ब्लर्ब – मागील ५ वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेना-भाजप होती. बविआसोबत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. आता विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर, यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केले होते. मात्र रविवारी ठाकुरांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पुन्हा वसईच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे वसईच्या राजकारणास नाट्यमय वळण मिळाले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, पक्षातील बंड, महाविकास आघाडीमुळे दुरावलेला मतदार आदींमुळे राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ठाकूर यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे

बहुजन विकास आघाडीची वसईत स्थिती काय?

वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे बालेकिल्ले मानले जातात. या तिन्ही मतदारसंघात बविआचे आमदार निवडून येत आहेत. वसई-विरार महापालिकेत पूर्वीपासून बविआची एकहाती सत्ता आहे. १९९०पासून ठाकुरांचे वसई विरारच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व आहे. सहकार, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदीवर पकड आहे. बविआची पाळेमुळे या तीन मतदारसंघात घट्टेपणे रोवली गेली आहेत. पालघर जिल्ह्यातही पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

बविआची पीछेहाट झाली का?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बविआचा पराभव झाला आणि ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. महायुतीचे हेमंत सावरा विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या भारती कामडी जोरदार टक्कर देत दुसऱ्या स्थानावर राहिल्या. बविआचे राजेश पाटील तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. भाजपचे विजयी उमेदवार हेमंत सावरा यांना वसईतून जवळपास १० हजार, नालासोपार्‍यातून ५७ हजार तर बोईसर मधून ३९ हजार मतांची आघाडी घेतली होती. यामुळे बविआचा मतटक्का ओसरल्याचे दिसून आले.

हितेंद्र ठाकूर निवडणूक का लढवणार नव्हते?

२०१९च्या निवडणुकीच्या विजयानंतर ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केल्याने सर्वांना धक्का बसला होता. त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी ठाकूर यांच्यावर वैयक्तिक आरोप आणि भाष्य केले होते. त्यामुळे ठाकूर या राजकारणामुळे दुखावले होते. पक्षातील अन्य नेत्यांना संधी देण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार वसईमधून ठाकूर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव समोर येण्याची शक्यता होती.

हेही वाचा >>> हुकूमशाह किम जोंग उन करणार रशियाची मदत? रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग किती मोठा? त्याचा काय परिणाम होणार?

मग आता पुन्हा रिंगणात का उतरले?

मागील ५ वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेना-भाजप होती. बविआसोबत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. आता विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे. शिंदे गटदेखील सक्रिय झाला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि हितेंद्र ठाकूर यांचे आतेबंधू राजीव पाटील यांनी बंड करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षात मोठी फूट पडणार होती. त्याचा परिणाम नालासोपारा आणि वसई मतदारसंघातही झाला असता. या बंडामुळे एकसंध पक्षाला तडा जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पक्षाला नव्याने पक्षाला ऊर्जा देण्यासाठी गरज होती. दुसरीकडे, कार्यकर्त्यांचा ठाकूर यांच्याच नावाला आग्रह होता. ठाकूर रिंगणात नसते तर पक्ष विखुरला गेला असता. त्यामुळे ठाकूर पुन्हा रिंगणात उतरले आहेत.

नालासोपारा, वसई निवडणूक सोपी नाही?

नालासोपारा आणि वसई मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. बविआचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाच्या सेना-भाजप युतीचे विजय पाटील यांचा ठाकुरांनी जेमतेम २५ हजार मतांनी पराभव केला होता. लोकसभेतही बविआ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. नालासोपारा हा भाजपने बांधलेला मतदारसंघ होता आणि राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नालासोपार्‍यात परप्रांतीय मतदार २७ टक्के आहेत. लोकसभेत भाजपला या मतदारसंघातून ५८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे बविआपुढे मोठे आव्हान आहे.

बोईसर मतदारसंघ कठीण आहे का?

बोईसर मतदारसंघातून राजेश पाटील २०१९ च्या निवडणुकीत होते तेव्हा सेना-भाजप युतीमधील शिवसेनेचे विलास तरे यांचे आव्हान होते. मात्र तेव्हा भाजपतर्फे तिकिट न मिळाल्याने संतोष जनाठे यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी बविआच्या पथ्यावर पडली होती. राजेश पाटील यांना ७८ हजार ७०३ मते तर विलास तरे यांना ७५ हजार ९५१ मते मिळाली होती. बंडखोर संतोष जनाठे यांना ३० हजार ९५२ मते पडली आणि त्यामुळे राजेश पाटील यांचा अवघ्या २ हजार ७५२ मतांनी विजय झाला होता. पण या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीची तशी शक्यता नाही. याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीचेही आव्हान पाटील यांच्यापुढे असणार आहे.