मंगळवारी (१८ जून) दिल्लीमध्ये १९६९ पासून आतापर्यंतचे सर्वांत जास्त किमान तापमान म्हणजेच ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले आहे. हे तेव्हापासूनचे सर्वांत जास्त किमान तापमान असल्याने दिल्लीमध्ये सध्या अंगाची लाही लाही करणारी उष्णता जाणवत आहे. दिल्लीमध्ये दिवसा प्रचंड उकाडा असतो. त्यातही जून महिना प्रचंड उष्णतेचा ठरतो. अलीकडेच एकट्या जून महिन्यातच सात दिवसांच्या उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. रात्रीही उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होऊन उकाडा वाढणे ही एक नवी चिंता दिल्लीकरांना भेडसावत आहे. या महिन्यात आतापर्यंत शहरात सलग सहा उष्ण रात्री अनुभवायला मिळाल्या आहेत. १२ मे पासून दिवसा प्रचंड वाढणारे तापमान रात्रीदेखील ४० अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही. आतापर्यंत १९६९ ते २०२४ या दरम्यान नोंदविण्यात आलेले सर्वांत जास्त किमान तापमान ३४.९ अंश सेल्सिअस होते. २३ मे १९७२ रोजी या तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६९ च्या आधीच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या मंगळवारी नोंद झालेले तापमान दिल्लीतील आतापर्यंतचे सर्वांत जास्त किमान तापमान आहे अथवा नाही, याबाबतची स्पष्टता नाही. फतेहाबाद व महेंद्रगड या हरियाणा राज्यातील दोन ठिकाणी सकाळी दिल्लीपेक्षा अधिक म्हणजेच अनुक्रमे ३५.४ अंश सेल्सिअस व ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा : अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी बायडन सरकारचे नवे धोरण; भारतीयांना कसा होणार फायदा?

‘वॉर्म नाईट’ म्हणजे काय?

दिल्लीमध्ये रात्रीचा उकाडा प्रचंड वाढला आहे. यांना ‘वॉर्म नाईट्स’ असे संबोधण्यात येते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रात्री नोंद होणारे किमान तापमान हे सामान्य तापमानाहून ४.५ ते ६.४ अंशांनी अधिक असते, तेव्हा त्याला ‘वॉर्म नाईट’ असे म्हणतात. जेव्हा सामान्य तापमानाहून किमान तापमान हे ६.४ अंश सेल्सिअसने अधिक असते, तेव्हा ती रात्र सर्वाधिक उष्णता असलेली (वॉर्म नाईट) मानली जाते. ‘वॉर्म नाईट’ आहे, असे म्हणण्यासाठी दिवसा किमान तापमान ४० वा त्याहून अधिक अंश सेल्सिअस असावे लागते. बुधवारी दिल्लीचे किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ८ अंशांनी अधिक होते. कमाल तापमान हे सामान्य तापमानाहून ५ अंशांनी अधिक म्हणजेच ४३.६ अंश होते.

ही परिस्थिती चिंताजनक का?

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसातील २४ तासांचे विश्लेषण केले, तर रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत तापमान किमान पातळीवर असते. फक्त हाच कालावधी असा आहे की, जिथे उकाड्यापासून थोडा तरी आराम मिळतो. कारण- दिल्ली आणि वायव्य भारताच्या भागात पावसाची कमतरता ९० टक्क्यांहून अधिक आहे. या भागात नेहमीच किमान तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक असते. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील सरकारी दवाखान्यातील एका डॉक्टरने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, “मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमाल तापमानाने उच्चांक गाठलेला असतानाही आता उष्माघाताची अधिक प्रकरणे नोंदवली जाण्यामागील कारण रात्रीच्या तापमानात झालेली वाढ हे आहे. अद्याप वाढत्या उष्णतेपासून अजिबातच दिलासा मिळालेला नाही.” पुढे ते म्हणाले, “शिवाय, बाहेरील वातावरणापेक्षा घरातील वातावरण रात्री अधिकच उबदार असते. त्यामुळे जेव्हा दिवसभरात सर्वाधिक उकाडा असतो तेव्हा विविध कारणांनी लोक घराबाहेर असतात आणि रात्री तापमानात फारशी घट झालेली नसते, तेव्हा ते घराच्या आत असतात.”

आकडेवारी काय सांगते?

हवामान खात्याने जूनमध्ये वाढणाऱ्या प्रचंड तापमानाचा सविस्तर अभ्यास अद्याप केलेला नाही. मात्र, दिल्लीमध्ये जून महिन्यात आतापर्यंत नोंद झालेल्या तापमानाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, २०११ पासून पहिल्यांदाच १ जून व १९ जूनच्या दरम्यानच्या १२ दिवसांमध्ये ३० अंश सेल्सिअसहून अधिक किमान तापमान नोंदविले गेले आहे. २०१८ मध्येही जून महिना असाच अधिक उष्णतेचा ठरला होता. तेव्हाही १० दिवस प्रचंड उकाड्याचे गेले होते. या वर्षी जून महिन्यात किमान सामान्य तापमानाची नोंद २७.५ अंश इतकी झाली आहे.

हेही वाचा : आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुलजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?

तापमानवाढीसाठी ‘अर्बन हिट आयलँड’चा प्रभाव कसा पडला आहे?

अनेक अभ्यासांनी असे दाखवून दिले आहे की, दिल्लीतील तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी ‘अर्बन हिट आयलँड’चा प्रभावही महत्त्वाचा ठरला आहे. शहरीकरणामुळे वाढलेले आणि जाणवत असलेले तापमान म्हणजेच शहरी उष्णता किंवा अर्बन हिट होय. वाढलेल्या लोकसंख्येसाठी काँक्रीटच्या इमारती, रस्ते उभारले गेले. मोकळ्या जागा व्यापल्या गेल्या. नैसर्गिकरीत्या हवा प्रवाहित होण्याचे मार्ग अडले. परिणामत: निसर्गात तयार होणारा गारवा संपला. रस्ते, काँक्रीटचे आच्छादन तापू लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली आहे. दिल्लीमध्ये अनेक दशकांपासून दिल्लीच्या सीमाभागात, तसेच हिरवळ असलेल्या भागात कमी प्रमाणात कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली आहे; तर शहरीकरण झालेल्या भागात हेच प्रमाण अधिक आहे.