अनेक देशांच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात पर्यटन क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. युरोपमधील अनेक देशांचे उदाहरण त्यासाठी देता येतील. मात्र, सध्या अनेक युरोपियन देशांमध्ये अतिपर्यटन हीच मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे ‘पर्यटकांनो परत जा’ असा नारा देत स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. मध्यंतरी स्पेन, इटलीपुरतेच दिसून आलेले हे आंदेलन संपूर्ण युरोपमध्ये पसरायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. काय आहे त्यामागची कारणे, ते पाहूया…

युरोपमध्ये शहरांमध्ये पर्यटन क्षेत्राची स्थिती कशी?

व्हेनिस, रोम, ॲमस्टरडॅम, फ्लॉरेन्स, बर्लिन, लिस्बन, पाल्मा डी मॅलोर्का आणि युरोपमधील इतर ठिकाणी पर्यटकांच्या अतिओघाने तेथील स्थानिकांना ‘ट्युरिस्मोफोबिया’ने पछाडले असल्याचे अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पर्यटनामुळे येथील जनजीवन अस्थिर केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे मूळ स्थानिकांना पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवांवर परिणाम तर होत आहेच. शिवाय महागाईचाही सामना त्यांना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षी, पर्यटनामुळे शहराला फायदा होतो असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या बार्सिलोनासारख्या शहरात आता कमी होत आहे, तर पर्यटक हानिकारक आहेत असे वाटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे बार्सिलोनाच्या ‘सिटी कौन्सिलने’ केलेल्या २०२३ च्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण : एका ‘मायक्रोसॉफ्ट’मुळे जग का कोलमडले? ‘क्राऊडस्ट्राइक’ बिघाड काय होता?

पर्यटकांवर रोष का? 

अनेक पर्यटक केवळ पार्ट्या करण्यासाठी शहरांना भेटी देतात. स्पॅनिश लोकांनी वर्षानुवर्षे तक्रार केली आहे की, पर्यटक जास्त प्रमाणात मद्यपान करतात, कचरा करतात, भांडण करतात आणि अगदी नग्न होऊन रस्त्यावर धावतात. ज्याचा परिणाम पर्यावरणावर होतोच परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते. शिवाय पर्यटकांसाठी कोच बस, टुरिस्ट शॉप्स, नवीन हॉटेल आणि अल्प-मुदतीसाठी भाड्यावर दिल्या जाणाऱ्या अपार्टमेंटचे दर वाढवले जात असल्याने स्थानिकांना त्याच गोष्टींसाठी विनाकारण जास्तीचा मोबदला द्यावा लागतो. अनेक शहरांच्या लोकसंख्येपेक्षा पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी, प्रत्येक ठिकाणी गर्दीचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमुळे बार्सिलोनाच्या लोकांच्या मनात विस्थापित झाल्याची भावना निर्माण झाली आहे, त्यांचे शहर आणि त्याची ओळख त्यांच्यापासून हिरावून घेतली गेली आहे, ही भावना जन्माला येत आहे, असे युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

इटलीत अतिपर्यटकांमुळे काय झाले? 

व्हेनिस शहरातील वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे मोठ्या जहाजांना ग्रँट कॅनाॅलमधून जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यासाठी २०२१ मध्ये इटलीतील रहिवासी रस्त्यावर उतरले. या निर्णयामुळे शहराच्या संरचनात्मक आणि पर्यावरणीय अखंडतेला मदतच झाली. त्याच प्रमाणे गर्दी कमी करण्यासाठी व्हेनिसने या वर्षी पर्यटन कर लागू केला, मात्र पर्यटकांची संख्या कमी करण्यात त्याचा फारसा उपयोग झाला नाही. व्हेनिसमध्ये प्रवासी अजूनही हजारोंच्या संख्येने कॅनॉलमधील अरुंद मार्गाने प्रवास करतात. व्हेनिसमध्ये या वर्षी सुमारे ५४०००० क्रूझ प्रवासी भेट देतील अशी अपेक्षा आहे, ही संख्या २०२३ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहे. 

हेही वाचा >>>Microsoft outage जगाचे व्यवहार ठप्प करणारा मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील बिघाड (आउटेज) नेमका कशामुळे?

युनेस्कोने कोणते उपाय सांगितले? 

युनेस्कोच्या मते, स्थानिक आणि प्रवाशांची आवड, हित हे यांचे संतुलन आवश्यक आहे. त्यासाठी त्यांंनी ‘क्वालिटी ओव्हर क्वांटिटी’ पर्यटनाचा उपाय सुचवला आहे. जास्त पर्यटक भेट देणाऱ्या शहरांनी उत्तमोत्तम (लग्झुरिअस) सोयीच पुरविण्यावर भर द्यायचा. या सोयीसुविधा केवळ सढळ हाताने खर्च करणाऱ्या किंवा महागड्या सेवा परवडणाऱ्यांसाठीच असल्याने पर्यटकांची संख्या आपोआप कमी होईल. तसेच ज्या पर्यटकांची सामाजिक वागणूक त्रासदायक ठरते अशांनाही आळा बसेल. ‘मिरर सिटीज’ ही संकल्पनादेखील युनेस्कोने सुचवली. यात एखाद्या प्रसिद्ध शहरासारखीच वैशिष्ट्ये, सांस्कृतिक आकर्षणे असणाऱ्या शहरांना प्रसिद्धी देत पर्यटकांचा लोंढा अशा ठिकाणी वळवला तर अशा शहरांचाही विकास होऊ शकतो आणि गर्दी विभागता येते. 

pradnya.talegaonkar@expressindia.com