ब्रिटानिका’च्या मते, बाल्कनायजेशनमुळे हयात असलेली राज्ये कधीही न संपणाऱ्या संघर्षांमध्ये अडकली आहेत. उदाहरणार्थ- आर्मेनिया आणि अझरबैजान, तसेच बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्यातील संघर्षामुळे हजारो लोक मारले गेले आहेत.