अमेरिकेच्या संसद सिनेटमध्ये ऐतिहासिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. न्यू जर्सी येथील डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर कोरी बुकर यांनी सिनेटमध्ये तब्बल २५ तास पाच मिनिटांचे भाषण करून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी सोमवारी संध्याकाळी या भाषणाला सुरुवात केली, हे भाषण मंगळवार रात्रीपर्यंत चालले. या भाषणात त्यांनी ट्रम्प प्रशसनावर जोरदार टीका केली. या भाषणाची तयारी करण्यासाठी बुकर यांनी आपण केलेल्या तयारीविषयी पत्रकारांना सांगितले.
बुकर म्हणाले, त्यांनी अनेक दिवस उपवास केला आणि पाण्याचे सेवन कमी केले; जेणेकरून त्यांना लघुशंकेसाठी विश्रांती घ्यावी लागू नये. “मी शुक्रवारपासून अन्नाचे सेवन बंद केले आणि भाषणाच्या आदल्या दिवशी रात्रीपासून पाणी पिणे बंद केले,” अशी माहिती त्यांनी ‘सीएनएन’ला दिली. याचे फायदे आणि तोटे, दोन्ही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, लघवी रोखून धरणे किंवा लघवीला वारंवार जाणे, आरोग्यासाठी घातक आहे का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊ.

जास्त काळ लघवी रोखण्याचे दुष्परिणाम
लघवी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु, जास्त वेळा किंवा कमी वेळा लघवीला जाणे, दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मूत्ररोगतज्ज्ञ सांगतात. लघवी रोखल्याने मूत्रमार्गाचे संक्रमण, तसेच मूत्राशय आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमधील प्राध्यापक स्टीफन फ्रीडलँड यांनी २०२१ मध्ये ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले होते की, जर कोणी वारंवार लघवी रोखून ठेवत असेल आणि मूत्राशय अधिक काळ भरलेले राहत असेल, तर संबंधित अवयवावर जास्त ताण येऊ शकते आणि काही काळानंतर त्या अवयवाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला आराम मिळेपर्यंत मूत्राशयात लघवी साठवण्याची क्षमता असते.
प्रौढ व्यक्तींच्या मूत्राशयात जवळजवळ एक ते दोन कप लघवी साठवण्याची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त लघवी साठवली गेल्यास त्या अवयावर ताण येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला शरीरात इतकी लघवी तयार करण्यासाठी नऊ ते १० तासांचा कालावधी लागतो, असे हेल्थलाइनमध्ये नमूद करण्यात आले आहे. पेल्विक सर्जन डॉ. रेना मलिक ‘द गार्डियन’शी बोलताना म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीने जास्त काळ शरीरात लघवी साठवून ठेवल्यास, ती बाब जीवाणूंसाठी कारणीभूत ठरते.
अनेकदा लघवी आलीय हे ठाऊक असूनदेखील अनेक जण लघवीला जाणे टाळतात. त्यामुळे पेल्विक फ्लोर स्नायूंना हानी पोहोचू शकते आणि मूत्रमार्गातील स्नायूंच्या संयमावर याचा परिणाम होऊ शकतो. सवयीचा भाग म्हणून जे लोक वेळेत लघवीला जाणे टाळतात, त्यांना वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते, कधीतरी लघवी करतानादेखील त्रास होऊ शकतो, असे वृत्त ‘मेडिकल न्यूज टुडे’ने दिले आहे.
कोरी बुकर यांनी लघवी येऊ नये, यासाठी पाणी पिणे टाळले म्हणजेच काय तर त्यांनी स्वतःला डिहायड्रेट केले. मात्र, हेदेखील शरीरासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. एखाद्या व्यक्तीने पाणी पिणे टाळले तरी शरीर लघवी तयार करते, शरीराला सहजरीत्या द्रव मिळू शकत नसल्याने मूत्राशयावर ताण येतो, असे तज्ज्ञ सांगतात. बुकर यांनादेखील त्यांच्या भाषणाच्या अखेरीस मूत्राशयात वेदना झाल्याचे सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात शरीरातील पाणी कमी झाल्यावर मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो आणि याचा परिणाम लघवीच्या समस्यांवर होतो. परिणामी त्यामुळे व्यक्ती बेशुद्धदेखील होऊ शकते, असे न्यू यॉर्कमधील ‘एक्स्टेंशन हेल्थ’ येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व इंटर्नल मेडिसिन फिजिशियन डॉ. मिशाल रेजा यांनी ‘सीएनएन’ला सांगितले.
वारंवार लघवीला जाणेही धोकादायक?
वारंवार लघवी करणेदेखील आरोग्यासाठी योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. वारंवार लघवीला गेल्यास मूत्राशयाचे स्नायू आकुंचन पावू शकतात. लघवीमध्ये १२ तासांचे अंतर चुकीचे आहे आणि दर १५ मिनिटांनी लघवीला जाणेदेखील चुकीचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्ही सातत्याने लघवी करण्यासाठी शौचालयात जात असाल, तर त्याचा परिणाम भविष्यात तुमच्या मूत्राशयावर झाल्याचे लक्षात येईल. सतत लघवीला जाण्याच्या सवयीने मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. तज्ज्ञ सांगतात की ही, अतिक्रियाशील मूत्राशयाची स्थितीदेखील असू शकते. या स्थितीत एखाद्याला लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते आणि लघवीवर नियंत्रण ठेवणेदेखील अवघड होते.
किती वेळा लघवीला जाणे योग्य?
प्रत्येक व्यक्तीनुसार लघवीला जाण्याची वेळ बदलते. तज्ज्ञ सांगतात की, प्रौढांनी जागे असताना दर तीन ते चार तासांनी लघवी करावी. परंतु, ही बाब तुम्ही किती आणि किती वेळा पाणी पित आहात किंवा खात आहात किंवा गर्भवती आहात यावर अवलंबून असते आणि त्यानुसार बदलते. मद्यपान, कॉफी व चहासारखी कॅफिनयुक्त पेये, तसेच कार्बोनेटेड पेयांच्या सेवनाने लघवीला जाण्याची तीव्रता आणि प्रमाण दोन्ही वाढते. झोपेच्या पूर्वी या पदार्थांचे सेवन टाळल्यास आरोग्यासाठी ते हितकारक ठरू शकते आणि मग झोपेत असताना वारंवार लघवीसाठी जाग येत नाही.