स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 अंतर्गत, अनेक शहरांनी वर्षानुवर्षे वापरले जाणारे जुने कचरा डेपो (क्षेपणभूमी) स्वच्छ करून त्या जागांचा पर्यायी वापर सुरू केला आहे. या साफसफाईनंतर काही जागांवर उद्याने, तर काही ठिकाणी मेट्रो डेपो उभारले जात आहेत. या मोहिमेचा उद्देश २०२५-२०२६ पर्यंत सर्व जुने कचरा डेपो हटवून जमीन पुन्हा वापरण्यायोग्य करणे हा आहे. अहमदाबाद आणि पुण्यासारख्या शहरांनी या मोकळ्या जमिनींचा विविध प्रकारे पुनर्वापर करून त्यातून शहरी विकासाला चालना दिली आहे.

अधिक वाचा:  Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

स्वच्छ भारत मिशन- अर्बन 2.0 अंतर्गत, २०२१ साली सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश २०२५- २०२६ पर्यंत देशातील वर्षानुवर्षे वापरले गेलेले सर्व जुने कचरा डेपो (क्षेपणभूमी) स्वच्छ करणे हा आहे. देशभरातील २,४२१ कचरा डेपोंपैकी, २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७४ ठिकाणं स्वच्छ करण्यात आली असून, तब्बल दोन हजार ६१७.३८ एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे, असे स्वच्छ भारत मिशनच्या डॅशबोर्डवर नमूद केले आहे. मिशनशी संबंधित सूत्रांनुसार, ज्या शहरांनी आधी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेली जमीन स्वच्छ केली आहे, त्यांनी आता या जागांचा इतर कारणांसाठी वापर सुरू केला आहे किंवा त्या जागांचा वापर कसा करावा याचे नियोजन सुरू आहे.

अहमदाबाद:

अहमदाबादमधील बोपाळ घुमा येथील ४.३ एकर जमिनीवर पूर्वी २.३० लाख टन कचरा होता. आता ती जागा स्वच्छ करण्यात आली आहे. हा प्रकल्प ४.१७ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आला, तर या ठिकाणी परिसंस्थीय उद्यान उभारण्यात आले असून त्या पुनर्विकासासाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या अहमदाबाद महानगरपालिका या उद्यानाची देखभाल करते. अहमदाबादमधील दुसरे मोठा कचरा डेपो पिराणा, ८४ एकरांवर पसरलेला आहे, या डेपोतील ५४% जमीन स्वच्छ करण्यात आली आहे.

नागपूर

नागपूरचा कचरा डेपो ३५ एकरांवर पसरलेला आहे. ज्यामध्ये १० लाख मेट्रिक टन कचरा होता. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे ठिकाण १०० टक्के स्वच्छ करण्यात आले आहे. प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या जागेचा वापर इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पासाठी केला जाणार आहे. कचऱ्यावर जैविक प्रक्रिया करून त्यातून इंधन आणि खते तयार करण्यात आली असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अधिक वाचा: ‘Sector 36’ on Netflix: गळा दाबून मारले, नंतर शरीराचे भाग चिरून, शिजवून खाल्ले; कॅनिबलिजम आणि नेक्रोफिलिया आहे तरी काय? निठारी हत्याकांड काय होते?

पुणे

पुण्यातील वनाज येथील कचरा डेपोमध्ये ३७ लाख टन कचरा होता. हा डेपो पूर्णपणे स्वच्छ करून मेट्रो डेपो म्हणून वापरासाठी तयार करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या आकडेवारीनुसार, ७५ एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे. या जागेचा आता “हिल व्ह्यू पार्क कार डेपो” म्हणून वापर केला जात असून, तो पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे, या डेपोचे उद्घाटन २०२२ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

लखनौ

लखनौमधील घैला येथील ७२ एकरांवर पसरलेल्या कचरा डेपोमध्ये आठ लाख टन कचरा होता, जो पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे. या जागेवर आता “राष्ट्रीय प्रेरणा स्थळ” नावाने एक उद्यान विकासित केले जात आहे. या उद्यानात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यांचा समावेश असेल. तसेच सुमारे तीन हजार क्षमतेचे खुले थिएटर आणि प्रदर्शनासाठी जागाही असेल. उद्यानाचे उद्घाटन लवकरच होणार आहे.